India vs England 1st Test: लीड्स कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार शतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनीही दमदार हल्लाबोल केला. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर ३ गडी बाद २०९ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून ओली पोप १०० धावा करून नाबाद माघारी परतला. भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला पोप स्वस्तात माघारी परतला असता, पण यशस्वी जैस्वालमुळे त्याला जीवदान मिळालं.
तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ३१ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू पोपने हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटचा कडा घेत तिसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालच्या हातात गेला. यशस्वी जैस्वालने हा झेल पकडण्यासाठी यशस्वीने उजव्या बाजूला डाईव्ह मारली. चेंडू हातात बसला होता, पण तोल गेल्यामुळे हा झेल त्याच्या हातून सुटला. इथेच पोपला मोठं जीवदान मिळालं. ज्यावेळी पोपचा झेल सुटला त्यावेळी तो ६० धावांवर फलंदाजी करत होता. तर यशस्वीने त्याचा झेल पकडला असता, तर इंग्लंडच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली असती. सोपा झेल सोडल्यामुळे बुमराह देखील संताप व्यक्त करताना दिसून आला.
तिसऱ्या दिवशी गोलंदाज चमकणार की फलंदाज?
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला पहिला कसोटी सामना सध्यातरी बरोबरीत आहे. कारण पहिल्या दिवशी भारतीय संघातील दोन फलंदाजांनी शतकं झळकावली. तर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने देखील २०० धावांचा पल्ला गाठला आहे. इंग्लंडकडून ओली पोप शतकी खेळी करून नाबाद आहे. त्यामुळे सामन्यातील तिसऱ्या दिवशीही बरोबरीचा खेळ होऊ शकतो. जर ढगाळ वातावरण असेल, तर भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडू शकतात. तर दुसरीकडे इंग्लंडचे फलंदाज भारतीय संघावर आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
भारतीय संघाने उभारला ४७१ धावांचा डोंगर
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. तर कर्णधार आणि उपकर्णधाराने दमदार शतक झळकावलं. गिलने १४७ तर ऋषभ पंतने १३४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला.