गणेशोत्सवात गोडधोडाच्या आणि प्रसंगी तिखटाच्या पदार्थाचाही नैवेद्य गौरी-गणपतींना दाखवला जातो. आरत्यांनंतर हातावर मिळणारा प्रसाद ही तर लहानथोरांच्या आवडीची गोष्ट. गणेश चतुर्थीला घरोघरी होणाऱ्या उकडीच्या मोदकांपासून गणेश विसर्जनाला दिल्या जाणाऱ्या तिखट-चटकदार वाटल्या डाळीच्या प्रसादापर्यंतचे विविध पदार्थ नुसते चविष्टच नव्हेत, तर पौष्टिकही आहेत.

मोदक / खिरापत

घरी गणपती आले की पहिल्या दिवशी उकडीचे किंवा तळणीचे मोदक व्हायचेच. अनेक घरांमध्ये रोजच्या आरतीसाठी साखर-खोबरे किंवा गूळ-खोबऱ्याची खिरापत करूनच ठेवतात.

ओले किंवा सुके खोबरे हा त्यातील महत्त्वाचा घटक. या दोन्ही प्रकारच्या खोबऱ्याचे गुणधर्म साधारणत: सारखेच असतात. बुरशी, जिवाणू आणि विषाणूंचाही प्रतिकार करण्याचे गुण खोबऱ्यात आहेत. या ऋतूत विविध प्रकारच्या संसर्गाचा प्रादुर्भाव असतो. त्यापासून दूर राहण्यासाठी आहारात खोबरे असले तर मदतच होते. खोबरे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. खोबऱ्यातील तेल थायरॉईडचे कार्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते आणि त्यामुळे चयापचय क्रिया सुधारून वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी करणे आणि ‘अँटिऑक्सिडंट’ परिणाम देणे यासाठीही खोबरे चांगले.

खोबऱ्याबरोबर गूळ हा आलाच. गूळ पाचक गुणधर्माचा, भूक वाढवणारा आणि गॅसनाशक आहे. गूळ पोटात गेल्यावर अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड तयार होते आणि ते पचनक्रिया वाढवून अपचन टाळण्यास मदत करते. गूळ यकृतासाठीही चांगला आहे. त्याच्या सेवनाने जे पाचक स्राव तयार होतात त्यामुळे या दिवसात खाल्ले जाणारे तेलकट-तुपकट व जड पदार्थ पचण्यास फायदा होतो.

उकडीच्या मोदकावर साजूक तुपाची धार हवीच. साजूक तूप हेही पाचक रसांचे स्रवण होण्यास उपयुक्त ठरते. पचनसंस्थेच्या स्नायूंची हालचाल वाढून अन्न योग्य वेळी पुढे सरकण्यासाठी तुपामुळे मदत होते. पोट फुगणे, दुखणे हे त्रासही कमी होतात. म्हणूनच मोदक, मसालेभात अशा पदार्थावर साजूक तूप घेण्याची पूर्वापार पद्धत आहे.

खिरापत म्हणजे प्रामुख्याने सुके खोबरे आणि पिठीसाखर एकत्र मिसळून ठेवलेली असते. त्यात खारीक पूड, सुकामेवा अशा गोष्टीही घातल्या जातात. खिरापतीतील साखर शक्यतो खडीसाखर असावी. त्यातही चौकोनी आकाराची पत्री खडीसाखर नव्हे तर खडीसाखरेचे मोठाले खडे मिळतात त्यांची बारीक पूड करून वापरावी. खडीसाखर पित्तशामक असते. या दिवसांत पाऊस कमी होऊन भूक हळूहळू वाढू लागलेली असते. परंतु त्याच वेळी उत्सवामुळे जास्त खाल्ले जाण्याचेही प्रसंग वाढतात. अशात अ‍ॅसिडिटी होण्याची शक्यता असते. खडीसाखर घातलेली खिरापत रोज थोडी खाण्यात असेल तर ती दूर ठेवण्यास फायदा होतो. खिरापतीत वेलची पूडदेखील अवश्य घालावी. त्यामुळे त्याचा पित्तशामक परिणाम वाढेल.

खिरापतीत अनेकांकडे खारीक पूड किंवा खारकेचे तुकडे घालतात. काम करून दमलेले असताना खारीक पटकन ऊर्जा देते तसेच हिरडय़ा आणि दातांसाठीही ती चांगली. खारकेतील लोह व तांबे रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. वाईट कोलेस्टेरॉल कमी करणे व उपयुक्त कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी खारकेचीही मदत होते.

अनेक जणांकडे गणेश विसर्जनाच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या प्रसादात वाटली डाळ करतात. भिजत घातलेली हरभरा डाळ वाटून परतून त्यात मिरची, कोथिंबीर घालून ही डाळ करतात. परंतु हरभरा डाळीऐवजी त्यासाठी मूगडाळ वापरल्यास अधिक चांगले, कारण हरभरा डाळ अधिक जड असते. शिवाय डाळ परतताना त्यात आले, धने-जिरे व दालचिनीची पूड, भरपूर कोथिंबीर घालावी आणि लिंबूही पिळावे. त्यामुळे डाळ पचण्यास मदत होते. ही डाळ चटकदार तर लागतेच, शिवाय त्यातून प्रथिनेही चांगली मिळतात.