खरं तर गोष्ट फार सोपी होती. एक वटवृक्ष उन्मळून पडल्यावर उर्वरित झाडेझुडपे साफ करायला फार ताकदीची, कष्टाची आणि वेळेचीही गरज नव्हती. १६ मे नंतर वातावरण पूर्ण बदललं होतं. नव्या अपेक्षा, उत्साह यात देश न्हाऊन निघत होता. महाराष्ट्रही याला अपवाद नव्हता. पुढच्या सहा महिन्यांतच होणाऱ्या lok09महाराष्ट्र विधानसभेचा निकाल १६ मेलाच लागला होता. युतीची महायुती झाल्याने सोशल इंजिनीअरिंगही व्यवस्थित झालं होतं. महायुतीतल्या घटक पक्षांची ताकद मर्यादित असली तरी ताकद होती. भाजपमध्ये राहूनही मध्यम कनिष्ठ जाती, भटके विमुक्त, मुस्लिम यांची मोट बांधण्याचे कसब गोपीनाथ मुंडेंनी कमवले होते. युतीची महायुती करण्याची रणनीती यशस्वी ठरली होती. पण मुंडेंच्या आकस्मिक निधनाने बसलेला चटका विधानसभेच्या विजयात परावर्तित करण्याच्या मन:स्थितीत, महायुतीच्या मतदारांसह महाराष्ट्रातली तमाम जनता आघाडी सरकारच्या विसर्जनाची औपचारिकता पार पाडण्यासाठी निवांत झाली होती. प्रचाराला १२ दिवसच मिळणार या बातमीचा मतदारांवर काहीच परिणाम झाला नाही, कारण मनोमन त्यांनी लावायचा त्यांचा निकाल लावला होता. १२ दिवस काय, दोन दिवसांतही त्यांनी स्पष्ट कौल दिला असता.
पण अश्वमेधावर आरूढ भाजपचे सरदार घोडय़ापेक्षा जास्त फुरफुरू लागले! त्यांच्या अंगात सिकंदर संचारला. त्यात मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने तर १६ मेच्या यशानंतर एनडीएच्या घटक पक्षांना बाजूला काढायचा पणच केला. परिणामस्वरूप चर्चेची गुऱ्हाळं लावत भाजपने ‘अचानक झालं’, ‘दु:खद झालं’ असा अभिनय करत युती तोडली. युतीसोबत महायुतीही तुटली. प्रतिक्षिप्त क्रियेसारखी आघाडीही तुटली आणि सरळ सामना पंचरंगी करून भाजपने सोपे गणित कठीण करून टाकले. आकांक्षा जेव्हा लालसेत बदलते तेव्हा अशी विनाशकाले विपरीत बुद्धी सुचते! आता या पंचरंगी लढतीत आघाडीला आपले वस्त्रहरण रोखता येईल. जाती-पातीच्या राजकारणाला ऊत येईल. पैशाचा पाऊस पडेल. ‘कुछ भी हो सकता है’ अशा वातावरणात आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पडली तर तो त्यांचा निलाजरेपणा नाही तर भाजपच्या अहंगंडाने त्यांनी ती संधी दिली आहे.
युती तुटल्यावर भाजपने घटक पक्षांना सोबत ठेवत सेनेची कोंडी करत वर मानभावीपणाने ‘आम्ही सेनेवर बोलणार नाही’ असा लबाड पवित्रा घेतला. सेनेने मात्र चवताळलेल्या वाघासारखी भाजपवर टीका सुरू केली. बैठकांचे तपशील उघड होऊ लागले. आकडय़ांचे खेळ रंगू लागले. खऱ्याखोटय़ाचे पत्ते उघड होऊ लागले. सपासप वार होऊ लागले. चार महिन्यांपूर्वीच गळ्यात गळे घालणारे एकमेकांचा केसाने गळा कापू लागले. उमेदवार पळवापळवी, लांच्छनास्पद पक्षांतरे, पातळी सोडून केल्या जाणाऱ्या आरोपांना ऊत आला. त्यात ‘रुबिक क्युब मास्टर’ साहेबाचीच ही खेळी असा एक संदेशही पसरला. दर दिवशी शरद पवारांच्या नावे नवे समीकरण जन्माला येते आहे. साधी सरळ निवडणूक पोरखेळ पातळीवर आणल्याने सर्वपक्षीय मतदार भयंकर नाराज आहे. आपल्याला ‘गृहीत’ धरून राजकारण्यांचे चाललेले बेशरम चाळे हातावर हात ठेवून बघण्यापलीकडे काही करू शकत नाही.
