श्रावणाच्या दिवसांमध्ये तुम्ही भेटाल ती व्यक्ती म्हणते,” आज माझा उपास आहे”.(खरं तर हा शब्द उपवास आहे,देवाजवळ वास या अर्थाने). तर या सर्व मंडळींचा उपास सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असतो.

सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा. चहानंतर एखादे फळ किंवा दूध-केळे(काही जणींना दुधामध्ये रताळे कुस्करून घेणेसुद्धा आवडते. उपासाला रताळे हवेच ना!), दुपारचे जेवण होण्याआधी एखादे फळ खाल्ले जाते (मात्र उपास असल्यामुळे बर्‍याचजणांना जेवणापूर्वी खाणे योग्य वाटत नाही),दुपारी जेवणामध्ये साबुदाण्याची शेंगदाणे घातलेली खिचडी तर हवीच (साबुदाण्याची खिचडी खाल्ली नाही तर तो उपास कसला?) किंवा मग वरीचा भात,दाण्याची आमटी व बटाट्याची भाजी…तीसुद्धा स्पेशल-उपासाची!.जरा उन्हं कलू लागली आणि भुकेमुळे कलकलायला लागलं तर कोणी लस्सी पिणं पसंत करतं तर कोणी साबुदाण्याचे वडे खातात ,कोणी बटाट्याचा चिवडा तोंडात टाकतात तर कोणी उपासाच्या (?) कचोरीचा आधार घेतात.चवीत बदल म्हणून ड्रायफ़्रूट कचोरी किंवा उपासाची मिसळ असतेच.सायंकाळी अशक्तपणा वाटू नये म्हणून थोडासा चहा (मात्र आधुनिक स्त्रिया उपासाच्या दिवशी चहाऐवजी कॉफी पितात!) आणि दिवसभर उपास करून श्रांतलेल्या शरीराला सायंकाळी/रात्री उपास सोडताना मिष्टान्नयुक्त सुग्रास भरपेट जेवण (दिवसभर उपास घडलेला असतो ना!) ! थोड्याफार फरकाने सर्वसाधारण माणसे असाच उपास करतात.

loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
Upvasachi bhakari and batata rassa
उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी; ही घ्या मस्त रेसिपी, फराळही होईल चमचमीत-चवदार

आणखी वाचा: Health Special: श्रावणात ‘या’ भाज्या तुम्हाला ठेवतील फिट

पण इथे आयुर्वेदाला वास्तवात अपेक्षित असलेला उपवास कुठे आहे? आमपाचन, दोषशमन, अग्नीप्रदिप्ती, मलविसर्जन, शरीरशुद्धी, देहलाघव, मनोनिग्रह व आत्मशांती देणारे लंघन कुठे आहे? मग काय “आज माझा उपास आहे” , हे सांगण्यासाठी तुम्ही उपवास करता?

हे खरंच उपवासाचे पदार्थ आहेत?
श्रावणातल्या आणि इतर ऋतूंमध्येही केल्या जाणार्‍या उपवासाच्या दिवसांमध्ये सेवनयोग्य पदार्थांकडे तुम्ही कधी नीट बघितले आहे ?साबुदाणा ,बटाटा,रताळे हे तीन उपवासाला वापरले जाणारे मुख्य पदार्थ. हे तीनही पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा त्यातही स्टार्चचा साठा असलेले पदार्थ आहेत. स्टार्चची रचना ही अतिशय घट्ट असल्याने स्टार्चच्या त्या रेणूंना विलग होण्यास म्हणजेच स्टार्चचे पचन होण्यास फार वेळ लागतो. त्यामुळे त्यांचे पचन करण्यासाठी तुमच्या अग्नीवर (पचनशक्तीवर) ताण पडतो हे निश्चित. उपवास का करायचा? तर अग्नीचे (भूक,पचनशक्ती व चयापचय) कार्य व पर्यायाने शरीराचे आरोग्य सुधारावे म्हणून, मग बटाटा,साबुदाणा, रताळे हे पचायला अधिक जड असलेले पदार्थ खाऊन उपवासाच्या मूळ हेतूवरच तुम्ही घाला का घालता?

आणखी वाचा: Health Special: पाऊस, श्रावण आणि उपास यांचं काय कनेक्शन?

त्यात पुन्हा ओल्या-गच्च साबुदाण्याचे कच्चे गोळे आणि तेसुद्धा तेलामध्ये तळून तयार केलेले साबुदाणे वडे किंवा पोट दब्ब करून टाकणारी साबुदाण्याची खिचडी उपवासाला सेवन करण्यामागे प्रयोजन काय? पावसाळ्यातील रोगकारक वातावरणामध्ये आम-पचन होण्यासाठी, आमजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी व अग्नीला प्रखर बनवून आरोग्य उत्तम करण्यासाठी पूर्वजांनी सण-व्रतांच्या निमित्ताने उपवासांची योजना केली आहे. पण स्टार्चयुक्त बटाटा व रताळ्यासारखे पदार्थ खाऊन आम-पचन किंवा अग्नीचे कार्य  उत्तम होऊन शरीराचा अग्नी (भूक,पचन व चयापचय) सुधारण्याची सुतराम शक्यता नाही.  

दक्षिण अमेरिकेमधील चिलीचा मूळनिवासी असलेला आणि १६व्या-१७व्या शतकात भारतात आलेला पचायला जड असणारा बटाटा लंघनाची किंवा हलक्या आहाराची अपेक्षा असलेल्या व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या उपवासाला कसा काय चालतो? पोर्तुगीजांनी १७ व्या-१८व्या शतकात भारतात आणलेले पचायला अतिशय जड असणारे रताळे उपवासाच्या इतक्या जुन्या परंपरेमध्ये घुसले कसे?

पित्तकारक चहा किंवा मलस्तंभक कॉफ़ी ही काहीही म्हटले तरी  आरोग्यदायक पेये नाहीत, पण उपवासाला कशी काय चालतात? १७व्या शतकात ईस्ट इंडीया कंपनीने चहाची शेती व्यापारी स्वरुपात सुरु केल्यावर चहाचा प्रचार शतकागणिक वाढत गेला, अन्यथा विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी चहा निषिद्ध द्रव्य समजला जात होता. तसाही तो आरोग्याला पोषक तर नाहीच. मग धार्मिक अधिष्ठान असलेल्या उपवासाला चहा कसा काय चालतो? भारतामध्ये सर्वप्रथम १८व्या शतकात मैसूरमध्ये आलेली आणि १८३० नंतर जिची भारतात लागवड सुरु झाली अशी ती अग्नी मंद करणारी, शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारी, मलाला कडक करणारी कॉफी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या उपवासाला कशी काय चालते? पचायला जड असणार्‍या बटाट्याचा किंवा  साबुदाण्याचा तेलात तळून बनवलेला चिवडा  “लंघन” हा मूळ हेतू असणार्‍या उपवासाला कसा काय चालू शकतो? पचायला अतिशय जड असणार्‍या खोबर्‍याची तळलेली कचोरी पावसाळ्यातल्या वातावरणात पचणार कशी? पहिलवानांना खुराक म्हणून दिला जाणार्‍या काजू-बदामाची मिसळ अग्नी मंद असताना कशी काय पचणार? हे सर्व पदार्थ आमाचे पचन करुन अग्नीचे कार्य सुधारतील की अजून आम तयार करुन अग्नीला अधिक मंद करतील? अनारोग्याला आमंत्रण देतील? वजनाने आणि आकाराने वाढत चाललेल्या समाजाला अधिकच वजनदार व स्थूल बनवतील? काय हे खरंच उपवासाचे पदार्थ आहेत?