‘कडू कडू कारले, बाजारात फिरले त्याला पाहून नाक भेंडीने मुरडले’. लहानपणी भाज्यांवर आधारित एका ‘बडबड गीता’मध्ये कारल्याचे वर्णन अशाप्रकारे केले होते. कारले किंवा कारल्याची भाजी म्हटली की सगळेच नाक मुरडतात, पण ही कारली कितीही कडू असली तरी आरोग्य मात्र उत्तम ठेवतात. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आपल्याकडे कारल्याची भाजी सहसा कोणी करत नाही, केलीच तर मीठ टाकून तिच्यामध्ये असलेले सारे पौष्टीक घटक काढून टाकतात. कारल्यातलं पाणी काढून टाकलं की ती कमी कडू लागते असा अनेक गृहिणींचा समज आहे. पण, यामुळे भाजीतील जीवनसत्त्व पूर्णपणे वाया जाते याची कल्पना त्यांना नसते. कारल्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. फक्त भाजीसाठीच नाही तर औषधांमध्येही कारल्याचा वापर केला जातो. कारले कितीही नावडते असले तरी आहारात आठवड्यातून किमान एकदा तरी या फळभाजीचा समावेश असलाच पाहिजे.
सारखा थकवा येतोय? आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
कारल्याचे फायदे
– कारल्याच्या रसामुळे रक्तशुद्ध होते, त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो.
– कावीळ झाल्यास ताज्या कारल्यांचा रस सकाळ संध्याकाळ घेतल्यास यामुळे कावीळ दूर होते.
– यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.
– जंत किंवा कृमींचा त्रास असल्यास कारल्याची भाजी किंवा रस घेतल्यानं कृमींचा त्रास कमी होतो.
– दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.
– कारले हे शक्तीवर्धक आहे म्हणून लहानमुलांच्या आहारातही कारल्याचा समावेश आवर्जून करावा.