कव्हरस्टोरी
नुकत्याच भारतीय नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रमादित्यमुळे आपलं नाविक सामथ्र्य वाढलं आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मते तर ती युद्धनीतीमधील ‘गेम चेंजर’ ठरू शकते. असं काय आहे आयएनएस विक्रमादित्यमध्ये ?
सर्वानीच श्वास रोखलेले..
गेली नऊ वर्षे ज्या गोष्टी परिश्रमपूर्वक केल्या त्या साऱ्यांचा कस लागण्याचा तो क्षण होता. लढाऊ विमानांच्या ताफ्याने वेगवेगळ्या दोन विमानतळांवरून उड्डाण केले होते.. ती विमाने महासागरामध्ये शोध घेत होती ‘आयएनएस विक्रमादित्य’ या भारतीय नौदलाच्या अजस्र विमानवाहू युद्धनौकेचा!
अजस्र युद्धनौका असल्याने तिचा वेध घ्यायला रडार यंत्रणेला फारसा वेळ लागणार नाही, असाच सगळ्यांचा कयास होता. प्रत्यक्षात ही अशीच युद्धपरिस्थिती असेल तर त्या युद्धात ‘आयएनएस विक्रमादित्य’चा टिकाव कसा लागणार, या विषयीचे अनेकानेक शंकांचे मोहोळ त्याची धुरा सांभाळणाऱ्या कमोडोर सूरज बेरी यांच्या डोक्यात घोंघावत होते. अर्थात त्यांच्या कपाळावर शंकेची आठी चढण्याचे कारणही तसेच होते. कारण विमानहल्ला झाला तर त्यापासून बचाव करण्यासाठी ‘आयएनएस विक्रमादित्य’कडे कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. लढाऊ विमाने जवळ आली तरच त्यांच्यावर हल्ला करण्याची यंत्रणा या विमानवाहू युद्धनौकेकडे आहे. पण ती जवळ आली तरच !
पण त्या ऐवजी.. त्यांनी लांबूनच क्षेपणास्त्र डागले तर? ..तर मात्र ‘आयएनएस विक्रमादित्य’चे काही खरे नाही! देशाची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका काही क्षणांतच सागराचा तळ गाठू शकते. आजवर देशाने त्यावर सुमारे ५ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले आहेत. ते पैसे तर व्यर्थ ठरतीलच पण त्याच वेळेस त्यावर असलेले सुमारे १६०० ते १८०० नौसैनिक आणि भारतीय नौदलाचे अधिकारीही गमवावे लागतील.. या साऱ्याचा तणाव कमोडोर बेरी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता..
आता कसाला लागली होती ती लढाऊ विमानांना किंवा शत्रूच्या शक्तिशाली रडार यंत्रणेलाही चकवा देणारी ‘आयएनएस विक्रमादित्य’साठी खास विकसित केलेली वेगळी इलेक्ट्रॉनिक युद्धयंत्रणा! फक्त काही मिनिटांचाच हा खेळ होता.. दर मिनिटाला काही किलोमीटर्स एवढय़ा वेगात विमाने पुढे सरकत होती.. पण नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत या लढाऊ विमानांना ‘आयएनएस विक्रमादित्य’ दिसू शकली नाही! त्या नव्या युद्धयंत्रणेची चाचणी यशस्वी ठरली होती, कारण एवढय़ा टप्प्यात आल्यानंतर त्या विमानांचा खातमा करण्यासाठी ‘आयएनएस विक्रमादित्य’वरची यंत्रणा पुरती सक्षम होती! ..युद्धखेळ संपला आणि कमोडोर बेरींच्या चेहरा उजळला.. आणिजिंकल्याचा आविर्भाव त्यांच्या देहबोलीमध्ये खेळू लागला! त्यांच्या तोंडून सहज वाक्य फेकले गेले ‘शी विल बी अ गेम चेंजर!’
असे काय आहे या ‘आयएनएस विक्रमादित्य’मध्ये की, त्यामुळे कमोडोर बेरी म्हणाले की, ही नक्कीच गेम चेंजर ठरणार! ते समजून घ्यायचे असेल तर मग आपल्याला सध्याची भूराजकीय परिस्थिती आणि विविध देशांची युद्धनीती, त्यांच्या नौदलांचे असलेले सामथ्र्य, नौदलांच्या सामर्थ्यांमध्ये विमानवाहू युद्धनौकेला असलेले महत्त्व आणि विक्रमादित्यचे वैशिष्टय़ अशा सर्व बाबी समजावून घ्याव्या लागतात.

