Drinking Rock Salt Water In Summer : पाण्यात सैंधव मीठ का घालावे? किरण कुकरेजा यांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले आहे की, सैंधव मीठ (किंवा हिमालयीन गुलाबी मीठ) गरम हवामान, व्यायाम किंवा आजारपणात निर्जलीकरण आणि थकवा टाळण्यास मदत करू शकते. जेव्हा आपल्याला व्यायाम, चालणे किंवा उष्णतेमुळे खूप घाम येतो, तेव्हा आपल्या शरीरातील केवळ पाणी कमी होत नाही, तर आपण आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सदेखील गमावतो; विशेषतः सोडियम. या नुकसानामुळे चक्कर येणे, अशक्तपणा आणि स्नायू पेटकेदेखील होऊ शकतात.
सैंधव मीठ हे नैसर्गिक खनिजांनी समृद्ध असते आणि त्यात नियमित मिठापेक्षा कमी प्रक्रिया केलेले सोडियम असते. तुमच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून, घामामुळे किंवा आजारपणामुळे, विशेषतः उलट्या किंवा अतिसाराच्या वेळी जे कमी होते ते भरून काढण्यास मदत होते.
सैंधव मीठ असलेले पाणी कधी प्यावे? काही महत्त्वाच्या वेळी पाण्यात मीठ घालणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते:
सकाळी : जर तुम्हाला अशक्तपणा, चक्कर येणे किंवा डिहायड्रेटेड वाटत असेल, तर एक ग्लास पाणी चिमूटभर मिठासह पिणे, त्यामुळे ऊर्जा वाढविण्यास मदत होऊ शकते.
व्यायामानंतर : व्यायामानंतर रिहायड्रेट करणे अत्यंत आवश्यक आहे. सैंधव मिठाचं पाणी इलेक्ट्रोलाइट पातळी पुनर्संचयित करण्यास आणि व्यायामानंतरचा थकवा टाळण्यास मदत करते.
उष्ण हवामानात : उन्हात लांब चालणे किंवा बाहेर काम केल्याने जास्त घाम येऊ शकतो. मीठयुक्त पाणी प्यायल्याने सोडियमची पातळी राखण्यास मदत होते आणि उष्णतेशी संबंधित कमजोरी टाळता येते.
किती प्रमाणात सैंधव मिठाचे पाणी सुरक्षित आहे? ते किती प्रमाणात घ्यावे
पिण्याच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर सैंधव मीठ मिसळून पिण्याची शिफारस करतात. गरज पडल्यास तुम्ही दिवसातून दोन ग्लास पिऊ शकता, परंतु हे प्रमाण ओलांडू नये, विशेषतः जर तुम्ही आधीच खारट पदार्थांचे सेवन करत असाल तर.
सैंधव मिठाचे पाणी कोणी टाळावे?
हायड्रेटिंगसाठी याचं सेवन अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकते, परंतु ते प्रत्येकासाठी योग्य नाही. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर ही सवय टाळा, कारण अतिरिक्त सोडियममुळे ते आणखी बिघडू शकते. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असल्यास सोडियम संतुलनाचे बारकाईने व्यवस्थापन आवश्यक आहे. दिनचर्येत बदल करण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा किंवा पात्र पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या.