‘लोकरंग’मधील (२७ जून) ‘अस्तित्व आणि पुरोगामित्व’ हा राम बापट यांच्यावरील विद्युत भागवत यांनी लिहिलेला लेख वाचला. लेख वाचून त्यांच्यासंबंधी नव्या गोष्टी कळल्या..

१) ‘त्यांचा एक डोळा घारा आणि दुसरा तपकिरी’ हे आम्हा सर्व कुटुंबीयांना आताच कळले.

२) ‘काय तो रिसर्च पेपर? जणू शनिवारवाडय़ावरचं भाषण. पण ही सगळी त्यांची भक्ताला शिष्य आणि शिष्याला भक्त करण्याची स्ट्रॅटेजी!’ माझा सख्खा मोठा भाऊ म्हणून मी हे नक्की सांगते की, स्ट्रॅटेजी म्हणून काही करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता.

३) ‘हेही खरे आणि तेही खरे अशा गोलमटोल’ वाटणाऱ्या त्याच्या भूमिकेविषयी.. कोणत्याही विषयाचा सांगोपांग अभ्यास हा त्याचा मुख्य हेतू असायचा. वाचणाऱ्याच्या विचाराला दिशा दाखवल्यावर त्यातून कोणता निष्कर्ष काढायचा हे ज्याचे त्याने ठरवावे असे त्याचे मत होते. स्वत:चा निष्कर्ष दुसऱ्यांवर लादणे त्याला मान्य नव्हते.

४) युवक क्रांती दल, आणीबाणी यांवरची मते..  त्या- त्या परिस्थितीत स्वत:च्या विचारांचे प्रकटीकरण करणे हा त्याचा वैयक्तिक हक्क होता. त्याबद्दल मतभेद असू शकतात. पण लगेच त्याच्या पुरोगामित्वाविषयी विधान करणे चूक आहे.

५) दिल्लीतून जेएनयूमधून  पीएच. डी. अर्धवट सोडून तो परत आला. पण त्याची खरी कारणे त्याच्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींना माहीत असतील. लेखात ‘दिल्ली सोडून व्हाया नाशिक पुणे गाठले..’ असे म्हटले आहे. वास्तवात एम. ए.ची पदवी मिळाल्यावर लगेचच नाशिकच्या एच. पी. टी. कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून त्याने प्रवेश केला आणि तेथून काही वर्षांनंतर तो दिल्लीला गेला. तेथून परत आल्यावर पुणे विद्यापीठात व्याख्याता म्हणून रुजू झाला.

६) त्यानंतरचा कौटुंबिक माहितीचा परिच्छेद पूर्णपणे चुकीच्या माहितीवर लिहिला गेला आहे. आमचे कुटुंब मध्यमवर्गीय! वडील (त्यांना आम्ही ‘आप्पा’ म्हणत असू.), आई आणि आम्ही सहा भावंडे. तीन भाऊ आणि तीन बहिणी असा आमचा परिवार. पोस्ट मास्तर म्हणून काम करताना दर दोन-तीन वर्षांनी आप्पांच्या बदल्या व्हायच्या. १९४२ च्या ‘चले जाओ’ आंदोलनाच्या वेळी वडील बारामतीला होते. त्यावेळी जमाव पोस्ट ऑफिस जाळण्यासाठी आला. पण आग लावण्यापूर्वी त्या जमावाने आप्पांना विनंती करून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. वैयक्तिक काहीही नुकसान केले नाही. त्यावेळी राम बापट (त्याला आम्ही ‘भाऊ’ म्हणत असू.) याचे वय ११-१२ वर्षांचे होते. त्यानंतर जुन्नर, खेड (राजगुरूनगर) या गावी राहून १९४६ साली आम्ही पुण्याला स्थायिक झालो. आप्पांची बदली देहू रोड पोस्ट ऑफिसात झाली होती. आप्पा रोज पुणे-देहू रोड जा-ये करीत. गांधीहत्येच्या वेळेस भाऊचे वय १५-१६ वर्षांचे होते. त्यानंतर झालेल्या जाळपोळीच्या धक्क्याने आप्पा गेले नाहीत, तर १९५८ साली अ‍ॅनिमियाच्या आजाराने त्यांचे निधन झाले. त्यावेळेस भाऊ नाशिकच्या कॉलेजमध्ये नोकरीला लागला होता. त्याआधी त्याने कारकुनाची नोकरी केली होती. एम. ए. करत असतानाच इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये तो कामाला लागला होता.