‘आयएनएस विक्रमादित्य’ संदर्भातील ही आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे.
’    लांबी- २८४ मीटर्स
’    आकारमान- ४४ हजार ५७० टन
’    उंची- ६० मीटर्स
(२० मजले, २२ डेक्स)
’    कमाल वेगमर्यादा- ताशी / ३० सागरी मैल
’    कमाल क्षमता : ताशी /१८ मैल वेगाने तब्बल ७ हजार सागरी मैल अंतर
’    विमाने वाहून नेण्याची क्षमता : एकूण ३४
’    मिग २९ के- २४
’    हेलिकॉप्टर्स – १०

‘मिग- २९ के’ची हल्लाबोल क्षमता :
’    पल्ला तब्बल १८०० किलोमीटर्स
’    कमाल उंची गाठली जाणारी- ५८ हजार फूट
’    स्टोबार (शॉर्टटेकऑफ आणि अ‍ॅरेस्टेड रिकव्हरी)
या लढाऊ विमानांतून वाहून नेला जाणारा शस्त्रसाठा :
’    आर- ७३ आणि
’    आरव्हीव्ही- एई हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली गायडेट मिसाइल्स.
’    केएच-३५ई युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र
’    केएबी ५००आर/ओडी टीव्ही गायडेड बॉम्ब आणि एस-८ केओएम रॉकेट्स

हा सारा शस्त्रसंभार घेऊन फिरणारी ही विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक तरंगते शहरच आहे. त्यावरील लोकसंख्या आहे १६०० ते १८००. यात नौसैनिक आणि नौदल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका वेगळ्या अर्थाने पाहायचे तर हे तरंगते शहर नव्हे तर तरंगती युद्धभूमीच आहे! म्हणूनच तर अजस्र विमानवाहू युद्धनौका पाहून शत्रूच्या नौदल अधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरते. विमानवाहू युद्धनौकेमुळे शत्रूच्या अगदी जवळ जाऊन भेदक मारा करता येतो. विमानवाहू युद्धनौका युद्धातील विजयाचे पारडे सहज फिरवू शकते! म्हणूनच नौदलांच्या युद्धनीतीमध्ये विमानवाहू युद्धनौकांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
भारतीय नौदलामध्ये सध्या दाखल झालेल्या आणि कारवार येथील ‘आयएनएस कदंब’ या भारतीय नौदल तळावर पोहोचलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेमध्ये सध्या एक त्रुटी आहे. त्यामुळेच आपत्कालीन परिस्थिती आली तर ती आताच ताब्यात घेणे चांगले असेल की, धोकादायक त्याचा अंदाज भारतीय नौदल अधिकाऱ्यांना घ्यायचा होता म्हणूनच तर ती चाचणी महत्त्वाची होती. सध्या या युद्धनौकेवर विमानविरोधी हल्ला करणारी कोणतीही यंत्रणा नाही. ती आता भारतात पोहोचल्यानंतर बसविण्यात येणार आहे. मात्र त्या यंत्रणेशिवायही ती सक्षम आहे काय, याचीच ती युद्धचाचणी होती. या युद्धनौकेचा विशेष म्हणजे त्यासाठी स्टेल्थचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे असा धातू जो रडार यंत्रणेला चकवा देतो. त्या शिवाय स्टेल्थच्या रचनेमध्येही सर्व तीव्र स्वरूपाचे कोन काढून टाकलेले असतात. याशिवाय त्या युद्धनौकेला ढालीप्रमाणे संरक्षण देणारे एक इलेक्ट्रॉनिक कव्हरही विकसित करण्यात आले आहे. त्यामुळेच अजस्र असली तरीही ही युद्धनौका नजरेच्या टप्प्यात आल्याशिवाय दिसणार नाही, अशी खात्री यंत्रणा विकसित करणाऱ्या भारतीय आणि रशियन तज्ज्ञांना होती. त्याचीच खातरजमा करून घेण्याची ती चाचणी होती! अर्थात हे तज्ज्ञ त्यात उत्तीर्ण झाले कारण या विमानांना तिचा ठाव रडार आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातूनही घेता आला नाही! म्हणून कमोडोर बेरी म्हणाले, शी इज अ गेम चेंजर!
