आध्यात्मिक महत्त्व, भक्तिपूर्ण, सामाजिक रूप, एकतेचा, व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण म्हणजे गोपाळकाला. विविध पद्धतींनी जुन्या रुढी, परंपरा जपत हा सण मोठ्या जल्लोशात साजरा होतो. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्ण अनादी, अनंत विष्णूचा आठवा अवतार. कृष्णजन्म, त्याचे बालपण, त्याची रासलीला, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचे चरित्र सारेच अद्भुत. कृष्ण हा विष्णूचा एकमेव पूर्णावतार. युगानुयुगे लोकांना कृष्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू भुरळ घालत असतात. काहींना त्याचे मनमोहक रूप, रसिकता, मत्र भावते तर काहींना तेज, शौर्य, पराक्रम, धर्य, अपूर्व बुद्धिमत्ता, कुशल राजानितीज्ञत्व, मुत्सद्देगिरी, निस्वार्थीपणा असे गुण आकर्षति करतात. कृष्ण म्हणजेच आकर्षकता.

अशा लाडक्या कृष्णाचा जन्म साऱ्या भारतभर मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. त्याचे स्मरण ठेवण्यासाठी गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती यांची प्राप्ती होते, असे सांगितले जाते.

पारंपरिक पद्धत व महत्त्व

श्रावण वैद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा पडली आहे. हे व्रत पुढीलप्रमाणे केले जाते. सप्तमीच्या दिवशी एकभुक्त राहून अष्टमीला पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून पूजास्थान लतापल्लवाने सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे कारावासातील सूतिकागृह तयार करतात. मंचावर देवकी-कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूस यशोदा व तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्ती बसवतात. मध्यरात्री शूचिर्भूत होऊन, ‘श्रीकृष्णस्य पूजां करिष्ये’ असा संकल्प करतात व श्रीकृष्णाची सहपरिवार षोडशोपचार पूजा करतात. रात्री कथापुराण, नृत्य-गीत इत्यादी कार्यक्रम करून जागरण करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाचा नवेद्य दाखवतात. नवमीच्या दिवशी पंचोपचारांनी उत्तर पूजा करून महानवेद्य समर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलात विसर्जन करतात. श्रीकृष्णाची धातूची मूर्ती असल्यास ती देव्हाऱ्यात ठेवतात किंवा ब्राह्मणाला दान देतात.

गोपाळकाला : महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने दहीकाला होतो. तेव्हा ‘गोविंदा आला रे आला।’ अशी गाणी म्हणत पुरुष रस्त्याच्या दुतर्फा तेथील परिसरातू्न नाचत गात जातात. दहीहंडय़ा फोडत गोपाळकाल्याचा उत्सव साजरा करतात. त्यांच्यावर रस्त्यात माणसे घराघरांतून पाण्याच्या घागरी ओततात. कित्येक ठिकाणी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित देखावे दाखवण्यात येतात. आजही काही भागांत पूर्वीच्या रूढी, परंपरा चालू आहेत.

पहाटे सगळे गोिवदा ग्राममंदिरात एकजूट होतात. दुधादह्याची हंडी ग्रामदेवतेसमोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळी बांधून सजवली जाते. पूजा, गाऱ्हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो. खापऱ्या सर्वत्र विखुरतात. गोिवदा त्यातील एखादी खापरी आपल्या घरी आणून ठेवतात, त्यामुळे गोरसाची समृद्धी होते असे मानतात. देवळात कीर्तन चालू असते. त्यात गोपाळकाल्याचा प्रसंग सोंगे आणून दाखवतात. त्याला काल्याचे कीर्तन म्हणतात.

जवळच्या विभागातल्या मानाच्या हंडय़ा फोडण्याचा कार्यक्रम पार पडला की सगळे पथक ट्रक, टेम्पो, बसमध्ये बसून उपनगरातील लोणी लुटायला पसार होते.

गोमंतकात केल्या जाणाऱ्या काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णालीलेची गाणी म्हटली जातात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. गवळणकाला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.

काला : विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गाई चारताना स्वत:ची व सवंगडय़ांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वासह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

हरिदासांचा काला : पंढरपुरात गोपालपूर या वाडीत आषाढी-कार्तिकी पूर्णिमेस काला होतो. याला हरिदासांचा काला म्हणतात. वारीला आलेली सगळी यात्रा त्या काल्याला जमते. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय वारकऱ्यांना पंढरपूर सोडण्याची परवानगी नसते. या सोहळ्यावर अनेक संतांनी अभंग लिहिले आहेत. संत जनाबाईचा एक अभंग पुढीलप्रमाणे आहे-

असो थोराथोरांची माता।

तूची मिळालासी गोपाळांत॥

त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी।

ग्रासोग्रासी उच्छिष्ट खासी॥

न म्हणे सोवळे ओवळे।

प्रत्यक्षाची ते ओवळे॥

स्वानंदाचे डोही हात।

धुतले सर्वाही निश्चित॥

हाती काठय़ा पायी जोडे।

दासी जनी वाट झाडे॥

(नामादेवगाथा पृ.७४१)

या अभंगावरून गोपाळकाल्याचे महत्त्व लक्षात येते.

गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व

‘गोकुळाष्टमी’ या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते, असे मानले जाते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो, असे मानले जाते.

गोपाळकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. ‘काला’ म्हणजे त्या काळाला, स्थळाला, त्या-त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टय़पूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तिन्ही घटकांवर आदर्शवत असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते, असे मानले जाते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात. ‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो, असे मानले जाते.

काल्यातील प्रमुख घटक

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.