खरी गोष्ट काय, खोटी गोष्ट काय, चूक कोणाची या तपशिलात जाऊनही सर्वसाधारण मतदारांत भाजपच्या छप्पन्न इंची छातीचा गर्वाने फुगलेला फुगा आणि त्यातल्या अति आत्मविश्वासाच्या हवेने नाराजी आहे. आपण देश जिंकला, आता महाराष्ट्र पादाक्रांत करायला कशाला कुणाची सोबत हवी, ही मग्रुरी जन्मण्याचं कारण नरेंद्र मोदी.
मोदींच्या करिश्म्यावर, जादूवर आपण देशात जसं स्वबळावर सरकार स्थापलं तसं महाराष्ट्रातही स्थापन करू या मनोविकारानं त्यांना पछाडलं. अमित शहा आणि मोदींनी त्याला मूकपाठिंबा दिला. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे फक्त मोदी, आणि फक्त मोदी म्हणजे विजय या भ्रमाला मधल्या काही पोटनिवडणुकांनी इशारा दिला होता. पण विरोधकांना गणतीत काय खिजगणतीतही न धरण्याची मोदींची अहंमन्य वृत्ती या पराभवाने विचलित होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आपल्यातले न्यून झाकायचे आणि बाकीचेच इतके मोठे करायचे की ते ‘न्यून’ अगदीच न्यून होऊन जावे.
२५ वर्षांची युती आणि सहा महिन्यांपूर्वीची महायुती तोडताना भाजपची कसलीही राजकीय अपरिहार्यता नव्हती. होती फक्त सत्ता लालसा! आज त्यांना ज्या शाब्दिक कसरती कराव्या लागताहेत किंवा सेनेवर न बोलण्याच्या सुसंस्कृत मुखवटय़ाआड त्यांचा दांभिक चेहरा झाकण्याची सोय हे सगळे त्यांना विजयाऐवजी पराजयाकडेच घेऊन जाणार आहे. ‘रामा’कडून ‘छत्रपती शिवरायांकडे’ वळण्याची अगतिकता हे सगळं मतदारांना कळत नसेल? दुधावर ताव मारून मिशा पुसून बसणाऱ्या बोक्यासारखी भाजपची प्रतिमा झालीय.
नरेंद्र मोदींवर, महाराष्ट्रानेच नाही तर दक्षिणेचा आणि पूर्वेचा काही भाग वगळता संपूर्ण देशाने विश्वास टाकला. ते जायंट नाही तर महाजायंट ठरले, पण या प्रवासात त्यांनी विरोधी पक्षासोबत स्वपक्षातल्या लोकांनाही दूर लोटले. मी आणि फक्त मी!
३० वर्षांच्या कालखंडानंतर देशात काँग्रेसेतर पक्षाची स्वबळावर सत्ता आणणारा नेता, आज देशाचा पंतप्रधान आहे. पण दिल्ली सोडून महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेसाठी १०-१२ दिवस ठाण मांडून होते मोदी! शरद पवार सोडले तर ते कुणाशी लढाई खेळत होते? उद्धव आणि राज ठाकरे यांच्याशी! देशाचा पंतप्रधान प्रादेशिक पक्षांच्या दोन तरुण नेत्यांशी दोन हात करण्यासाठी मुक्काम ठोकतो? मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन केलेली सेना सेनाप्रमुखांनी भाजपच्या बरोबरीने हिंदुत्वाकडे वळवली, म्हणून ही जनसंघाची मिणमिणती पणती, भाजपच्या नव्या अवतारात कमळ बनून महाराष्ट्रभर उमलली! अगदी मागच्या निवडणुकांपर्यंत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला सेनेमुळे सर्वदूर पसरता आलं. आज मोदी काय मिळाले, महाराष्ट्र भाजपला वाटले, आता काय कुणाची गरज? बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेला खिंडीत गाठायचे, मातोश्रीचे महत्त्व कमी करायचे आणि वर मोदी म्हणणार बाळासाहेबांच्या स्मृतीला स्मरून, त्यांचं योगदान मानून ‘सेने’वर बोलणार नाही! मोदींची चलाखी इथेच संपत नाही. ते म्हणतात, ‘केंद्रातून मला महाराष्ट्रात मदत करायची आहे तेव्हा इथे मला प्रतिसाद देणारं, साथ देणारं सरकार हवं आहे, म्हणून भाजपला विजयी करा!’ २५ वर्षांचा मित्रपक्ष तुम्हाला तुमचा वाटत नाही? काँग्रेसने जसे गांधी भिंतीवर टांगले तसे बाळासाहेबांना भिंतीवर टांगून तुम्ही सत्ता ओरपणार? वाजपेयी केंद्रात होते तेव्हा महाराष्ट्रातल्या सेनेच्या मुख्यमंत्र्याशी त्यांचा संवाद होता, मग तुमचा का नाही होणार? नाही होणार, कारण मोदींना कुणाशी संवादच नकोय. अहम् ब्रह्मास्मि! त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जिथे ते जुमानत नाहीत, तिथे मित्रपक्ष काय चीज? असाच ‘अहम्’ इंदिरा गांधींत शिरला होता आणि ‘इंदिरा इज इंडिया’ ही घोषणा जन्माला आली होती. मतदारांनी त्यांना ‘इंडिया’ म्हणजे कोण हे दाखवून दिलं. तसंच आज ‘मोदी मोदी’ करणारे काही दिवसांनी ‘मोडीत’ निघू शकतात, हे मोदींसकट मोदीप्रेमींनी लक्षात ठेवावं.