‘आयएनएस विक्रमादित्य’चा आजवरचा इतिहासही आपल्याला समजून घ्यावा लागेल.  कीव्ह प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका १९८७ मध्ये बाकू या नावाने रशियन नौदलामध्ये दाखल झाली. शीतयुद्धानंतर रशिया विघटनाच्या उंबरठय़ावर उभा होता त्या वेळेस या विमानवाहू युद्धनौकेला सांभाळणे जिकिरीचे झाले. दरम्यान, तिचे नामकरण गोर्शकॉव्ह असे करण्यात आले होते. ही गोर्शकॉव्ह १९९५ मध्ये रशियन नौदलातून निवृत्त झाली.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात एनडीए सरकारने मित्रराष्ट्र असलेल्या रशियासोबत करार करण्याचा निर्णय घेतला.  रशियन सरकारने ही विमानवाहू युद्धनौका भारताला भेट देत असल्याचे सांगितले, मात्र त्याच वेळेस तिच्या आधुनिकीकरणाचा खर्च पूर्णपणे भारताने करावा आणि त्यावरील विमाने रशियाकडून घ्यावीत, असे सुचविले. प्रत्यक्षात सुचविले तेव्हा हा सारा खर्च केवळ ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा होता. नंतर तो वाढत वाढत तो ७०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला. २००४ मध्ये भारत-रशिया या दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्षात करार झाला तेव्हा ही किंमत दीड अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. त्यातील ९७४ दशलक्ष डॉलर्स डागडुजीवर तर उरलेली रक्कम लढाऊ विमाने आदी बाबींवर खर्च होणार होती.
पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसार आयएनएस विक्रमादित्यचे काम पूर्ण होऊन ती २००८मध्येच भारतीय नौदलात दाखल होणार होती. मात्र त्यात अनंत अडचणी आल्या. त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजेच १७ नोव्हेंबर २०१३ रोजी ती भारतीय नौदलाच्या ताब्यात आली तेव्हा तब्बल नऊ वर्षे उलटून गेली होती. या काळात या व्यवहारात सहभागी भारतीय नौदल अधिकाऱ्यावर रशियन मोहिनीने मायाजाल फेकल्याची घटनाही घडली.. आता भारताने ती ताब्यात घेईपर्यंत आयएनएस विक्रमादित्यच्या आधुनिकिकरणावरील खर्च लढाऊ विमानांच्या किमतीसह २.३३ अब्ज अमेरिकन डॉलर्स तर इतर आनुषंगिक खर्च २ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला. एकूणात काय तर आजपर्यंत साधारणपणे ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा खर्च ‘आयएनएस विक्रमादित्य’वर भारत सरकारतर्फे करण्यात आला आहे.
खरोखरच एवढा खर्च करणे आवश्यक होते का? शिवाय विमानवाहू युद्धनौका म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखेच असते. म्हणजे पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सचा मूळ खर्च केल्यानंतरही खर्च थांबलेला नाही. आता तिला पोसण्याचा खर्च. एवढे सारे आपण का करतो, या प्रश्नाचे उत्तर हे तिच्या सामर्थ्यांमध्ये दडलेले आहे. त्यासाठी आपल्याला जागतिक सद्यस्थिती समजून घ्यावी लागेल. भारताच्याच बाबतीत बोलायचे तर आयएनएस विक्रांत या नौदलाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेमुळे आपल्याला पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकणे शक्य झाले होते. सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये आयएनएस विराट ही एकमेव विमानवाहू युद्धनौका होती आणि तीदेखील आता तब्बल ५५ वर्षे