वयाच्या तिशीत पोहोचल्यानंतर प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं वाढतं. व्यावसायिक स्पर्धेमुळे काम वाढतं. कुटुंबाकडेही लक्ष द्यायचं असतं. या सर्व व्यापात लोक स्वत:च्या शरीराकडे फारसं लक्ष देत नाहीत. तज्ज्ञ सांगतात, तिशीपासूनच लोकांनी शरीराची योग्य काळजी घेतली पाहिजे. तुमचे वय ३०-४० दरम्यान असेल तर 'या' चाचण्या करून घ्यायलाच हव्या. स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. शोभा गुप्ता यांनी "द इंडियन एक्स्प्रेस"शी बोलताना याबाबत सविस्तर महिती दिली आहे. तुमचा ताण कमी करा आजकाल बर्याच रुग्णांमध्ये सर्वात मोठी समस्या ही तणाव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आयुष्यात तणाव खूप वाढला आहे. कामाचा ताण आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे वाढत्या स्पर्धेच्या युगात माणूस यशाकडे धावत चालला आहे. त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. तणावापासून ताबडतोब आराम मिळवण्यासाठी काही केले नाही तर हा ताण हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा नैराश्यासारख्या गंभीर धोक्याला आमंत्रण देऊ शकतो. पोषक आहार घ्या आपल्यापैकी बरेच जण दुपारचं तसेच रात्रीचं जेवण उशिरा करतात, त्यामुळे पचनक्रिया बिघडते. पोषक आहार चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुमचा आहार चांगला असेल तर तु्म्ही निरोगी राहता, पण जर तुमचा आहार चांगला नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहारतज्ज्ञ असो की डॉक्टर, नेहमी पोषक घटकांनी भरलेला आहार घेण्याचा सल्ला देतात. ज्या महिला बाळाचं प्लॅनिंग करत आहेत, त्यांच्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे आहे. तुमच्या प्रजनन क्षमतेसाठी तुमच्या आहारातील प्रथिने महत्त्वाची आहेत, कारण ते रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात अधिक सॅलेड आणि फळांचा समावेश करा”, असे डॉ. गुप्ता म्हणाल्या. गरोदर महिला २० ते २४ या वयोगटात बहुतेक महिला गरोदर होण्याच्या योग्य वयात असतात. स्त्रिया त्यांच्या २० च्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रजननक्षम असतात आणि त्यांची प्रजनन क्षमता वयाबरोबर हळूहळू कमी होते. “वयाच्या ३५ नंतर ही घट अधिक स्पष्ट होते. रोज चाला चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. जे लोक आरोग्याबद्दल जागरूक असतात, त्यांना अनेकदा सकाळी उठून चालायला आवडतं. पण, बिझी लाईफस्टाईलमुळे अनेक जण तसे करण्यास टाळाटाळ करतात. मात्र, चालणे हा उत्तम व्यायाम आहे. यामुळे लठ्ठपणा, चिंता, नैराश्य, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच अनेक रोगांशी लढण्यास मदत होते. वयाच्या ३० नंतर महिलांनी चाचण्या करूनच घ्या स्तनाच्या कॅन्सरची तपासणी ३० वर्षांच्या वयानंतर महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. महिलांनी स्तनांची घरच्या घरी तपासणी केली पाहिजे. स्तनात गाठ लागते का? निप्पलमधून स्राव होतोय? त्वचेचा रंग बदललाय का? याची तपासणी करावी. गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढतंय. स्तनांच्या कॅन्सरनंतर भारतात महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर सर्वांत जास्त आढळून येतो. २१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी पाच वर्षांतून एकदा तरी "पॅप स्मीअर" चाचणी करून घ्यावी, अशी शिफारस केली जाते. निरोगी हाडांची देखभाल निरोगी आयुष्यासाठी हाडे निरोगी राहणे आवश्यक आहे. हाडे स्ट्रक्चरल फ्रेम तयार करतात आणि म्हणूनच शरीराच्या सुरळीत कार्यासाठी त्यांना मजबूत ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह तपासणी वयाच्या ३५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांनी प्री-डायबेटिस किंवा मधुमेह तपासण्यासाठी दर तीन वर्षांनी रक्तातील ग्लुकोज तपासणी करणे आवश्यक आहे. जर एखादी स्त्री लठ्ठ असेल किंवा कुटुंबात कुणाला मधुमेहाचा आधीच त्रास असेल तर लवकर तपासणी करणे आवश्यक आहे. ब्लड प्रेशर स्क्रीनिंग स्त्रियांना रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ज्या स्त्रियांना उच्च रक्तदाब किंवा रक्तदाबसंबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास आहे, त्यांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करणे आवश्यक आहे. थायरॉईड चाचण्या ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी थोडीशी काळजी आणि नियमित तपासणी या दोन उपायांनी आपण थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळू शकतो. हा त्रास विशेषतः महिलांना अधिक होत असल्याने त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती चाचणी जरूर करून घ्यायला हवी. व्हिटॅमिन डी चाचणी ही चाचणी तुमच्या रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी मोजते. व्हिटॅमिन डी निरोगी हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारकशक्तीसाठी महत्त्वाची आहे. हेही वाचा >> Mental Health Special : सोशल मीडियाचं व्यसन लागू शकतं ही कल्पना कंपन्या देतात का? प्री-मार्शल चाचण्या प्री-मार्शल चाचण्यांमध्येदेखील वाढ होत आहे, ज्यात थॅलेसेमिया आणि इतर हिमोग्लोबिनोपॅथिक्स आणि लैंगिक संक्रमित रोगांसारख्या रक्ताशी संबंधित विकार तपासण्यासाठी आवश्यक रक्त चाचण्या केल्या जातात. याशिवाय मेजर डिप्रेशन यांसारख्या मानसिक समस्याही तपासल्या पाहिजेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा यांसारख्या जुनाट आजारांचाही तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्हाला हे सर्व आजार अगोदरच माहीत असतील, तर त्यांच्यावर उपचार करता येतील आणि तुम्ही त्यावर योग्य ते उपचार घेऊ शकता.