पीटीआय, नॉटिंगहॅम : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागत आहे. कोहलीने नोव्हेंबर २०१९नंतर एकही शतक केलेले नसून नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही तो अपयशी ठरला. त्याला दोन सामन्यांत अनुक्रमे १ आणि ११ धावाच करता आल्या. त्यामुळे कपिल देव आणि मायकल वॉन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी कोहलीच्या ट्वेन्टी-२० संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्माने कोहलीची पाठराखण केली आहे.

‘‘कोहलीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित करणारे ‘जाणकार’ कोण आहेत आणि त्यांना ‘जाणकार’ का म्हटले जाते, हे मला ठाऊक नाही. संघाबाहेरील लोक काय म्हणत आहेत, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. संघ निवडण्याची प्रक्रिया असते. आम्हाला खूप चर्चा करून संघबांधणी करावी लागते. आम्ही खेळाडूंची निवड करतो, त्यांना संधी देतो आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असतो. बाहेरील लोकांना हे माहिती नसते,’’ असे रोहित म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘खेळाडूंची कामगिरी वर-खाली होत असते. मात्र, त्यामुळे खेळाडूची गुणवत्ता कमी होत नाही. एखाद्या खेळाडूविषयी विधान करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आम्ही खेळाडूतील गुणवत्तेला पाठिंबा दर्शवतो. ज्या खेळाडूने वर्षांनुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्याचे योगदान केवळ एक-दोन मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर विसरणे योग्य नाही. त्यामुळे बाहेरील व्यक्तींना जरी आपले मत मांडण्याचा अधिकार असला, तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो,’’ असे रोहितने स्पष्ट केले.