|| चिन्मय गवाणकर, डॉ. आशीष तेंडुलकर

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला इतक्या प्रचंड प्रमाणावर बहुमत मिळेल असा अंदाज प्रसार माध्यमांसह विविध सर्वेक्षणांतूनही व्यक्त केला गेला नव्हता. मात्र, इंटरनेटवर निवडणुकीआधीच्या तीन-चार महिन्यांतले राजकीय ‘ट्रेण्ड्स’ अभ्यासले असता हा निकाल खचितच चकित करणारा म्हणता येत नाही.

नुकत्याच देशात लोकसभा निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार प्रचंड बहुमताने निवडून आले. सगळे राजकीय पंडित ‘भाजपच्या जागा कमी होतील/ कदाचित इतर पक्षांची मदत रालोआला घ्यावी लागेल..’ वगैरे वगैरे छातीठोकपणे सांगत असताना भाजप स्वबळावर ३०० + जागा मिळवेल आणि रालोआ ३५० च्या पुढे जाईल असे कुणालाही- अगदी एक्झिट पोलवाल्या मीडियावाल्यांनाही स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.

भारतासारख्या खंडप्राय देशात विविध जाती-धर्माच्या, भाषांच्या, प्रांतीय अस्मितेच्या कल्लोळात लोक नक्की कशाला पाहून मतदान करतात आणि त्यांचा डिजिटल- म्हणजे ऑनलाइन गुगल सच्रेसचा उपलब्ध असलेला डेटा वापरून त्यांचा कल आपल्याला आधी जाणून घेता येईल का, हा डेटा सायन्समधला  आव्हानात्मक प्रश्न आहे. लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन केलेले एक्झिट पोल्ससुद्धा चुकतात; तिथे लोक निवडणुकीआधी तीन महिने ऑनलाइन काय सर्च करतात यावरून निवडणुकीचा अंदाज बांधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणेच होय. पण यावेळच्या निवडणुकीआधी आम्ही याच गोष्टीवर एक अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष प्रत्यक्ष निकाल आल्यावर ताडून पाहिले आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. आम्ही या अभ्यासासाठी गूगल ट्रेंड्सचा डेटा वापरला. हा डेटा सर्वानाच गूगलतर्फे मोफत उपलब्ध आहे. साधारणपणे गूगलवर लोक कुठल्या गोष्टी सर्च करतात, या माहितीमध्ये अगदी कुणीही जाऊन एखादी सर्च टर्म (शब्द / वाक्य / विषय) दुसऱ्या सर्च टर्मबरोबर पडताळून पाहू शकतो. अर्थात यात कुणाचीही वैयक्तिक अथवा गोपनीय माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. साधारणपणे भारतात एखाद्या वेळी लोक किती आणि कसे सर्च करताहेत याबद्दलची वैयक्तिक माहिती वगळता केंद्रीय पद्धतीने सांख्यिक माहिती मिळवता येते.

आम्ही या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच गेल्या पाच वर्षांतील प्रमुख घटना यांना संदर्भ धरून ट्रेंड्सचा अभ्यास केला आणि काही निवडक घटना निवडल्या. गंमत म्हणजे या घटना घडण्याआधी साधारण दोन-तीन महिने असे दिसले की गूगल ट्रेंड्समध्ये फरक दिसू लागतो. मग राजकीय पक्ष, विश्लेषक यांनी हाही एक निकष आपल्या प्रचार तंत्रामध्ये गंभीरपणे घ्यावा का? या लेखाचा हेतू हा नव्या अभ्यासाची माहिती वाचकांना करून देणे. गूगल वा इतर समाजमाध्यमे निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतील किंवा निकालांचा आधीच अचूक अंदाज बांधू शकतील असा आमचा मुळीच दावा नाही. परंतु या अभ्यासात काय आढळून आले ते बघू या.

भारतात जिओ युग आल्यापासून मोबाइल डेटा खूप स्वस्त झाला आहे. स्वस्त स्मार्टफोन्सची आणि वेगाने वाढणाऱ्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पाहता एका अंदाजानुसार (ICUBE २०१८ चा अहवाल ) २०१९ च्या अखेरीस भारतातील एकूण इंटरनेट वापरकत्रे जवळजवळ ६३ कोटीपर्यंत पोहोचतील. त्यातही ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकत्रे सुमारे २९ कोटी असतील. त्यांची संख्या वार्षिक ३५% या वेगाने वाढते आहे. या संख्या पाहता इंटरनेट ट्रेंड्सना शहरी आणि उच्च आर्थिक वर्गातील फॅड म्हणून नक्कीच दुर्लक्षिता येणार नाही. हा वेग असाच कायम राहिला आणि मोदी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२२ पर्यंत ‘सर्वासाठी इंटरनेट’ उपलब्ध झाले तर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी ‘इंटरनेटवर काय हवा आहे’ हा खूप महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो.

