‘लोकरंग’मधील (२५ मे) सुबोध जावडेकर यांचा ‘प्रचारकी वाङ्मयापलीकडले…’, मेघश्री दळवी यांचा ‘अलक्षित साहित्य प्रकार उजळवणारे’ (मेघश्री दळवी), ‘लेखनाहून वेगळे नारळीकर’ हा सुकल्प कारंजेकर आणि गिरीश कुबेर यांचा ‘सुंदर मी होणार!’ या चारही लेखांत नारळीकरांच्या विज्ञानविषयक साहित्य प्रकाराचा सविस्तर ऊहापोह या लेखकांनी केला आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठीतल्या बहुतेक सर्व समीक्षकांनी नारळीकर आणि त्यांच्या विज्ञानविषयक साहित्याला बेदखल करून त्यांची उपेक्षा केली होती; आणि ती कशी अनाठायी होती, हे सप्रमाण या लेखांतून मांडण्यात आलं आहे. खरं तर विज्ञानकथा हा साहित्य प्रकार मराठीत रुजला, बहरला तो नारळीकरांमुळेच! आजही अनेक तरुण लेखक मराठी विज्ञानसाहित्य निर्मितीसाठी डॉ. नारळीकर यांच्या कथाकादंबऱ्यांनाच मार्गदर्शक म्हणून डोळ्यासमोर ठेवतात. ते विज्ञान लेखकांसाठी भक्कम आधारस्तंभ ठरले. त्यांच्यामुळे पुढच्या पिढीला प्रेरणा आणि प्रतिष्ठा आणि ऊर्जाही मिळाली. १९७५ मध्ये नारळीकरांनी ‘पुत्रवती भव’ ही कथा लिहिली तेव्हा १००० मुलांमागे ९६२ मुली असं प्रमाण होतं. त्यानंतर गर्भजल परीक्षा आली. तरीही हे प्रमाण १००० मुलांमागे ९३९ मुली असं घसरलं. सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदान यांवर बंदी आली नसती तर हे प्रमाण आणखी खाली गेलं असतं, अशा प्रकारचा महाभयंकर धोका अगोदरच दाखवून नारळीकरांच्या विज्ञानकथांनी जागल्याचं काम केलं आहे. विज्ञानाच्या अंगानं कथेची रहस्यमय मांडणी करीत असतानाच प्रेषित या कल्पनेच्या आधारे, जीवनाबद्दलची व्यापक जाणीव वाचकांना करून देण्यात नारळीकर यशस्वी झाले.
त्यांच्या कथांमधून वैज्ञानिकदृष्टी रुजवताना माणूस केंद्रस्थानी असल्याचं प्रकर्षानं दिसतं, त्यामुळे मानवी भावभावनांचं अचूक चित्रण झालं आणि त्यातील पात्ररेखाटन जिवंतपणे वाचकांसमोर आली आहेत. त्यांच्या साहित्यात कुठेही क्लिष्टता न येता विज्ञान आणि कथेतील घटना नैसर्गिकरीत्या उलगडत जातात. डॉ. नारळीकरांच्या कथा फक्त लोकरंजन करीत नाहीत, तर लोकशिक्षण देतात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ करतात. विज्ञानाविषयी प्रेम रुजविण्याचे काम करतात. याशिवाय विज्ञानाच्या मर्यादा, त्याचा गैरवापर होण्याची शक्यता, मानवी अहंकार, भविष्याची अकल्पित दिशा, नैतिक पेच, प्राचीन परंपरांचं अंधानुकरण आदींवर भाष्य करतात. उपदेश व आवेश टाळून विज्ञानातील शक्यता आणि रंजकता यावर ते भर देताना दिसतात. मराठी विज्ञान कथांना मानाचं स्थान देण्याचं अभूतपूर्व कार्य नारळीकरांनी केलं आहे आणि त्यांच्यामुळेच मराठी विज्ञान कथांची वैभवशाली परंपरा उभी राहिली.
– डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
सुसंस्कृतपणाचे मूर्तिमंत प्रतीक
‘लोकरंग’ (२५ मे) मधील ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘सुंदर मी होणार!’ हा खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावरील लेख वाचला. हा लेख बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ परामर्श घेणारा आहे. साधेपणा, सुसंस्कृतपणा आणि शुचिता यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे डॉ. नारळीकर. श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. स्वत: पूर्ण नास्तिक असलेले जयंतराव आस्तिक असलेल्या व्यक्तींच्या मतांची कदर करीत असत. माणसाने विज्ञानाची कास धरावी आणि विवेकाने निर्णय द्यावेत यासाठी ते सतत प्रयत्नशील ह़ोते. हे लोकांच्या पचनी पडावे म्हणून त्यांनी विज्ञानकथा लिहिल्या, त्यांच्या लेखनातील लालित्य इतके प्रभावी होते की, फडके, खांडेकर, काणेकर यांची आठवण व्हावी.
