सॅबी परेरा
जगात कुठेही काहीही घटना घडली किंवा कुणी काही विधान केलं की त्यावर सेलिब्रिटींच्या आणि राजकारणी लोकांच्या प्रतिक्रिया (त्यांच्या भाषेत बाइट) घेणे हे माइक नावाचा दंडुका घेऊन फिरणाऱ्या टीव्ही पत्रकारांचे मुख्य काम झाले आहे. मूळ घटना किंवा विधानाची पार्श्वभूमी ठाऊक असो की नसो, त्यावर आपल्या मगदुराप्रमाणे आणि आपल्या सोयीची प्रतिक्रिया द्यायला हे सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकही मागेपुढे पाहात नाहीत. समजा, हिंदी सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग्जबाबत महाराष्ट्रातील काही राजकारणी लोकांना त्यांची प्रतिक्रिया विचारली तर ते काय बोलतील याची एक झलक…

नाना पटोले

आरं ती बुढी बाई म्हणती, ‘‘मेरे करन-अर्जुन आएंगे.’’ मी विचारतो, कभी आयेंगे? आम्ही कधीपासून वाट पाहून राह्यलो. आरं, ते नक्की करन-अर्जुन आहेत की स्विस बँकेतले ब्लॅक-मनी आहेत? की मोदी सायबांचे पंधरा लाख आहेत? की अच्छे दिन आहेत? सगळे वाट पाहून राह्यले अन् ते काय येऊनच नाय राह्यले. मी तर त्या करन-अर्जुनला हात जोडून विनंती करतो की, बाबांनो तुमची ही लोकशाही नावाची म्हातारी मरायच्या आत एकदाचे या रे बाबांनो या!

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

देवेंद्र फडणवीस

अध्यक्ष महोदय, माझ्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत म्हणून मी जीवतोड मेहनत केली. मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या त्यावेळच्या सहकारी पक्षासोबत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच झाली तेव्हा सत्ता गेली तरी बेहत्तर, पण आम्ही आमच्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. आम्ही पहाटेचा शपथविधी केला, पण दुर्दैवाने ते सरकार टिकले नाही. आता दोन-दोन पक्ष फोडूनही मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत आम्हाला एक पाऊल मागे घ्यावं लागलं म्हणून आमची खिल्ली उडविणाऱ्या आमच्या विरोधकांना मी इतकंच सांगेन की, ‘‘हार के जीतनेवाले को बाजीगर कहते है!’’ आणि आमचं हे तीन पक्षाचं सरकार कोसळावं म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या उचापती लोकांना मी सांगू इच्छितो की, ‘‘बेटा, तुमसे ना हो पायेगा!’’

आणखी वाचा-लहानग्यांसाठी कार्व्हरची पुन्हा ओळख

अजित पवार

आज या ठिकाणी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, राजकारणात अशा काही गोष्टी असतात, अशी काही तत्त्वे असतात की त्यासाठी, त्या ठिकाणी कधी सत्तेला लाथ मारावी लागते तर कधी त्या ठिकाणी सत्तेला जवळ करावे लागते. जनतेच्या आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. आम्हाला स्वत:साठी काहीच नको आहे. इथे आलो तेव्हाही मी माझ्यासाठी काहीच मागितलं नव्हतं. पण तुम्हाला तर ठाऊक आहेच… हम जहाँ खड़े हो जाते है, डेप्युटी सीएम की लाइन वही से शुरू होती है.

एकनाथ शिंदे

आणि म्हणोन, ज्या दिवशी त्यांनी हिंदुत्वाशी युती तोडून भ्रष्ट लोकांसोबत आघाडी केली, तेव्हाच मी ठरवलं की हे अभद्र सरकार पाडायचं. त्यासाठी आम्ही रात्री जागवोन, वेषांतर करोन या ठिकाणी एक क्रांती घडवली आहे. आणि म्हणोन, मी आज जाहीरपणे त्यांना विचारतो, आज मेरे पास सत्ता है, खुर्ची है, महाशक्ती है, क्लीन चीट है, और तुम्हारे पास क्या है?… सिर्फ मातोश्री!

आणखी वाचा- देश बदल रहा है…

उद्धव ठाकरे

माझं कुटुंब, माझी जबाबदारी. मी माझ्या कुटुंबासोबत आहे. इतकंच नव्हे तर कुटुंब माझ्यासोबत आहे, किंबहुना अख्खा महाराष्ट्र हेच माझं कुटुंब असून ते माझ्यासोबत आहेत. आता यापुढे आम्ही एकहाती भगवा फडकावू. आमची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली. आता यापुढे आम्ही कुणाच्याही दारापुढे युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही, किंबहुना आम्ही कुणाच्या भिकेवर जगणार नाही. बाळासाहेबांनी म्हटलंय, जे उडाले ते कावळे जे राहिले ते मावळे. हल्ली-हल्ली काही कावळे इथून उडून त्या कमलाबाईच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे इथली घाण साफ झालीय. आणखी कुणाला जायचं असेल तर त्यांनीही जावे. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी!