मोदींना व्यक्तिमत्त्व आहे, वक्तृत्व आहे. मनमोहन सिंगांच्या १० वर्षांच्या मौनी कारभारानंतर मोदी म्हणजे मुक्याला कंठ फुटावा तसे झाले. पण लोकांना आवडतेय म्हटल्यावर त्यांनी राज्यकारभारापेक्षा भाषणांचाच सपाटा लावला. परदेशी पाहुणे देशात आणणे किंवा आपण परदेशी जाणे आणि भाषण ठोकणे हा एक नवाच उद्योग सुरू केला. दूरचित्रवाणीचा पडदा कमी पडला, म्हणून आता ते आकाशवाणीवरही बोलू लागले आहेत. या वेगाने ते प्रा. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर आणि बाबासाहेब पुरंदरेंचाही विक्रम मोडतील!
त्यात आता आत्मस्तुतीही येऊ लागलीय. आजवर अमेरिकेत असं स्वागत, असा मान कुठल्या पंतप्रधानांना ६० वर्षांत मिळाला आहे, असा प्रश्न करून ते विचारतात, ‘कुणामुळे मिळाला?’ लोक ‘मोदी’ असे ओरडतात. मग हे नाटय़मय विनयाने ‘नही, १२५ करोड हिंदुस्थान की जनता की वजह से!’ असं म्हणणार!
‘अहम् ब्रह्मास्मि’ग्रस्त मोदीजींना माहिती नाही की, भारतात पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त लोकप्रियता नेहरूंची होती. नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जातात हे लोक कौतुकाने सांगत. ‘चाचा नेहरू’ ही उपाधी त्यांना सहजपणे मिळाली आणि अमेरिका आणि भारत या इतिहासात बघायचं तर नेहरू आणि जॉन केनेडी यांची भेट इतकी गाजली, की लोकांनी घराघरात नेहरू-केनेडींचे फोटो लावले होते. तसे ओबामा-मोदींचे लागले? आणि इंदिरा गांधींनी तर अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता, पूर्व पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती केली. याउलट यंदा चीनचे पंतप्रधान येऊन गेले न् गेले तर चीनने घुसखोरी केली आणि पाकशी वाटाघाटी बंद करूनही त्यांनी ‘एलओसी’वर भारतीय जवानांना शहीद केले! तेव्हा आमचे पंतप्रधान ‘शत प्रतिशत भाजप’साठी बीड, औरंगाबाद, मुंबई फिरत होते. अमेरिकेतला सत्कार सोहळा देखणा भव्यदिव्य होता, पण तो अमेरिकनांनी नाही, तिथल्या भारतीयांनी- त्यातही अधिकतर गुर्जर बांधवांनी केला. चीन, जपान, अमेरिका गुंतवणूक करणार अशा घोषणा होताहेत. पण विरोधाभास असा, की अरुणाचलमध्ये घुसखोरी करून वर आडमुठय़ा राहणाऱ्या चीनला आपण यूपीत तीन एसईझेड मंजूर करून दिले. तिथे कामगार कोण असणार यावरचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली. अमेरिका दौऱ्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची देहबोली खूप काही सांगत होती. रशियाचा पोलादी पडदा जिथे फाटू शकतो, तिथे मोदींचा ‘हम करेसो कायदा’ किती दिवस चालणार?
शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंविषयीचा कळवळा म्हणजे मेलोड्रामाचा नवा अवतार! म्हणे, ‘गोपीनाथ मुंडे असते तर मला यावं लागलं नसतं!’ मग लोकसभेला का फिरलात? मुंडे होते की! मुंडेंची एवढी ताकद मानता तर मंत्रिपद देताना खळखळ का केली आणि मुंडेंची चिता विझायच्या आत संध्याकाळी सहा वाजता त्यांची खाती गडकरींकडे सोपवल्याची बातमीही येते! संपूर्ण प्रचारात मोदी मुंबई आणि महाराष्ट्र असा स्वतंत्र उल्लेख करत होते. कशाला? मुंबई महाराष्ट्रात नाही? मुंबईच्या निवडणुका वेगळ्या होताहेत?