साहजिकच या कथांना सर्वस्तरीय लोकप्रियता लाभली. विज्ञाननिष्ठा अधोरेखित व्हावी म्हणून त्यांनी आपल्या मुलीला गाडी घेताना ती हेतुत: सर्वपित्री अमावास्येला घेतली. जसे किर्लोस्करांनी कंपनीचा कुठलाही नवा उपक्रम मुद्दाम अमावास्येसच सुरू केला आणि त्यायोगे चांगल्या कामास मुहूर्त असण्याची गरज नाही हे कृतीने दाखवून दिले. जयंतरावांचा साधेपणा प्रस्तुत पत्रलेखकाने स्वत: अनुभवला आहे. काही वर्षांपूर्वी ते कोल्हापूरला आले असताना, युनायटेड बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी त्यांना महाद्वार रोड शाखेस भेट देण्याची विनंती केली. आणि आपल्या व्यग्र कार्यक्रमांत त्यांनी ती स्वीकारलीसुद्धा. त्यांनी कर्मचाऱ्यांशी अनेक विषयांवर चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना/ शंकांना समर्पक उत्तरे दिली. जवळजवळ दोन तास त्यांनी या भेटीसाठी दिले. त्यांचा हा साधेपणा पाहून शाखेतील कर्मचारी भारावून गेले.
– अशोक आफळे, कोल्हापूर
घराघरांत विज्ञानाचे बीज रोवले
‘लोकरंग’मधील (२५ मे) ‘प्रचारकी वाङ्मयापलीकडले…’ हा सुबोध जावडेकर, ‘अलक्षित साहित्य प्रकार उजळवणारे’ हा मेघश्री दळवी, तसेच ‘लेखनाहून वेगळे नारळीकर’ हा सुकल्प कारंजेकर असे तीन लेख वाचले. विज्ञान आणि साहित्य यांची सांगड घालताना आकाशातील ताऱ्यांबरोबर या महान वैज्ञानिकाने जमिनीवरील मुलांच्या रूपातील ताऱ्यांना पाहिले व न समजणाऱ्या किचकट विज्ञानाला त्यांनी रंजनात्मक साहित्यात परावर्तित केले. परिणामी कलेच्या माध्यमातून विज्ञानाला जनमानसापर्यंत पोहचविले. विज्ञानाला साहित्याची किनार दिली, त्यामुळे घराघरांत विज्ञानाचे बीज रोवले गेले. प्रसिद्धीला दूर सारून टीकाकारांनी केलेली हेटाळणी मनात न ठेवता त्यांनी सातत्याने अवकाशात रमणाऱ्या विज्ञानाला भूतलावर आणले.
– सूर्यकांत भोसले, मुंबई
उद्बोधक लेख
‘लोकरंग’ (२५ मे) मधील ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘सुंदर मी होणार’ हा खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्यावरील लेख उद्बोधक असाच आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या संदर्भातील १९७० ते १९८० च्या दशकातील एक आठवण आहे. तेव्हा आम्ही पुण्यातील एका बैठ्या बंगल्यात राहत होतो. रविवार सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे आम्ही सर्वजण घरीच होतो. माझा धाकटा भाऊ गिरीश इनामदार आणि त्याचा मित्र मुकुल कर्णिक आमच्या घरी एकत्र अभ्यास करत असताना दारावरची बेल वाजली म्हणून गिरीशने दार उघडले- तर अहो आश्चर्यम्! दारात साक्षात डॉ. जयंत नारळीकर उभे! ते रिक्षा करून आमच्या घरी आले होते. त्यांचे वडील डॉ. विष्णु वासुदेव नारळीकर ऊर्फ तात्यासाहेब यांचा निरोप/ चिठ्ठी घेऊन ते आमच्या वडिलांकडे (डॉ. हेमंत विष्णु (हे.वि.) इनामदार ऊर्फ भाऊराव इनामदार यांच्याकडे समक्षच आले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांचे पुस्तक मराठीत आणण्याचे काम सुरू होते व माझा भाऊ त्यांना त्या कामात मदत करत होते. डॉ. जयंत नारळीकर हे मोठे वैज्ञानिक असूनही स्वभावाने अत्यंत साधे होते. ‘ Simplicity was his ultimate personality statement !’ असे डॉ. जयंत नारळीकर यांच्या बाबतीत खात्रीने म्हणता येईल. तसा प्रत्यक्ष अनुभव आम्हा सर्वांना आला.