सोबतचा आलेख-१ पाहिला तर ग्रामीण इंटरनेट वापरकत्रे खूप वेगाने गेल्या दोन वर्षांत वाढले आहेत. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यातली दरी वेगाने कमी होतेय.

भाजप विरुद्ध काँग्रेस- आलेख- २ (लाल आलेख रेषा : भाजप. निळी आलेख रेषा : काँग्रेस)-

गेल्या वर्षभराचा ट्रेंड पाहिला तर किमान डिसेंबर २०१८ पर्यंत काँग्रेस आणि भाजपबद्दल समसमान उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये होती. काँग्रेसचे ‘पुनरुत्थान’ ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत होण्याची संधी चालून आली होती. याच वेळी काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्ये भाजपकडून खेचून घेतली आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत दोन्ही पक्ष समसमान पातळीवर होते. पण फेब्रुवारीमध्ये १४ तारखेला पुलवामाची दुर्दैवी घटना घडली आणि भारताने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर (२६ फेब्रुवारी) भाजपचा आलेख काँग्रेसच्या आलेखाला मागे टाकून वर वरच जाताना दिसतो. म्हणजे हवाई हल्ल्यानंतरची ‘राष्ट्रवाद’ व ‘देशप्रेम’ या भावनांची हवा भाजपला खूपच फळलेली दिसते. त्यावेळी लोकसभा निवडणुकांचा प्रारंभ होणार होता आणि काँग्रेसची उरलीसुरली आशा बालाकोटमुळे धुळीला मिळाल्याचे दिसते.

आणि अगदी निवडणुकीच्या ९० दिवसांच्या हंगामात तर भाजपने सरासरी दुप्पट जास्त कल (ट्रेण्ड) घेतला. दोन प्रमुख पक्षांचा आलेख- ३ (पुढील पानावर)- फेब्रुवारी २०१९ ते मे २०१९ पर्यंतचा. काँग्रेसचा आलेख मार्चनंतर जो बसला तो वर आलाच  नाही.

आता याच दोन पक्षांचे २००४ ते २०१६ मधील ट्रेंड्स पाहू या. (आलेख- ४) २००४ मध्ये भाजपप्रणीत एनडीएचा अनपेक्षित पराभव होऊन काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार आले आणि २०१४ पर्यंत ते सत्तेवर होते.

तेव्हा भारतात इंटरनेट तुलनेने बाल्यावस्थेत होते तरीही जानेवारी २००४ पासूनच वारे काँग्रेसच्या बाजूने वाहायला लागले होते. लक्षात घ्या-  २००४ च्या निवडणुका. एप्रिल आणि मे : २००४ ते २०१२ पर्यंत  काँग्रेसचा निळा आलेख भाजपच्या वर दिसतोय. पण २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची हवा जसजशी तापू लागली तसतसा भाजपचा लाल आलेख अलगद काँग्रेसच्या वर गेला आणि २०१४ नंतर भाजपचे सरकार आल्यावर तर आलेख एकदम चढाच राहिला.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत या तिन्ही राज्यांत भाजपची सत्ता होती आणि राजस्थानचा अपवाद वगळता काँग्रेस डिसेंबर २०१८ मध्ये तिथे इतका मोठा दिग्विजय मिळवेल असे कुणालाच वाटले नव्हते. पण जर आपण या निवडणुकीआधीच्या चार महिन्यांचे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचे ट्रेंड्स पाहिले तर काँग्रेस या तीन राज्यांत आघाडीवर आहे हे जाणवते. आणि या राज्यांतून काँग्रेस सत्तेवर आलीही!