आश्चर्य वाटतं राजू शेट्टींचं! त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात त्यांच्या कृषीमंत्र्यांचे पुतळे जाळले, स्वत: शेट्टींनी महायुतीतून बाहेर पडायची धमकी दिली होती. त्यांच्यासह जानकर, आठवले यांची नावं सोडा, दखलही घेतली नाही. जानकरांनी पंकजाला बहीण मानल्याने त्यांचा नाइलाज आहे; तर आठवले ५२ पत्त्यांत एक जोकर असतो तसे युती असो, आघाडी असो, रिडालोस असो, रंगीबेरंगी अवतारात चारोळ्या करत हजर असतात. मोदींनी अप्रत्यक्षपणे तुमची गरज नाही हे अधोरेखित केले. २५ वर्षे मित्र पक्ष असलेल्या आणि १५ च्या वर खासदार निवडून आणलेल्या सेनेला त्यांनी ओवाळून टाकलेलं अवजड उद्योग खातं दिलं, ते मोदी आठवलेंना मंत्री करणार? राज्यात मंत्रिपद, महामंडळं देणार?
मोदींनी आता भाषणबाजी आणि भपकेबाज योजनांचे इव्हेंट सोडून देश कारभार करावा. ते स्वप्रेमाने इतके आंधळे झालेत की उदाहरण म्हणून त्यांना फक्त गुजरातच दिसतो! शिवराज सिंह चौहान, रमणसिंग या भाजप मुख्यमंत्र्यांचा दाखला सोडा, ते नावही घेत नाहीत. तेही मोदींप्रमाणे सातत्याने निवडून येताहेत. अन्नसुरक्षा योजना काँग्रेसपेक्षा रमणसिंगानी सक्षमपणे राबवलीय. पण मी, मी आणि मी ही प्रतिमा लोक अजून वर्षभर सहन करतील. नंतर हिशेब मागायला लागतील. ‘दागी’ लोकांना स्थान नाही म्हणणाऱ्या मोदींच्या पक्षाचा अध्यक्ष डझनभर गुन्ह्यांत आरोपी आहे, तर उपाध्यक्ष येडीयुरप्पा भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावे लागलेले वादग्रस्त आणि जातीग्रस्त पुढारी आहेत.
मोदी असल्याने आपण कमरेचे काढून डोक्याला बांधलं तरी लोक खांद्यावर घेतील असं प्रदेश भाजपला वाटल्याने त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष, लोकसंग्राम अशा पक्षांतल्या त्यांनीच भ्रष्ट ठरवलेल्या ५५ ते ६० लोकांना उमेदवारी दिली आहे. या दागी राष्ट्रवादी नेत्यांचे समर्थन करताना फडणवीस एखाद्या ह.भ.प. सारखे आपद्धर्म, शाश्वत धर्म वगैरे बडबडत होते. याला धरून मग पुढे समन्वय धर्म, तडजोड धर्म, क्षमा धर्म, पापक्षालन काहीही येऊ शकतं!
मुळात सत्ताधारी जेवढे बेबंद होते, तेवढेच विरोधी सेना-भाजपही निष्क्रिय होते. भ्रष्टाचार हा आघाडीच्या अंतर्गत वादातून माध्यमात पोहचला. विरोधकांचे कार्य शून्य! पण केंद्र सरकारला जसे लोक विटले तसेच इथल्या आघाडीला विटले आहेत. महायुती हा सक्षम पर्याय त्यांना समोर दिसत असताना, २५ वर्षीय स्थानिक मित्रपक्षाला कोंडीत पकडून मोदी अ‍ॅण्ड कंपनी महाराष्ट्र पुन्हा एकदा दिल्लीच्या पर्यायाने गुजरातच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करताहेत.
पण महाराष्ट्राची जनता, ‘कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?’ या सवालाला ‘महाराष्ट्र नेऊन ठेवेल तुम्हाला.. योग्य जागी’ असं खणखणीत उत्तर देईल. शेवटी कुठलाही मीपणा महाराष्ट्र खांद्यावर घेत नाही हे मोदींनाही कळणं गरजेचं आहे.
आघाडीला लोकसभेत समज दिली, भाजपला ती इतक्या लवकर द्यावी लागेल असं मतदारांना वाटत नव्हतं. पण नाइलाज को क्या इलाज?
शेवटची सरळ रेघ-  रामदास आठवले म्हणाले, मोदी बुद्धाचाच विचार मांडताहेत. सिद्धार्थाने बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करून बोधित्व प्राप्त केलं. मोदींचं बोधीत्व ऐकताना रामदास आठवले नेमके कुठल्या झाडाखाली बसले होते हे तपासावे लागेल!