मोठय़ा भावाचे लग्न १९४७ मध्ये झाले. लगेचच त्याचे वेगळे बिऱ्हाड झाले. दुर्दैवाने त्याचा संसार सुखाचा झाला नाही हे खरे; पण या गोष्टीचा उल्लेख करून त्याचा संबंध भाऊच्या अविवाहित राहण्याशी जोडण्याचे काहीच कारण नव्हते.

७) कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करण्याची त्याची वृत्ती पहिल्यापासूनच होती. एखादी गोष्ट त्याच्या मनाला पटली की लोक पुरोगामी म्हणतील की प्रतिगामी, आस्तिक म्हणतील की नास्तिक याची त्याला पर्वा नव्हती. पुरोगामी नास्तिकच असावा हा विचार कोतेपणा दाखवणारा आहे.

८) नागिणीच्या विकाराने त्याला आयुष्याच्या उतरणीवर आणले. त्यानंतर कायम उत्साही असणारा भाऊ निराश वाटू लागला. त्यानंतरच्या पार्किन्सन आणि स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्याची फार चिंताग्रस्त अवस्था झाली. त्यातूनही तो बाहेर पडला. पण त्याच्या दैनंदिन जीवनावर बऱ्याच मर्यादा आल्या. डोळ्यांतली ताकद खूपच कमी झाली होती तरी वाचनाचे वेड कमी झाले नव्हते. ‘हातपाय आखडून रामरक्षा म्हणताना’ त्याला आम्ही तरी पाहिला नाही. वाचनाचे विषय वेगळे झाले. भिंगांच्या मदतीने ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, तुकाराम गाथा यांचा अभ्यास सुरू झाला.

९) २ जुलै २०१२ रोजी त्याचे निधन झाले. अनेक मान्यवरांनी त्याच्यावर लेख लिहिले. डॉ. विद्युत भागवतांना आठ वर्षांनंतर त्याच्यावर हा लेख लिहावासा वाटला, ज्या लेखात त्यांना नक्की काय म्हणावयाचे आहे, हे मला अजून तरी उमगलेले नाही. खरे तर या लेखातील अजूनही बरेचसे मुद्दे विवाद्य आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले बोलता येत नसेल तर गप्प राहावे. त्या व्यक्तीबद्दल गैरसमज होतील असे लिखाण त्याच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी करणे हे कितपत योग्य आहे? या लेखाने आम्हा कुटुंबीयांच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून हा लेखनप्रपंच.

– सुनीता जोशी (लेखिका राम बापट यांची बहीण आहे.)

  चुकीचा संदर्भ..

‘लोकरंग’(३१ मे)मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘नव्वदीचे बाबा’ हा डॉ. बाबा आढाव यांच्यावरील लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात त्या लिहितात, ‘त्या काळात ‘मनोहर’ साप्ताहिक हे कार्यकर्त्यांशी चांगल्या प्रकारे संवाद असलेले नियतकालिक शरद महाबळ चालवीत होते.’

खरं तर शरद महाबळ आणि ‘मनोहर’ यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. ज्या काळाबाबत नीलम गोऱ्हे लिहितात, त्या काळी मी (दत्ता सराफ) ‘मनोहर’चा संपादक होतो आणि माझ्या टीममध्ये श्री. भा. महाबळ काम करत असत. श्री. भा. महाबळ यांचा युवक चळवळीशी काहीही संबंध नव्हता. ‘मनोहर’चा संपादक म्हणून आणि व्यक्तिगत स्तरावरही त्यावेळच्या युवक चळवळीशी आणि नेत्यांशी माझा निकटचा संपर्क होता. युवक चळवळीला प्रोत्साहन तर अर्थातच होते. मुद्दा इतकाच : ‘शरद महाबळ- ‘मनोहर’- युवक चळवळ’ हा संदर्भ पूर्णत: चुकीचा आहे. त्याबाबतची सत्यता नोंदली जावी, म्हणून हा पत्रप्रपंच!

– दत्ता सराफ