वृत्तसंस्था, नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या आतिश तोडकरने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारातील ५७ किलो वजन गटात सनसनाटी निकालाची नोंद केली. त्याने साखळी फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या रवी दहियाला चीतपट केले. मात्र, आतिशला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. निवड चाचणीच्या दुसऱ्या दिवशी रवी आणि आतिश यांच्यातील लढतीचा निकाल सर्वात लक्षवेधी ठरला. पुढे उपांत्य फेरीत दिल्लीच्या राहुलकडून पराभूत झाल्याने आतिशचीही घोडदौड थांबली.

गुडघ्याच्या दुखापतीनंतर प्रथमच मॅटवर उतरलेल्या रवीला आतिशच्या आव्हानाचा सामना करता आला नाही. त्याच्या हालचालीही मंदावलेल्या दिसल्या. याचा फायदा घेत आतिशने सगळी ताकद पणाला लावून २०-८ अशी आघाडी मिळवली होती. त्याच क्षणी डावावर मिळवलेली पकड घट्ट करत आतिशने रवीला खाली घेतले आणि त्याच स्थितीत त्याचा खांदा मॅटला टेकवत त्याला चीतपट केले.

या वजन गटाचे वैशिष्टय़ म्हणजे यातून महाराष्ट्राचा राहुल आवारेही आपले कसब पणाला लावत होता. मात्र, पहिल्याच फेरीत राहुलला नवोदित खेळाडू अमनकडून पराभव पत्करावा लागला. महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज पाटील हे मल्लही आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे पुरुष विभागातूनही महाराष्ट्राचा एकही मल्ल भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. दोन दिवस झालेल्या निवड चाचणीनंतर सहाही वजन गटातील विजेते मल्ल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जातील. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू राखीव असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघाचे अंतिम मूल्यांकन रवाना होण्यापूर्वीच!

भारतीय कुस्ती संघाची निवड चाचणी अखेर पार पडली. संघ पाठविण्याची मुदत रविवारची असल्यामुळे तातडीने राखीव खेळाडूंसह संघाची नावे कळवली जातील. मात्र, भारतीय संघाचे अंतिम मूल्यांकन संघ स्पर्धेसाठी चीनला रवाना होण्यापूर्वी केले जाईल, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्पष्ट केले आहे. स्पर्धेसाठी योग्य खेळाडूंचीच निवड केली जाईल. त्यामुळे संघ रवाना होण्यापूर्वी खेळाडूची तंदुरुस्ती आणि प्रत्येक खेळाडू उत्तेजक मुक्त असेल याची खात्री करून घेतली जाईल, असे ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी निवडीचे निकष जाहीर झाल्यावर म्हटले होते.निकाल (विजेते) अमन (५७ किलो), विशाल  (६५ किलो), यश (७४ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), विकी जे. (९७ किलो), सुमित (१२५ किलो).