– डॉ. विकास हेमंत इनामदार
कोशिश करनेवालोंकी…
‘लोकरंग’ (२५ मे) मधील ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘सुंदर मी होणार!’ हा लेख डॉ. नारळीकरांचे अचूक अंतरंग टिपणारा आहे. जयंतराव आपल्या बौद्धिक उंचीचा आपल्या वागण्यात कधीही संदर्भ आणून देत नसत. मुलीच्या गाडीची डिलिव्हरी ‘सर्वपित्री अमावस्येला’ घेणे यांत कुठेही आपल्या मतांचा गाजावाजा न करता कृतिशील चैतन्यमय जीवन जगणं, हे अजबच ठरतं. तसेच सध्याच्या भोंदू बाबांवर कोणतीही टीका न करता, आपल्याला समाजात सुधारणा करावयाची आहे, असे न सांगता, कृतीने सहजपणे आपला छुपा उद्देश शांतपणे व निगर्वीपणे साध्य करावयाचा प्रयत्न करत राहणं, ही त्यांची जीवनशैली म्हणजे ‘कोशिश करनेवालों की कभी हार नही होती’ या रचनेची आठवण करून देणारी आहे.
– प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे.
वैज्ञानिक जाणिवेच्या संस्कृतीची पायाभरणी
‘लोकरंग’ (२५ मे) मधील ‘अलक्षित साहित्य प्रकार उजळवणारा’ या लेखात मेघश्री दळवी यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांचे जे विश्लेषण केले आहे ते अतिशय सुसंगत आणि भावनिक आहे. मात्र माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. माझ्या मते, डॉ. नारळीकरांनी मराठी विज्ञानकथेला जेव्हा दिशा दिली तेव्हा त्यांनी केवळ ‘शुद्ध विज्ञान’ किंवा ‘कल्पनारंजन’ एवढ्यावरच ते थांबून राहिले नाहीत, तर एका वैज्ञानिक जाणिवेच्या संस्कृतीची पायाभरणी केली.
इतर लेखक विज्ञानकथा लिहिताना फक्त कल्पनाशक्तीवर भर देतात- एलियन, अंतराळ, अतिरेकी तंत्रज्ञान. पण नारळीकर यांच्या कथांमध्ये ‘विज्ञानातील नैतिकता’ हा केंद्रबिंदू आहे. ‘धोंडू’सारख्या कथेमध्ये केवळ परग्रहवासी दाखवला नाही, तर एक गूढ नैतिक प्रश्न उपस्थित केला. ‘तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा?’ हे सांगितले. लेखिकेने हार्ड-सॉफ्ट विज्ञानकथा या वर्गीकरणाचा उल्लेख केला, पण माझ्या मते, नारळीकरांनी या भिंतीच पुसून टाकल्या. त्यांच्या कथा त्या साचेबद्ध परिभाषांत बसत नाहीत, त्या हृदयाला भिडणाऱ्या विज्ञानकथा आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नारळीकरांनी विज्ञानकथा ‘मुलांसाठी असते’ या पूर्वग्रहाला छेद दिला. त्यांनी मोठ्यांसाठीही तितक्याच परिपक्व कथा लिहिल्या, त्यामुळे मराठीत विज्ञानकथेचा वाचकवर्ग विस्तारला. आजच्या डिजिटल युगात त्यांच्या कथा आणखी महत्त्वाच्या ठरतात. कारण त्या केवळ विज्ञान शिकवत नाहीत, तर विचार करायला लावतात. विज्ञान माणसासाठी असावं, माणूस विज्ञानासाठी नव्हे, हे सांगतात. हा मानवकेंद्रित दृष्टिकोन मला त्यांच्या लेखनात सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो.
– सतीश घुले, अहिल्यानगर
पर्यटन म्हणजे डिजिटल मोहीम
‘लोकरंग’मधील (१८ मे )‘भारतीयांच्या पर्यटनाचा बदलता चेहरा’ याअंतर्गत ‘सेल्फी पॉइंट्स आस्वादच्या पलीकडे…’ हा भरत गोठोस्कर यांचा लेख वाचला. सहजच मागील काही दशकांची उजळणी झाली. एकेकाळी देवदर्शनापुरते मर्यादित असलेला मध्यमवर्ग आर्थिक उदारीकरणानंतर जग पाहण्याच्या उद्देशाने निघाला, हे निश्चितच स्वागतार्ह. वाढती क्रयशक्ती, माहितीचा सहज मिळणारा प्रसार आणि परदेशवारीचा वाढता सामाजिक दर्जा या साऱ्यांनी भारतीय पर्यटकांच्या नकाशावर आता सातासमुद्रापलीकडची ठिकाणं गाजू लागली आहेत. सुरुवातीला अमेरिका-युरोपमधील ठिकाणांचा प्रभाव प्रबळ होता, पण कालांतराने ‘हे पाहून झालं’ असं म्हणणाऱ्या पर्यटकांची पावलं आशियाई देशांकडे, अगदी ‘ऑफबीट’ ठिकाणांकडे वळली. मात्र आजही मनात एक प्रश्न खदखदतो- आपण खरोखर पर्यटनाच्या मुळाशी पोहोचतो आहोत की केवळ त्याच्या वरवरच्या झगमगाटात हरवतो आहोत?