वयाची झाली आहे. तिचे आयुष्यमान आपण दरखेपेस ५-१० वर्षांनी वाढवतो. तिने तिची कमाल आयुर्मर्यादा केव्हाच पार केली आहे. फार तर अजून चार-पाच वर्षे ती काढू शकेल. त्यामुळे आयएनएस विक्रमादित्य नौदलात दाखल होणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भारताचा अतिशय जवळचा हितशत्रू असलेला चीन आता खूप मोठय़ा प्रमाणावर डोके वर काढतो आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केली असून आता श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आदी सर्व शेजारील राष्ट्रांनाही हाताशी धरून भारताची कोंडी केली आहे. आजवर भारताचा पूर्व किनारा सुरक्षित होता, पण म्यानमारमधील बंदर चीनने भाडेपट्टय़ावर घेतल्याने भारताचा पूर्व किनारा सुरक्षित नाही. एकूणच यामुळे अरबी समुद्र, हिंदूी महासागर आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका असणे ही भारताची गरज आहे. आता विक्रमादित्यमुळे त्यांची संख्या दोनवर गेलेली असली तरी काही वर्षांत ‘आयएनएस विराट’ला निवृत्ती द्यावी लागेल. तोपर्यंत नवीन भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ २०१८च्या अखेरीपर्यंत नौदलात दाखल झालेली असेल. विमानवाहू युद्धनौकेचा वावर हाच सागरावर दरारा किंवा वचक बसविण्याचा असतो. त्यामुळेच ती महत्त्वाची ठरते. कोणत्याही क्षणी जोरदार युद्ध पुकारण्याची तिची क्षमता आणि तिच्यावरील भेदक शस्त्रसाठा शत्रूवर वचक ठेवण्यास पुरेसा असतो.
किंबहुना याचीच जाणीव झाल्यामुळे ९०च्या दशकात चीनने स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका बनविण्यास घेतली. गेल्याच वर्षी लिओनिंग ही चिनी बनावटीची युद्धनौका चीनच्या ताफ्यात दाखलही झाली. तिचा वापर चीनतर्फे व्हिएतनाम, जपान, इंडोनेशिया यांच्यावर वचक ठेवण्यासाठी केला जातो आहे. अलीकडच्या काळातील विमानवाहू युद्धनौकांच्या बाबतीत बोलायचे तर अमेरिकेने त्यांच्या भूभागापासून अतिशय दूर असलेल्या अफगाणिस्तान आणि इराक विरोधातील युद्धांना सुरुवात केली तीच मुळी त्यांच्या अतिशय जवळ अमेरिकी युद्धनौका नेऊन त्यावरूनच. अमेरिकन युद्धनौकांवरून उड्डाण केलेल्या लढाऊ विमानांनीच ते युद्ध सुरू केले आणि पूर्णत्वासही नेले! म्हणून विमानवाहू युद्धनौका पोसणे पांढरा हत्ती असले तरीही कोणत्याही देशासाठी त्या आवश्यक असतात, कारण हा पांढरा हत्तीच शत्रूवर वचक ठेवून असतो.
जगातील ८५ टक्के व्यवहार आजही सागरी मार्गाने होतो. त्यामुळे सागरावर राज्य करणारा देशच महासत्ता ठरू शकतो. म्हणूनच तर याची जाणीव असलेल्या अमेरिकन नौदलाच्या ताफ्यात निमिट्झ् वर्गातील एकूण ११ जगातील विमानवाहू युद्धनौका आहेत. भारताकडे आता दोन तर चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, ब्राझिल, थायलंड या देशांकडे प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका आहे. चीनने आता विमानवाहू युद्धनौकांच्या बांधणीसाठी एक वेगवान प्रकल्प हाती घेतला असून त्यांना विमानवाहू युद्धनौकांची संख्या वेगात वाढवून जगावर राज्य करायचे आहे! भारतही महासत्ता होण्याचे स्वप्न पाहात असेल तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी विमानवाहू युद्धनौकांची संख्या किमान तीन असणे आपल्यासाठीही आवश्यकच आहे!