‘चौकीदार चोर है’ विरुद्ध ‘मं भी चौकीदार’!  (आलेख- ५)

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांची प्रचारात सर्वात मोठी टॅगलाइन होती- ‘चौकीदार चोर है’! (जो काँग्रेसचा आरोप होता.) त्याला भाजपचं उत्तर होतं- ‘मं भी चौकदार’! ऑगस्ट २०१८ ते मे २०१९ पर्यंतच्या अभ्यासात केरळ आणि तमिळनाडूमध्ये भाजपविरुद्धच्या ‘चौकीदार चोर है’चा जोर दिसतो. पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पाहिलं तर ‘मं भी चौकीदार’चा जोर फार कमी दिसतो. निवडणुकीचे निकाल पाहता पंजाब, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र, तेलंगण आणि केरळ या राज्यांत भाजपला कमी यश मिळाले. अजून एक गंमत म्हणजे ‘मं भी चौकीदार’मधला रस मार्च २०१९ मध्ये अचानक वाढला आणि तो ‘चौकीदार चोर है’च्या जवळ जवळ सहापट  झाला. आणि याच वेळी देशात निवडणुका सुरू झाल्या होत्या. निकाल लागल्यावर पाहिलं तर भाजपला मिळाल्या ३०३ जागा आणि काँग्रेसला फक्त ५२! म्हणजे भाजपने काँग्रेसपेक्षा जवळजवळ सहापट जागा जास्त जिंकल्या! काय योगायोग!

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी- क्रमश: दोन राष्ट्रीय पक्ष : भाजप आणि काँग्रेस.. हे दोघे एनडीए आणि यूपीएचे चेहरे होते. या दोन नेत्यांमध्ये मोदी जरी आघाडीवर होते तरी नोव्हेंबर २०१८ मध्ये या दोन्ही नेत्यांमधील फरक अगदी कमी होता. आणि तेव्हाच राहुल गांधींनी तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्या! फेब्रुवारी २०१९ नंतर मात्र मोदींचा आलेख खूप वर गेला.. पुलवामा व बालाकोटच्या घटनांमुळे? आणि त्याच वेळी देशात निवडणुका सुरू झाल्या आणि साहजिकच मोदींना त्याचा फायदा झाला.

राहुल गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्यातील लोकांचा रस निवडणूक हंगामात सहापट अधिक वाढला. आणि भाजपने काँग्रेसपेक्षा तितक्याच- म्हणजे सहापट अधिक जागा जिंकल्या.

मोदी सरकारच्या प्रमुख योजना

मोदी सरकारने २०१४ साली सत्तेवर येताच सर्वसामान्य नागरिकांना कळतील अशा काही योजना सुरू केल्या. मग ती स्वच्छ भारत अभियान असो की प्रधानमंत्री आवास योजना! निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करताना बऱ्याच विश्लेषकांनी या योजनांचा उल्लेख केला. असे म्हणतात की, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग व रोजगारनिर्मितीचा वेग मंदावल्याने आणि कररचनेचा फास आवळल्याने नोकरदार मध्यमवर्ग जरी नाराज होता, तरी या योजनांचा बऱ्यापैकी फायदा हिंदीभाषिक पट्टय़ातील गोरगरीब जनतेने घेतला. गेल्या पाच वर्षांचे याबाबतचे ट्रेंड्स काय सांगताहेत ते पाहू. त्यासाठी पुढील योजनांचा विचार करू : गृहनिर्माण योजना (प्रधानमंत्री आवास योजना), बँक खाते योजना (प्रधानमंत्री जन-धन योजना), स्वच्छ भारत मिशन, आयुष्मान भारत, विद्युत योजना (सौभाग्य योजना)

याबाबतच्या कलामध्ये (ट्रेंड) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गृहनिर्माण योजना कोणत्याही इतर योजनांपेक्षा जास्त चालली असे आढळून आले. तर उर्वरित भारत स्वच्छ भारत अभियानास साथ देताना दिसला. याच हिंदी पट्टय़ातील राज्यांत भाजपला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळाले. तसेच बंगालमध्येही ममतादीदींच्या बालेकिल्ल्यात भाजपने दमदार ‘एंट्री’ मारली. दक्षिणेकडची राज्ये तशीही तुलनेने स्वच्छतेची भोक्ती म्हणून ओळखली जातात. त्यामुळे तिकडे या योजनेचं स्वागत झालं तरी भाजपला आवर्जून मतदान करण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात वगळता अन्यत्र कुठे दिसत नाही असा निष्कर्ष काढता येतो.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक- २०१७

