|| संजय मोने

लहानपणी परीक्षेनंतरची सुटी मी कशी घालवली हे आठवलं की मला फार संकोचल्यासारखं होतं. कारण जी काही सुटीची वर्णनं वाचायला मिळतात- किंवा वाचावी लागतात, त्यातल्या कुठल्याच गोष्टी आमच्या सुटीच्या दिवसांत नसायच्या. मोठमोठे लेखक आपल्या बालपणीच्या दिवसांबद्दल भरभरून लिहितात. साधारण मजकूर गावांची बदलती नावं सोडल्यास सारखाच असतो. तेव्हा कशी सगळी मज्जा असायची आणि आता घराकडे बघायला कोणी नाही! काही कामानिमित्त हे सगळे लेखक फारा वर्षांनी परत आपल्या गावाला भेट देतात आणि मग आता घराचे वासेसुद्धा जागेवर नाहीत, दिवा लावायला एक कोणीतरीआहे, तो आता तेलाचे, तुपाचे भाव वाढले म्हणून थोडय़ा अधिक पशाची तरतूद करा म्हणून कुरकुरतो.. हा सगळा मजकूर फ्लॅशबॅक तंत्राने लिहिलेला असतो.

मग जुन्या आठवणींना उजाळा.. त्यात आंघोळीच्या जागेचा उल्लेख.. कोणीतरी झाडावरून पडलेल्या माणसाची आठवण.. तिसऱ्याच कोणीतरी ज्या विहिरीत जीव दिला होता तिथे टुरिस्ट अट्रॅक्शन असल्यासारखं भेट देऊन येणं.. शाकाहारी लेखक असेल तर काजूची उसळबिसळ खात असत त्याचं वर्णन.. मांसाहारी असेल तर मासे आणि नारळाची सोलकढी यांच्या नावाने गळा काढणं (बरेच लेखक मांसाहारीच असतात.. आहारात आणि आचारातसुद्धा!).

आणि मग सगळं संपलं की आताच्या काळात परत येऊन एक हमखास डोळ्यांच्या कडा ओलावणारा परिच्छेद हाणून लेखाच्या शेवटाला येऊन धापा टाकतात. (हा फक्त कडा ओलावणारा मजकूर एकदा अभ्यास करून शिकून घेतला पाहिजे.)

हे सगळे लेख वाचून मला नेहमी एक प्रश्न पडतो. मुळात तुम्हाला माहीत आहे ना, की आपल्या घराची वाताहत झालीय. आता कुत्रंसुद्धा तिथे हक्क सांगायला नसतं. मग आपण जायचंच कशाला? पण नाही. ते जातात.. जात राहतील.. आणि वाचकांना सुखावत राहतात/ राहतील. वाचक ही जमातसुद्धा अशी विचित्र आहे! म्हणजे जर कुठल्या लेखकाने अजून आपलं गावचं घर छान सुखात आहे. म्हणजे भरलं घर आहे, चांगली शेतीवाडी आहे, आंबे-कोकम यांचं बऱ्यापकी उत्पन्न आहे, गोठय़ात चार जनावरं आहेत, पोटापुरतं दुधदुभतं आहे, तुपासाठी दुकान गाठायला लागत नाही, तिथले नातेवाईक एकमेकांविरुद्ध कोर्टात गेलेले नाहीत. थोडक्यात, डोकं टेकायला एक हक्काचं घर आहे! ..असं आपल्या गावच्या घराचं वर्णन लेखकाने केलं तर ते वाचकांना रुचणार नाही. त्यांना ते सपक वाटेल. आणि हे लेखकसुद्धा या आपल्या अशा घरावर.. म्हणजे मागच्या दोन-तीन पिढय़ांमध्ये झालेल्या पडझडीवर- अगदी तीन नाही म्हणत मी- पण एखादं नाटक का लिहीत नाहीत? असो.