सद्यस्थितीत पाणबुडय़ांची संख्या आणि मारक शक्ती याबाबत भारत पाकिस्तानच्याही मागे आहे. मात्र आपल्या भात्यात असलेल्या दोन विमानवाहू युद्धनौकांमुळे पाकिस्तान कोणतीही आगळीक करण्याचाही विचार करू शकत नाही, अशी स्थिती आहे. मात्र चीनकडील विमानवाहू युद्धनौकांची संख्या वाढल्यास ती भारतासाठी केवळ चिंतेची बाबच नसेल तर मोठीच डोकेदुखी ठरेल म्हणून आता अतिवेगवान अशा विमानवाहू युद्धनौकांच्या दिशेने प्रवास अटळ आहे.. पण हे सारे होईल तेव्हा होईल! सध्या तरी देरसे आये, दुरुस्त आये अशीच आयएनएस विक्रमादित्यची अवस्था असून तिच्या येण्याने युद्धनीतीची परिमाणे बदलून गेली आहेत. शिवाय तिच्या शत्रूलाही चकवा देण्याच्या सामर्थ्यांने तर भल्याभल्यांनाही भारताकडे वाकडय़ा नजरेने पाहताना विचारच करावा लागेल, म्हणूनच तर कमोडोर सूरज बेरी म्हणाले, ‘शी इज अ गेम चेंजर!’

खाण्यापिण्याची रसद पूर्णपणे भरलेली ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस कार्यरत राहू शकते आणि त्या अवस्थेतील तिचा कमाल पल्ला हा १३ हजार किलोमीटर्सचा आहे.

लढाऊ विमानांचे उड्डाण आणि त्यांचे लॅण्डिंग यासाठी पूर्णपणे वेगळी यंत्रणा आणि धावपट्टी विकसित करण्यात आली आहे. मिग विमानांच्या लॅण्डिंगसाठी अ‍ॅरेस्टर वायर तंत्राचा उपयोग केला जाणार आहे. दूरसंवादासाठी अतिशय उत्तम दूरसंवाद यंत्रणेने युक्त असा स्वतंत्र कक्ष ही आयएनएस विक्रमादित्यची खासियत आहे!

‘मिग २९-के’ भेदक शस्त्रसंभार !
विक्रमादित्यवरील ‘मिग २९-के’च्या उड्डाण व लॅण्डिंगसाठी स्वतंत्र यंत्रणाच विकसित करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस विक्रांतवर अ‍ॅरेस्टर वायर होती त्याप्रमाणे यावरही अ‍ॅरेस्टर वायर असून लॅण्डिंग करणारे लढाऊ विमान त्यात पकडून ते थांबविण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. या लढाऊ विमानांचा पल्ला थेट १३०० किलोमीटर्सचा असून ती ५८ हजार उंचीपर्यंत जाऊ शकतात. त्यावर बसविण्यात आलेला शस्त्रसंभारही अतिसंहारक असाच आहे. त्यावर आर-७३ आणि आरव्हीव्ही-एई ही हवेतून हवेत मारा करणारी गायडेड क्षेपणास्त्रे बसविलेली असून त्याशिवाय केएच-३५ई ही युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे आणि कॅब ५०० केआर-ओडी टीव्ही गायडेड बॉम्ब आणि एस-८ कॉम रॉकेट्सही बसविलेली आहेत!

२२ डेक्सचे तरंगते शहर !
विक्रमादित्य ६० मीटर्स उंच असून त्याच्या २० मजल्यांमध्ये २२ डेक्स आहेत. यावर असलेल्या १६०० ते १८०० नौसैनिकांना महिन्याभरासाठी दर महिन्याला एक लाख अंडी, २० हजार लीटर्स दूध आणि १६ टन तांदूळ लागेल, असा अंदाज आहे. ही रसद पूर्ण भरलेल्या अवस्थेत ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस प्रवास करू शकते. दर दिवशी ४०० टन खारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी यावर एक जलशुद्धीकरण प्रकल्पच वसविण्यात आला आहे.
नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर
भारतीय नौदलाने आता युद्धनीतीसाठी नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअरचा मार्ग स्वीकारला असून त्यासाठी या विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद यंत्रणा आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे. विमानांच्या उड्डाणांच्या निरीक्षणांसाठी थेट लाइव्ह व्हिडीओ कंट्रोलचाही वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे युद्धनौकेचे परिचालन आणि युद्धयंत्रणा हेच अतिअद्ययावत आहे अशातला भाग नाही तर नौसैनिक व अधिकाऱ्यांची निवास व्यवस्थाही आजवरच्या तुलनेत खूपच चांगली राखण्यात आली आहे. ५०० किलोमीटर्सच्या परिघातील प्रत्येक बाब स्पष्टपणे दिसेल अशी रडार यंत्रणा यावर बसविण्यात आली आहे.