नाटक या मनोरंजनाच्या माध्यमाने खरंतर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अगदी संगीत रंगभूमीपासून ते हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांना आजही मराठी प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतो. सिनेमा, दूरचित्रवाणीवरील असंख्य मालिका, संगणकावरील विविध खेळ, सोशल नेटवर्किंग साइटस अशी एक ना अनेक मनोरंजनाची साधने हाताशी असतानादेखील नाटक या प्रकाराला आजही मोठा लोकाश्रय लाभलेला दिसतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भाला नैसर्गिक वारशाबरोबरच कलेचा तसेच सांस्कृतिक वारसासुद्धा लाभला आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या प्रदेशाला झाडीपट्टी असे म्हटले जाते. जंगलाचे अर्थात झाडीचे प्रमाण जास्त असलेली पट्टी म्हणजे भूप्रदेश म्हणजे झाडीपट्टी असे सरळ साधे समीकरण आहे. नक्षलवादी चळवळीमुळे सुद्धा हा प्रदेश कायम चर्चेत असतो. घनदाट जंगले, पाच व्याघ्रप्रकल्प आणि कोष्टी, गोंड, वंजारी, मंजा, धीवर, गोवारी, धनगर, कुणली, माळी, तेली आणि छत्तीसगढी अशा आदिवासी जमातींनी नटलेला हा समृद्ध प्रदेश. इथल्या लोकांची उपजीविका जंगलांवर आणि अर्थातच शेतीवर अवलंबून आहे. नागपूरपासून २०० कि.मी. दूर असलेला हा प्रदेश. या प्रदेशाची अजून एक खासियत म्हणजे इथे मोठय़ा प्रमाणावर विकसित झालेली झाडीपट्टी रंगभूमी!! शेतीकामातून थकूनभागून घरी आल्यावर चार घटका करमणूक हवीच. त्यांच्यासाठी इथे ही रंगभूमी असून त्यांची नाटकं मोठय़ा प्रमाणावर बघितली जातात. खूप मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने इथे होत असते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा झाडीपट्टी रंगभूमीवर अवलंबून आहे.
या रंगभूमीवर रीतसर नाटकं बसवली जातात. विविध खेडेगावातून या नाटक कंपन्यांना सुपारी दिली जाते आणि त्या कंपन्या आपल्या नाटकाचे खेळ या गावागावांतून करत असतात. सुपारी देताना ठरलेल्या बिदागीच्या अर्धी रक्कम द्यावी लागते आणि उरलेली अर्धी रक्कम नाटकाला जो मध्यंतर असतो तेव्हा द्यावी लागते. तेव्हा ती दिली गेली नाही तर ही मंडळी नाटक तिथेच अध्र्यावर सोडून निघून जातात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात ही मंडळी आपल्या नाटकांचे प्रयोग या प्रदेशातील गावागावांत करत असतात. याच काळात इथे शंकरपट या नावाने बैलगाडा शर्यतींचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन केले जाते. दिवसभर या शर्यती झाल्यावर रात्रीचा प्रवास करणे जंगल असल्यामुळे कायमच धोक्याचे असते. मग या थकलेल्या शेतकरी मंडळींसाठी सुरू होतात नाटकं. रात्री अंदाजे ११ वाजल्या नंतर ही नाटकं सुरू होतात ती अगदी पहाटेपर्यंत चालू असतात. विनोदी, सामाजिक, राजकीय असे अनेक विषय या नाटकांमधून मांडले जातात. पूर्वीच्या काळी नट, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, वादक अशी अनेक कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे सादरीकरण करीत असत. त्यांना जमीनदार, सावकार, व्यापारी असे गावचे सधन लोक पैसे देऊन बोलावत असत आणि मग अख्ख्या गावाला मोफत नाटक बघायची सोय केलेली असे. परंतु बदलत्या आर्थिक-सामाजिक-राजकीय परिस्थितीमध्ये या नाटकांना आता तिकिटे लावली जातात. अगदी २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत तिकिटाचे दर असतात. १०० रुपये हा दर खुर्चीसाठी आणि इतर दर हे खाली जमिनीवर बसून नाटक पाहण्यासाठी असतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार काही काही नाटकांचा गल्ला जवळ जवळ दोन ते तीन लाख एवढा जमा होतो कारण या नाटकांना येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दोन ते तीन हजार एवढी मोठ्ठीसुद्धा असू शकते. मॅगसेसे विजेते पत्रकार पी. साईनाथ यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार पाच महिन्यांत या रंगभूमी वर जवळजवळ २५ कोटींची उलाढाल होत असते. झाडीपट्टी रंगभूमीसाठी नक्कीच ही सन्मानाची गोष्ट आहे.