गेल्या पाच वर्षांतील अजून एक महत्त्वाची घटना म्हणजे उत्तर प्रदेशमधील भाजपचा विधानसभेतील २०१७ चा दिग्विजय! योगी आदित्यनाथ यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांचं तगडं आव्हान परतवून लावत स्वबळावर संपूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं. या निवडणूक काळात- म्हणजे जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ मध्ये भाजपचा आलेख एकदम वर गेलेला दिसतो. भाजपचा आलेख इतर पक्षांच्या फारच पुढे गेलेला दिसला. मुख्य म्हणजे भाजपचा आलेख जानेवारीपासूनच वाढताना आढळला. प्रत्यक्षात निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू झाली. निवडणुकीआधी भाजपमध्ये नेटकऱ्यांचा वाढता रस हा पुढे भाजपला मिळालेल्या यशाची चाहूल तर नव्हती?

या सगळ्यावरून साधारणपणे पुढील निरीक्षणं नोंदवता येतील आणि काही प्रश्नसुद्धा पडतील :

  •  भारतात इंटरनेटचा प्रसार आणि प्रचार इतक्या वेगाने होतोय की जनमानसाचं चित्र इंटरनेट ट्रेंड्समध्ये उमटताना दिसतंय. हा डेटा इतर सोशल मीडिया, राजकीय पक्षांकडे असलेला स्थानिक डेटा, बातम्या वगैरे डेटाबरोबर एकत्र करून कदाचित ज्याला मार्केटिंग भाषेत ‘टाग्रेटेड मार्केटिंग’ म्हणतात तसं मतदारांसाठी करता येईल?
  • निवडणुकीआधी साधारण चार  महिने ते शेवटचं मत पडेपर्यंत ट्रेंड पाहिले तर कोण जिंकणार याचा अंदाज येऊ शकेल? तो कितपत बरोबर असेल? राहुल गांधींपेक्षा सहापट ‘ट्रेंडिंग’ असणारे मोदी निवडणुकीत राहुल गांधींच्या काँग्रेसपेक्षा बरोब्बर सहापट जागा जिंकतात.. हा योगायोग म्हणता येईल का?
  • संपूर्ण बहुमताने सत्तेवर असणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत निवडणुकीआधी काँग्रेस चार महिने ‘ट्रेंडिंग’ होते आणि त्या ठिकाणी चक्क दणदणीत विजय मिळवते! याचा अंदाज आधीच घेता आला असता का?
  • जर पुलवामाचा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइक या घटना घडल्या नसत्या तर भाजपला इतका दणदणीत विजय मिळाला असता का?
  •  हिंदीभाषक पट्टय़ातील राज्यांमध्ये जर केंद्र सरकारच्या आवास योजनेसारख्या योजना खूप लोकाश्रय मिळवत आहेत तर मग या राज्यांनी उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता विधानसभेत काँग्रेसला आणि त्यानंतर पाच महिन्यांनी केंद्रात भाजपला मतदान का बरं केलं असेल?

या प्रश्नांची संपूर्ण उत्तरं कदाचित आज गूगल ट्रेंड्सवरून मिळणारही नाहीत आणि वर म्हटल्याप्रमाणे भारतासारख्या देशात जात, धर्म, भाषा, अस्मिता इत्यादींत विभागलेला समाज ट्रेंडनुसार मतदान करेलच असंही नाही. पण देशात ‘डिजिटल क्रांती’ होत असताना आपल्याला या विषयाची तोंडओळख असलेली बरी म्हणून हा स्वल्प प्रयत्न.

जाता जाता एक गंमत..

  • महाराष्ट्रात येत्या चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. वरील अभ्यासानुसार जर गेल्या ३० दिवसांतील महाराष्ट्रातील नेटकऱ्यांच्या कलानुसार पाहू गेल्यास भाजप-सेना युतीचे पारडे निदान या घडीला तरी जड दिसतंय. बघू या मतदारराजा यावेळी कुणाला मुख्यमंत्री करतो ते!
  • आणि नेत्यांच्या कला (ट्रेण्ड)बाबतीत बोलायचं झालं तर अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता शाबूत आहे आणि मोठे  पवारसाहेबसुद्धा आपला मान राखून आहेत.

chinmaygavankar@gmail.com

ashishvt@gmail.com

(लेखक आयटी क्षेत्रात बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये अठरा वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असून, डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास आहे. लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाची आहेत.)