आज बहुतांश पर्यटकांचं पर्यटन म्हणजे केवळ एक डिजिटल मोहीम वाटते- ‘गेलो, पाहिलं, फोटो घेतला, पोस्ट केला आणि परत आलो’- यात ‘अनुभवणं’ कुठेच दिसत नाही. सेल्फी स्पॉट्सवर गर्दी होते, पण त्या जागेचा इतिहास, संस्कृती पर्यटकाच्या लक्षातही राहत नाही. त्यात भर म्हणजे ‘जिथे जाल, तेथील खा आणि वागा’ या तत्त्वाचा विसर पडलेला दिसतो. काही जणांना परदेशात जाऊनही घरचं जेवण हवं असतं. ‘शाकाहार-मांसाहार’ ही निवड वैयक्तिक असली, तरी नवे चविष्ट अनुभव घेण्याची तयारी का नसावी? एकीकडे घरात हॉटेलसारखं जेवण हवं आणि हॉटेलात घरच्यासारखं- हा विरोधाभास आजही अनाकलनीय आहे. प्रवासात मद्याप्राशन आणि धिंगाणा हेही आता काही पर्यटकांच्या स्वभावाचे ठळक लक्षण झाले आहे. फ्लाइटमध्ये, हॉटेलमध्ये अगदी कार्यक्रमस्थळी दारू ढोसून गैरवर्तन करणं हे फक्त इतरांचे अनुभव बिघडवत नाही, तर आपल्यालाही त्या ठिकाणच्या सांस्कृतिक अनुभवांपासून वंचित करतं. याहून गंभीर बाब म्हणजे पर्यटनस्थळी महिलांशी गैरवर्तन. परदेशात किंवा देशांतर्गत बीचवर भारतीय पर्यटकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाच्या तक्रारी लाजिरवाण्या आहेत. ही केवळ एखाद्या व्यक्तीची चूक नसून, त्यातून संपूर्ण देशाच्या प्रतिमेवर ओरखडे उमटतात. ‘भारतीय पर्यटक? मग सावध!’ ही प्रतिमा निर्माण होणं ही फार काळजीची बाब आहे.
देशांतर्गत पर्यटन तर आणखीनच विदारक आहे. किल्ले, गड, प्राचीन वास्तू येथे ठिकठिकाणी थुंकीचे डाग, प्रेमकथा कोरलेल्या भिंती, जागोजागी फुटलेल्या बिअर बाटल्यांच्या काचा आणि पसरलेला प्लास्टिकचा कचरा हे दृश्य पाहून वाटतं की, आपण सौंदर्यदृष्टी गमावलेली एक जमात आहोत. पर्यटनस्थळे गालिचा घालून आपलं स्वागत करत असताना, आपण त्यांच्या स्वच्छतेवरच पाय ठेवतो. अशा वागण्यामुळे आपली पर्यटन संवेदनशीलता वाढते की फक्त इगो आणि इन्स्टाग्राम वाढतो हाच खरा प्रश्न आहे.
– तुषार निशा अशोक रहाटगावकर
वाचनाचा छंद जोपासण्यासाठी…
‘लोकरंग’ (१८ मे) मधील ‘बालमैफल’सदरातील ‘सुट्टीतील वाचनगंमत’ ही उज्ज्वला देशपांडे यांची गोष्ट वाचली. या गोष्टीत वाचनाचा छंद जोपासण्याचे दिलेले विचार अगदी योग्य आहेत. उन्हाळी सुट्टीत मुलांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आता वाचनालये कमी झाली असून अनेक ठिकाणी वाचनालये नसतात. किमान पुस्तक प्रदर्शनात जाऊन पुस्तके विकत घेणे, वाचनालय असल्यास वर्गणी भरून मुलांना पुस्तके घेऊन दिली तर वाचनाचा छंद लागेल. किमान घरी उत्तम दर्जाचे वर्तमानपत्र जरी घेतले तरी मुलांना वाचनाची सवय लागेल.
-प्र. मु. काळे, नाशिक.