पोहे : वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)

दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक

दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक

ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक

लोणी : सर्वाच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक.

गोपाळकाला आध्यात्मिक महत्त्व, भक्तीपूर्ण, सामाजिक रूप, एकतेचा, व्यवस्थापकीय कौशल्य दाखवतो.

गोविंदा हा एक साहसी खेळ

गोविंदा पथकाचे मास्तर सर्व गोविंदांना मार्गदर्शन करतात. मास्तरांच्या नेतृत्वाखाली १-२ महिना आधीपासूनच त्यांची पूर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोविंदांसाठी खास ट्रेिनग आयोजित केले जाते. योग्य संतुलन राखून उंचीची भीती घालवण्यासाठी तरण तलावात २० फुटांवरून उडय़ा मारणे, दोरीवरून चालणे इ. प्रकारांचा सराव करून घेतला जातो. मनोधर्य स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मदत घेतली जाते. बहुतांश गोविंदा हे व्यायामशाळेतील कसलेल्या शरीरसौष्ठवाचा पुरेपूर उपयोग करतात. थर कोसळून होणाऱ्या दुखापतीची चिंता न करता हे गोिवदा अथक परिश्रम करत असतात. आता गोकुळात श्रीहरी रंग खेळतोय म्हणून केवळ जपून घरी जाणारी राधिका नाही तर आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात गोपाळकाला खेळणारी गोपिका आहे. अनेक महिला पथके अतिशय चांगले काम करत आहेत. गोविंदा पथकांची ही अखंड मेहनत, जिद्द, शिस्त या लोकप्रिय खेळाला व्यावसायिक दर्जा प्राप्त करून देते.

उत्सवाचे विकृत स्वरूप

गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करताना शास्त्र विसरून निव्वळ करमणुकीच्या दृष्टीने पहाणे सुरू झाले व या उत्सवाच्या अधोगतीला सुरुवात झाली. उत्सवामुळे संघटित होण्याचा उद्देश विसरून अधिकाधिक स्पर्धा करण्याच्या उद्देशाने मंडळांची व गोविंदा पथकांची संख्या भरमसाट वाढू लागली. दहा वर्षांपूर्वी मुंबईतील गोविंदा पथकांची संख्या पाचशेच्या आसपास होती, तर गेल्या दोन वर्षांत हाच आकडा दोन हजारांच्या घरात पोहोचला आहे. मुंबई ठाणे येथील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने होणारी उलाढाल तीस कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली होती. आज राजकीय लाभासाठीही दहीहंडय़ांचा वापर केला जाऊ लागला आहे. मंडळांकडून आयतेच मिळणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मंडळांकडे राजकीय पक्षांचा वाढता प्रभाव, प्रसिद्धीसाठी दहीहंडय़ांवर केली जाणारी लाखो रुपयांची उधळण व बक्षिसे यांमुळे या उत्सवाचे व्यापारीकरण होऊ लागले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्तानेही खंडण्या उकळणे, उंच हंडय़ा लावून प्रसिद्धी मिळवणे, मुलींची छेड काढणे यांसारख्या गैरप्रकारांना ऊत येत आहे.

यापूर्वी कमी उंचीवर हंडय़ा बांधल्या जायच्या. त्यामुळे पडून दुखापत होण्याचा धोका कमी होता. सध्या या उत्सवास विकृत स्वरूप आलेले आहे. उंचावर दहीहंडय़ा बांधल्या जातात. त्या फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवलेली असतात. या हंडय़ा फोडण्यासाठी पशाच्या लोभापायी सार्वजनिक मंडळांतील मोठय़ा वयातील मुले व पुरुष हंडीखाली गोल फेर धरून ६० ते १०० फूट उंचीचे आठ, नऊ मानवी मनोरे रचतात. हंडी फोडण्यासाठी कोवळया वयाच्या लहान मुलांना वर चढवले जाते. यात काही जण मद्यपान केलेलेही असतात. त्यामुळे बऱ्याचदा मनोरे कोसळून मुलांना व मोठय़ांना दुखापत होते. पण बक्षीस मिळावे या आशेने बरीच मंडळे या दहीहंडय़ा फोडण्यासाठी पुढे सरसावतात. कधीकधी हात-पाय जायबंदी होतात, मृत्यूही ओढवतो.

प्रयत्न

यंदा बाल गोविंदांवर बंदी आहे. उंचीवरही मर्यादा आहेत. सुरक्षिततेचे नियम कडक केले आहेत. यासारखे उपाय करून यात एक शिस्त आणण्याचा प्रयत्न शासन तसेच सुजाण गोिवदा पथके करीत आहेत. गोिवदा हा एक साहसी खेळ आहे. त्यातले साहस, मजा आणि संदेश जपण्याचा प्रयत्न सगळे करीत आहेत.

‘मच गया शोर सारी नगरी में’ असा धांगडिधगा घालत हा उत्सव साजरा करण्यापेक्षा ‘गोविंदा रे गोपाला’ असा नाद घुमवणारी उत्साही युवक-युवती जास्त भावतात. गोविंदा आणि गोपिकांच्या हाका ऐकू येतात-

‘गोऽऽऽविंदा रे गोऽऽऽपाळा..

यशोदेच्या तान्ह्या बाळा,

घरात नाही पाणी घागर,

उतानी रे गोपाळा..’

डॉ. प्राची मोघे

(टीप मूळ लेख ‘लोकप्रभा’वरुन साभार. मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy janmashtami 2021 enjoy lord krishna birthday tradition method spiritual significance gst
First published on: 28-08-2021 at 11:55 IST