नवी दिल्ली : आपण व्यायाम करताना, चालताना आपल्याला घाम येतो. ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीराची ती एक तापमान नियमन प्रक्रिया आहे. घाम बाहेर पडण्याचे आरोग्यदायी फायद्यांविषयी बहुसंख्यांना ठाऊक नसते.
आपल्याला घाम का येतो?
आपल्या शरीराचे तापमान नियमित करण्यासाठी प्रामुख्याने घाम येतो. शरीरातील ग्रंथीद्वारे तयार होणारा, हा घाम बाहेर टाकला जातो. त्यामुळे त्वचा थंड राहण्यासही मदत होते. घर्मग्रंथी जरी शरीरभर असल्या, तरी घाम मुख्यत्वे कपाळ, काख, तळहात, तळपायाला येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात मीठ आणि अधिक प्रमाणात पाणी असते. घामाचे बाष्पीभवन झाले, की त्वचेचा पृष्ठभाग थंड होतो. तसेच घामामुळे त्वचेत मऊपणा राहतो, तसेच घाम धुतल्यावर त्वचेला तजेला येण्यास मदत होते.
अर्धा तास घाम येईपर्यंत व्यायाम केल्यास निद्रानाशावर मात करता येते. शांत झोप लागते. वारंवार खंडित निद्रेचा त्रास होत असेल, तर घाम येईपर्यंत व्यायाम अथवा शारीरिक क्रिया केल्यास चांगली झोप येण्याची शक्यता वाढते. हालचाली व घामाचा परस्परसंबंध आहे. नियमित व्यायामामुळे वजन आटोक्यात राहते. ऊर्जेत वाढ होते. नियमित घाम येईपर्यंत ‘अॅक्रोबॅटिक’सारखे व्यायाम केल्याने मेंदूतील स्मरणशक्ती व आकलनशक्तीशी संबंधित ‘हिप्पोकॅम्पस’ या मेंदूच्या भागाचे आरोग्य चांगले राहते.
काही व्यक्तींना अधिक घामाचा त्रास :
काही व्यक्तींना मात्र गरजेपेक्षा जास्त घाम येतो. या स्थितीला वैद्यकीय परिभाषेत ‘हायपर हायड्रोसिस’ म्हणतात. नेहमी घाम येणाऱ्या कपाळ, डोके, तळहात, काखेशिवाय इतर ठिकाणांहूनही अशा व्यक्तींना सतत घाम येतो. हालचाल करत नसताना, व्यायाम करत नसताना केवळ बसलेले असताना काही व्यक्तींना घाम येतो. जास्त घाम येणाऱ्यांनी शरीरातील ऊर्जेसाठी गरजेच्या क्षारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी थोडे मीठ घातलेले लिंबू-पाणी नियमित घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. घाम रोखण्यासाठीची उत्पादने वापरूनही घाम आटोक्यात येत नसेल, तर वैद्यकीय सल्ल्याने उपचार करावेत.