माझ्या लहानपणी आम्ही गावाला जायचो दरवर्षी. म्हणजे शाळेच्या परीक्षा संपल्या की ताबडतोब आठवडाभरात आम्ही आमच्या गावाला जायला निघायचो. म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात. सात-आठ दिवस इकडे तिकडे. सक्काळी सहा-साडेसहाची एस. टी. असायची. मुंबई-रत्नागिरी. पहिला थांबा- पनवेल. तोपर्यंत अर्धवट झोपेमुळे आमचा लोळागोळा झालेला असायचा. आई आणि दोन लहान बहिणी असा लवाजमा. वडील मुंबई सेन्ट्रलला सोडायला यायचे. हातात अख्खा रुपया द्यायचे. तो परत येईपर्यंत पुरायचा. महाडला त्या पशातले दहा पसे खर्च करून दोन बटाटेवडे खायचे. पुन्हा झोप आमचा ताबा घ्यायची. मग कशेडी घाटात एक वळण होतं, तिथं रस्ता अपुरा असल्यामुळे बस नीट वळायची नाही. त्यामुळे मोठी माणसं खाली उतरायची आणि बस मागे मागे येऊन पुन्हा सरळ व्हायची. त्यानंतर माणसं परत आत बसायची आणि बस पुढे निघायची. चिपळूण किंवा संगमेश्वर इथे घरून आणलेला डबा खायचा. आणि मग रत्नागिरीला तब्बल बारा तासांनी आम्ही उतरायचो तेव्हा सात वगरे वाजलेले असायचे. तिथून पुढे आमचं गाव बारा-तेरा किलोमीटर. पण तिथे जायला एवढय़ा उशिरा एस. टी. नसायची. आमचे एक नातेवाईक रत्नागिरीत होते, त्यांच्या घरी मग रात्रीचा मुक्काम. तिथलं जेवण साधंच. अगदी पिठलं, भात आणि पोह्यचा पापड वगरे. आई आणि ते गप्पा मारायचे. इथल्या तिथल्या गोष्टी. तुमची-आमची ख्यालीखुशाली वगरे. दुसऱ्या दिवशी एस. टी. पकडून आम्ही आमच्या गावाला जायचो. त्यानंतर मला आठवतं अंधुकसं.. घरून बलगाडी यायची. त्यातून आम्ही सगळे अर्धा तास प्रवास करून घरी पोचायचो. त्या प्रवासात अंगात फक्त थकवा असायचा आणि डोळ्यांत आदल्या दिवसाच्या प्रवासातील श्रमांमुळे अनावर झालेली झोप. कोकिळेचा आवाज, आंबे, काजू, नारळ यांच्या बागाबिगा किंवा मातीबितीचा वासबीस यातलं काहीही दिसायचं नाही. मनातसुद्धा यायचं नाही. त्याचं सविस्तर वर्णन करायचे दिवस तेव्हा आले नव्हते. ग्रामीण जीवनाची आस, कष्टकरी वर्गाचे हाल, निसर्गाकडे झेपावणारं मनबिन काही नव्हतं. एक- दीड महिना अभ्यास नाही, मनसोक्त आणि भरपूर खेळायला मिळणार, सपाटून आंबे खायला मिळणार.. इतकंच माहीत असायचं. करवंदं किंवा इतर खायला मिळणाऱ्या पदार्थाना ‘रानमेवा’ म्हणतात, हे आमच्या गावीही नव्हतं. घरी आमच्या गावाला झक्कास गरिबी होती. म्हणजे सगळ्या माझ्या काका आणि काकू, आत्या, त्यांची मुलं यांच्या अंगावर मोजके दोन-तीन कपडे असायचे. पण खाण्याबिण्याची ददात नव्हती. आमच्या दोन विहिरी होत्या. पण त्यात फार पाणी नसायचं. त्यामुळे ‘काकांनी विहिरीत ढकलून दिलं आणि पाठोपाठ स्वत: उडी मारून मला पोहायला शिकवलं..’ असले रोमहर्षक प्रसंग- जे पुढे थोडे वाढवून लिहिता येतात आणि गावच्या जीवनाशी आपली नाळ कशी जोडली गेली ते सांगता येतं, ते माझ्या नशिबात नव्हते. (पुढेमागे कधीतरी हे असले प्रसंग इतरांच्या लेखातून चोरून फक्त गावाचं नाव बदलून आपले म्हणून छापावेत असं मी मनाशी पक्कं ठरवलं आहे. च्यायला! सगळे लेखक आणि इतर माणसं असं बालपण जगलेत, मग आपल्याच आयुष्यात हे न्यून कशाला? नाही का?)

तर.. गावाला आम्ही घरी पोचलो की आजी मस्तपकी ओवाळायची. साधं ओवाळणं. भाकरतुकडा वगरे काही नाही. कोकणात भाताशिवाय फारसं काही पिकत नाही. उगाच तो भाकरतुकडा आणायचा कुठून? आणि असे काय दिवे लावून आम्ही आलो होतो- की भाकर आमच्यावर उधळायची? पण आजीच्या डोळ्यांत प्राण आलेले असायचे. सगळे काका-काकू आम्हाला पोटाशी धरायचे. अप्पा आजोबा मात्र जरासे स्वभावाने उग्र. खरं तर आता कळतं- ते थोडे आवाजी उग्र होते. त्यांचं हळुवार बोलणं म्हणजे साधारण पन्नास फुटांवर ऐकू जाईल इतकं मृदू. काकूआजी म्हणजे मात्र बासरीचा स्वर. माझी मोठी काकू म्हणजे तर अजब रसायन. तिला मी आयुष्यात कधीही एका जागी स्थिर पाहिलेलं नाही. माझे मोठे काका म्हणजे साक्षात् देवमाणूस. बोलणं, वागणं सगळं अगदी मंजूळ. अण्णाकाका आणि शोभाकाकू म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल. माझ्या गावच्या सगळ्या- एकजात सगळ्या काकू म्हणजे अन्नपूर्णा. त्यांच्या हातच्या भाकऱ्या पोळीसारख्या पातळ असत. एकेक कुठल्या कुठल्या भाजया त्या अशा काही करायच्या, की पानातल्या आंब्याच्या रसाकडेही कधी कधी दुर्लक्ष व्हायचं.

