North Indian Diet Raises Risk of Hypertension Heart Kidney Ailments : निरोगी जीवनासाठी पौष्टिक आहार खूप महत्त्वाचा आहे. परंतु, आपल्या आहारात अनेकदा पोषक घटकांचा अभाव दिसून येतो. काही अन्नपदार्थांत सोडियमचे तर काहींमध्ये पोटॅशिमयचे प्रमाण कमी असते. काही जण आपल्या दैनंदिन आहारात प्रोटीनवर भर देतात. पण, अशा असमतोल आहार पद्धतीने व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. विशेषत: उत्तर भारतातील बटर चिकन, छोले भटुरेसह दाल मखनीसारख्या खाद्यपदार्थांतून व्यक्तीला विविध आहारांचा धोका वाढत असल्याचे एका नव्या संशोधनातून उघड झाले आहे. चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) च्या सहकार्याने जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडियाच्या संशोधकांनी एक संशोधन केले आहे. या संशोधनानुसार अन्नामध्ये सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार आणि किडनीच्या तीव्र आजारांसह असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे. फ्रन्टियर्स इन न्यूट्रिशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात ४०० लोकांचा समावेश करण्यात आला होता, ज्यात निरोगी प्रौढ लोकांचा एक गट होता तर दुसरा प्राथमिक अवस्थेत किडनीचे आजार असलेल्या रुग्णांचा गट होता. संशोधकांनी पोषक तत्वांच्या सेवनाचे मूल्यांकन करण्यासाठी सकाळी उठल्यापासून काय खातात, त्यांच्या नैसर्गिक प्रक्रिया यांचे विश्लेषण करण्यात आले. दोन्ही गटांच्या अन्न सेवनाची तुलना केली गेली तेव्हा रुग्ण आणि निरोगी लोकांमध्ये समान खाण्याची वर्तणूक दिसून आली.यावेळी संशोधनात असे दिसून आले की, शिफारस केलेल्या पातळीपेक्षा जास्त मिठाचे सेवन, पोटॅशियमचे अपुरे सेवन आणि कमी प्रथिनांचे सेवन यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि मूत्रपिंडासंबंधित गंभीर आजार होण्याचा धोका वाढतोय. संशोधनातून असेही समोर आले आहे की, स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या आहारातील पोषक तत्वांकडे कमी लक्ष देतात, ज्यामुळे त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबसारख्या समस्यांचा धोका जास्त असतो. यावर द जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे कार्यकारी संचालक प्रोफेसर, किडनी रोगतज्ज्ञ आणि या संशोधनाचे प्रमुख विवेकानंद झा म्हणाले की, निकृष्ट पौष्टिक आहार हा असंसर्गजन्य रोगांसाठी (NCD) जोखमीचा एक प्रमुख घटक आहे, तसेच तो सार्वजनिक आरोग्यासाठीदेखील चिंतेचा विषय आहे. भारतात लोक वेगवेगळे पदार्थ खातात, त्यामुळे या आजारांना रोखण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आहारातून होणारे मिठाचे जास्त सेवन आणि पोटॅशियमचे कमी सेवन असे दर्शवते की, आपल्या शरीराच्या गरजेनुसार आहारात बदल केले पाहिजे. या संशोधनातील निष्कर्षांना सहमती दर्शवत सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे क्लिनिकल असोसिएट, नेफ्रोलॉजी डॉ. रेजिथा कॅमल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आहारतज्ज्ञ लोकांना मिठाचे जास्त सेवन करू नका असे सांगतात, तरी उत्तर भारतीय आहारांमध्ये मीठ जास्त वापरतात. तसेच यांच्या आहारात पोटॅशियम आणि प्रथिने कमी असणे हा आणखी एक शोध आहे. कमी पोटॅशियम आणि प्रथिने दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असू शकते. मात्र निरोगी प्रौढ लोकांनी या पोषकतत्वांचे कमी प्रमाणात सेवन केल्यास त्यांना थकवा, अस्वस्थता ते स्नायू कमजोर होण्यासह इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. संशोधकांनी NCDs चे धोके कमी करण्यासाठी भारतीय आहारातील चांगल्या पोषणासाठी काही सूचना शेअर केल्या आहेत. यामध्ये मीठ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे आणि पोटॅशियमयुक्त पदार्थांचा जसे की, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे समाविष्ट आहे. उत्तर भारतीय आहार आरोग्यासाठी इष्टतम बनवण्यासाठी तुम्ही खालील काही टिप्स फॉलो करू शकता. १. मिठाचे सेवन कमी करणे अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी मिठाला पर्याय शोधण्याचे आवाहन केले. मीठाऐवजी नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून तुम्हाला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत होऊ शकते. हेस्टॅक ॲनालिटिक्स न्यूट्रिजेनोमिक्स एक्सपर्ट भक्ती दाभी म्हणाल्या की, औषधी वनस्पती आणि मसाले समान चव देतात, तसेच एनसीडी विकसित होण्याचे धोके कमी करतात; पण मसाल्यांचे सेवन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे, कारण जास्त वापरामुळे पचनासंबंधित समस्या वाढू शकतात. २) स्वयंपाक करण्यासाठी निरोगी पद्धती निवडा तळण्याऐवजी पदार्थ कमी तेलात शिजवणे किंवा ग्रिलिंग, बेकिंग किंवा वाफाळणे असे पर्याय निवडा. स्वयंपाक करण्याच्या या पद्धतीमुळे पदार्थांमधील पोषक तत्वांचे कमी नुकसान करतात. ३) आहारातील बदल डॉ. रोहतगी यांच्या मते, व्यक्तींनी पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थ जसे की फळे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवला पाहिले, जे केवळ इलेक्ट्रोलाइट संतुलनातच नव्हे तर हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील मदत करतात. याव्यतिरिक्त, मसूर, सोयाबीन, चिकन आणि मासे यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ स्नायूंच्या बळकटीसाठी आणि संपूर्ण आरोग्यास फायदेशीर ठरतात. ४) जीवनशैलीत करा बदल आहारातील बदलांच्या पलीकडे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार, नेफ्रोलॉजी, डॉ. जयंत कुमार सांगतात की, जीवनशैलीतही बदल करणे गरजेचे आहे. यासाठी नियमित शारीरिक क्रियाकलाप, धूम्रपान सोडणे, एकूणच आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी तणाव व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ५) खाद्य पदार्थांवरील लेबल वाचा डॉ. कॅमल यांच्या मते, कोणत्याही खाद्यपदार्थांमधील पोषक घटक समजून घ्यायचे असतील तर त्यावरील लेबल वाचा, कारण या लेबलवरून तुम्ही शरीरासाठी पौष्टिक पदार्थांची निवड करू शकता, यावर डॉ. कॅमल म्हणाले की, तुम्ही काय खावे काय खाऊ नये, हे तुमच्या आरोग्यस्थितीवरून ठरवा.