नाटकाच्या सादरीकरणासाठी एक मोठा लाकडी रंगमंच उभारला जातो. त्याच्या समोरची जमीन खणून मोठ्ठा खड्डा केला जातो आणि त्यात खुच्र्या ठेवल्या जातात जेणेकरून पाठीमागे जमिनीवर बसलेल्या लोकांमध्ये खुर्चीवर बसलेले प्रेक्षक येऊ नयेत यासाठीची ही सोय असते. नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी योजना अगदी उत्तम केलेली असते. संगीत नाटकांसारखाच वाद्यवृंद रंगमंचाच्या समोर बसलेला असतो. विषय कोणताही असला तरी संगीत आणि गाणी ही त्यात असलीच पाहिजेत असा जणू अलिखित नियमच इथे आहे. शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर विषयावर सुद्धा इथे नाटकं सादर केली जातात. रंगमंच उभारणीमध्ये यजमान असलेला सारा गावच सामील झालेला असतो. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक विषय या रंगमंचावरून हाताळले जातात. पूर्वीच्या काळी स्त्रिया नाटकांमधून कामे करीत नसत त्यामुळे स्त्री पार्ट पुरुषच करीत असत; परंतु आता स्त्रियासुद्धा या नाटकांमधून उत्तम भूमिका वठवताना दिसतात. इथले कलाकार काही प्रशिक्षित नट नसतात. सतत प्रयोग सादर करून करून ते आपोआपच शिकत जातात. स्टेजच्या पाठीमागे कलाकारांना संवाद सांगण्यासाठी प्रॉम्पटर्सची एक फळीच तैनात केलेली असते. रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी रंगमंचाच्या मागची जागा राखीव असते. ती कनाती आणि पडदे यांनी बंद केलेली असते. थंडी आणि जंगली श्वापदांचे भय यामुळे ही सगळी जागा अशा रीतीने संरक्षित करतात.
इथे येणारा प्रेक्षकसुद्धा या नाटकांना सरावलेला असतो. कित्येक लोकांनी एकाच नाटकाचे बरेच प्रयोग पाहिलेले असतात, त्यामुळे अनेक संवाद त्यांना अगदी तोंडपाठ झालेले असतात. काही वेळेला जर रंगभूमीवरील नट आपला संवाद विसरला किंवा काही वेगळेच म्हणू लागला तर समोर बसलेले प्रेक्षक त्याला योग्य संवाद लगेच तिथल्या तिथे म्हणून दाखवतात. याचमुळे इथे अनेकदा नाटकांचे शेवट हे मुद्दाम बदललेले असतात. लोकांना माहिती असलेल्या नाटकाच्या कथानकात अनपेक्षित बदल करून नाटकाचा शेवट वेगळाच करायचा हे दिग्दर्शकाचे हे एक मोठे कामच असते. काहीतरी नावीन्य आणण्याचा हा एक सुंदर प्रयत्न असतो. या नाटकांमध्ये पूर्वी स्थानिक भाषेचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असे. परंतु बदलत्या काळानुसार शहरी भाषेची छाप आता या ठिकाणी पाहायला मिळते. काही रंगकर्मीनी, त्यांच्या संस्थांनी आता इथे कायम स्वरूपाचे सभागृह उभारले आहे. बोरकर या कुटुंबातील आता चौथी पिढी या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्या मंडळींनी जवळजवळ १०० नाटके बसवलेली आहेत. लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि व्यवस्थापक असलेले सदानंद बोरकर हे त्या नाटक मंडळाचे अध्वर्यू मानले जातात. डिसेंबर २००८ मध्ये त्रिचूर, केरळ इथे भरलेल्या सार्क संमेलनात बोरकर मंडळींच्या ‘आत्महत्या’ या नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण झाले तेव्हा या रंगभूमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. ही रंगभूमी आता झाडीपट्टी या सीमित क्षेत्राच्या कक्षा ओलांडून बाहेर पडली. याची दखल आता महाराष्ट्र घेईल आणि एक संपन्न नाटय़प्रयोग सर्वदूर पोहोचेल, अशी आशा करायला हरकत नाही.
केव्हा जावे? कसे जावे?
ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांच्या काळात भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्य़ातील विविध गावांमधून प्रयोग केले जातात. सर्वसाधारणपणे तालुक्याच्या ठिकाणी हमखास प्रयोग होतात. वडसा या तालुक्याच्या गावी अनेक झाडीपट्टी मंडळाची कार्यालये आहेत.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special
First published on: 20-02-2015 at 01:14 IST