“पूर्ण महिनाभर रात्रीचं जेवण न खाणं हा एक मोठा आहारातील बदल आहे आणि यामुळे आपल्या शरीरावर आणि एकूणच आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.” या सवयीला वेळेवर खाणं किंवा मधूनमधून उपवास करणं असंही म्हणतात. अलीकडच्या काळात वजन कमी होण्यासाठी आणि शरीराचं चयापचय सुधारण्यासाठी ही सवय प्रसिद्ध झाली आहे. पण, दररोजचं एक पूर्ण जेवण टाळणं शरीराच्या कामकाजात अनपेक्षित बदल करू शकतं आणि ही पद्धत सगळ्यांसाठी योग्य असेलच असं नाही.

शरीरात होणारे तात्काळ शारीरिक बदल

डॉ. ट्विन्सी अ‍ॅन सुनील, क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, बेंगळुरू, म्हणतात, “रात्रीचं जेवण थांबवल्यावर शरीरात लगेच काही बदल होऊ लागतात. जेवण न खाल्ल्यामुळे रोजचं खाणं कमी होतं, त्यामुळे शरीरात कॅलरीज कमी होतात आणि वजन कमी होण्याची शक्यता असते.”

त्या पुढे सांगतात, “ग्लायकोजन म्हणजे साठवलेली साखर, तीही कमी होते, कारण अन्न मिळत नसल्यावर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तिचा वापर करतं, त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं आणि चक्कर येणे, चिडचिड होणे आणि थकवा जाणवू लागतो.”

घरेलिन (ghrelin) हे हार्मोन भूक वाढवण्याचा संकेत देते आणि जर भूक लागण्याचे हे संकेत बराच वेळ दडपले गेले, तर तुमची नैसर्गिक जेवणाची प्रक्रिया बिघडू शकते. तसेच, जेव्हा तुम्ही खूप कमी कॅलरी घेता, तेव्हा शरीर त्यानुसार सवय करून घेते आणि तुमचा मेटाबॉलिझम (अन्न पचवण्याची गती) कमी होऊ शकतो.

दीर्घकालीन आरोग्याचे परिणाम

डॉ. सुनील म्हणतात की, रात्रीचं जेवण न खाल्ल्याने तात्पुरते फायदे जसे की वजन कमी होणे होऊ शकते, पण यामुळे अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

पोषणाची कमतरता : जेवण वगळल्याने शरीराला लागणारे अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळत नाहीत आणि आहार अपुरा राहतो. याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि एकूण ऊर्जेवर होतो.

स्नायूंची कमी : जर दररोज लागणारी प्रोटीनची मात्रा मिळाली नाही, तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायू बर्न करायला लागते, ज्यामुळे दीर्घकाळात स्नायूंचे नुकसान होते.

मेटाबॉलिझम मंदावणे : दीर्घकालीन डाएट किंवा कमी कॅलरी घेण्यामुळे BMR (म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट) कमी होतो. त्यामुळे वजन कमी करणे कठीण होते किंवा डाएट थांबल्यावर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता जास्त होते.

अयोग्य खाण्याच्या सवयी : जेवण नियमितपणे वगळल्यास खाण्याच्या चुकीच्या सवयी लागतात, जसे एकदम जास्त खाणे किंवा खाण्याचा विकार होणे.

मेटाबॉलिझम, ऊर्जा पातळी आणि एकूण दैनंदिन कामकाजावर परिणाम

डॉ. सुनील यांच्या मते, रात्रीचं जेवण वगळल्यामुळे मेटाबॉलिझमचा वेग, शरीरातील ऊर्जा आणि दिवसातील कामाची क्षमता कमी होते, त्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि शरीर जास्त चरबी साठवायला लागते. जेव्हा तुम्ही पुन्हा नेहमीप्रमाणे खायला लागता, तेव्हा वजन वाढू शकते. कारण शरीराला जेव्हा अन्न कमी मिळतंय असं वाटतं, तेव्हा ते चरबी साठवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे करायला लागतं.

डॉक्टर म्हणतात, “जर तुम्ही रात्रीचं जेवण वगळलं, तर तुम्हाला दिवसभर अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो आणि तुमच्या नेहमीच्या कामांमध्ये किंवा व्यायामात भाग घेणं कठीण जाऊ शकतं. रात्रीचं जेवण न खाल्ल्याचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो – लक्ष केंद्रित करणे, गोष्टी लक्षात ठेवणे आणि निर्णय घेणे अधिक कठीण होऊ शकते.”

कोणी रात्रीचं जेवण टाळू नये

डॉ. सुनील सांगतात की, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, मधुमेह आणि रक्तात साखर कमी होणाऱ्या रुग्णांनी तसेच खेळाडूंनी रात्रीचं जेवण टाळू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“व्यक्तींनी आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि दिवसभर संतुलित आहार घेणे हे आरोग्यासाठी आणि योग्य पोषण मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,” असे डॉक्टर indianexpress.com ला सांगतात.