आमचं गाव तसं लहान. कुठलीही ऐतिहासिक किंवा सामाजिक घटना सुदैवाने आमच्या गावाशी निगडित नाही. आम्ही आमच्या सुटीत म्हणून गावाला जायचो; पण गावातली माझी भावंडं त्यावेळी शाळेत जायची. कारण त्यांना उन्हाळ्याची नाही, तर पावसाळ्यात सुटी असायची. आम्ही आल्यानं त्यांनाही शाळेत जायचा कंटाळा यायचा. पण आमचे आबाकाका म्हणजे एकदम डेंजर माणूस. त्यांच्यासमोर घरातलं कोणीच काही बोलायचं नाही. ते आवाज चढवून सगळ्या भावंडांना शाळेत पिटाळून लावायचे. आज मी वयाने मोठा झालोय, पण अजूनही आबाकाकांचा दरारा वाटतो. तेव्हा गावाला जाणं, हीच सुटी घालवायची सर्वमान्य प्रथा होती. त्याकाळी पसे देऊन ‘मामाच्या गावा’ला जायची दुरवस्था आली नव्हती.

गावाला कधी कधी आमच्या घरात वीस- पंचवीस माणसं वेळेला आलेली असायची. अंगणात झोपण्यातलं सुख तेव्हा चिक्कार मिळालं मला. सगळे खेळत असायचे. मी मात्र आमच्या ग्रामपंचायतीच्या वाचनालयात जाऊन दररोज वाचत बसायचो. बाबुराव अर्नाळकर आणि देवादिकांची चरित्रं एकाच मापात वाचून काढायचो. आज वार कुठला आहे याची फिकीर न करता दिवसच्या दिवस जायचे. गावात तेव्हा वीजबीज आली नव्हती. त्यामुळे सात-साडेसात वाजताच जेवणं व्हायची. मोठी माणसंही आठ-साडेआठ वाजताच झोपून जात. आम्ही मात्र अंथरुणात पडल्या पडल्या टिवल्याबावल्या करत राहायचो.

सकाळी सहा वाजताच आम्हाला जाग यायची. कारण घरात दिवसाच्या कामांची सुरुवात झालेली असायची. सकाळी न्याहारीत भरपूर मऊ भात खायला मिळायचा. सोबत लोणचं आणि पोह्यचा पापड. इतर वेळेला आंबे- फणस. आमची आजी आम्हाला कालवून, जवळ बसवून भात भरवणे वगरे मूर्खपणा करायच्या भानगडीत  कधीही पडली नाही. मला तर वाटतं, ज्यांना कामं असतात अशा कुठल्याही आज्या हे असले आचरट चोचले पुरवत नसतील. त्यामुळे मी आज इतरांना आलेल्या ‘आजीने भात भरवणे’ या अनुभवाला मुकलोय, हे तेव्हा तिच्या बिचारीच्या गावीही नसेल.

हा-हा म्हणता असे दीड-दोन महिने जायचे आणि मग परतीचा दिवस यायचा. आदल्या दिवशीपासून काकू आणि आजी अस्वस्थ असायच्या. आजी चक्क डोळ्यांना पदर लावायची. आणि मग आम्ही मुंबईला घरी परत यायचो.. नव्या वर्गात जायला.

आज आमच्या गावाला सगळ्या सुखसोयी झाल्या आहेत. गावची माणसं वेगवेगळ्या कारणांनी घरापासून दूर गेली आहेत. अलीकडे आमचं फारसं गावी जाणं होत नाही. मात्र, कधीही गेलो तरी जाताना आपल्याला हक्काचं एक घर आहे, हे आम्हाला ठाऊक असतं. याचं सगळं श्रेय आमच्या गावच्या माणसांना आहे. कारण मालकी हक्काने म्हणाल तर तिथे आमचं काहीही नाही. सगळं आहे ते माझ्या काकांचं आणि भावंडांचं. आमचा हक्क आहे तो फक्त नात्याच्या मालकीवर!

..अरेच्चा! हृदयद्रावक, काळजाला हात घालणारा मजकूर वगरे नसूनही झाला की लिहून लेख!

sanjaydmone21@gmail.com