संजय राऊत

हे बघा, बाळासाहेबांशिवाय दुसऱ्या कुणाला मी हिरो मानतच नाही आणि सिनेमातल्या फालतू हिरो-बिरोच्या डायलॉगवर मी प्रतिक्रिया देत नाही. या कचकड्याच्या हिरो लोकांना व्यवहारातलं काय घंटा कळते? त्याला कोण विचारतो? तुम्हाला सांगतो, मी हिरोसाठी नाही तर साइड हिरोसाठी पिक्चर बघतो. मग तो मुन्नाभाईमधला सर्किट असू दे, हेराफेरीमधला बाबूभाई असू दे, जॉली एलएल.बी. मधला जज असू दे नाहीतर बजरंगी भाईजानमधला चांद नवाब असू दे. तुम्हाला हिंदी सिनेमातील डायलॉगवरच काही लिहायचं असेल, तर माझ्या वतीने एक डायलॉग तुमच्या पिट्ट्यांना सांगा की, जब हम दोस्ती निभाते है तो अफसाने लिक्खे जाते हैं. और जब दुश्मनी करते है तो तारीख बन जाती है!

नारायण राणे

चपलानं मारलं पाहिजे अशे मोट्ट्ये मोट्ट्ये डायलॉग मारणाऱ्या एकेकाला. मुळात फायटिंग करायच्या आधी डायलॉग-बियलॉग मारायचेच कशाला? सरळ आपला कोंकणी हिसका दाकवायचा. म्हणजे पुन्ना आपल्या वाट्याला जाताना त्याने सात वेळा विचार केला पाह्यजे.

आणखी वाचा- आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांची शाळा

किरण माने

तो हिरो म्हनतो, ‘‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है… नाम है शहेनशाह.’’ अशे कचकड्याचे शहेनशाह आपन लै पाहिलेत. आनि ही आताचीच गोष्ट नाहीये गड्याहो. जुन्या काळातबी सत्तेसाठी लाचार असलेले काही लोक एखाद्या सुमार सरदाराची भाटगिरी करताना, त्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अद्वितीय युगपुरुषाशी करायचे. तुकाराम म्हाराज म्हणून गेलेत, अरे मूर्खांनो, कावळा कितीही गर्वानं फुगला तरी तो राजहंसापेक्षा ग्रेट होतो का?’’ अरे, एका हातात दोर अन् दुसऱ्या हाताला स्टीलचं चिलखत घालून रातच्याला रस्त्यावर फिरून कुणी शहेनशाह होत नाही रे भावा! सत्तेचं वारं फिरेल तशी टोपी फिरविणारा पाठीचा कणा नसलेला माणूस तर अजाबात शहेनशाह म्हणवून घेण्याचा लायकीचा नसतो. बहुजनांविषयी कळवळा असणारा, न्यायप्रिय शहेनशाह एक आणि एकच- छत्रपती शिवराय! त्यांच्या पायाच्या धुळीचीबी बरोबरी करू शकेल असा एकबी माईचा लाल पैदा झाला नाही आजपर्यंत. काजव्यानं जीव तोडून प्रकाशाची जाहिरात केली, तरी सूर्य हा शेवटी सूर्यच असतो गड्याहो. युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय. लै लै प्रेम महाराज, लब्यू तुकोबा!

रामदास आठवले

बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं
हम कोई हाटेल में चाय देनेवाले तंबी नहीं
ये मत सोचो कि तुमने हमको खरीद लिया
तुम्हारे खासदारकी के टुकडे पे दुम हिलाने वाले हम भी नहीं

आणखी वाचा- पडसाद : मातृभाषा दैनंदिन जीवनातील भाषावापरातून टिकते

जरांगे पाटील

तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख… एकदा बोलते के मुंबई जाके देंगे. मंग बोलते के अधिवेशन में ठराव पास करके देंगे, मंग बोलते के कोरट में जाके देंगे. अरे क्या खेळ मांड्या हय काय! हमको तुमरा भीक नय मांगता. तुम नय देंगे तो हम मुंबई आके तुम्हारे हात मे से खेचून घेंगे. घेयेंगे ना मंग आरक्षण! सगळेच्या सगळे मंत्रालय जायेंगे. बेसन, बाजऱ्या, गाड्या, बारदान सब्बन संगं घे के निघेंगे! जे लगता है पांघरन-बिंघरुन सब घेके पायी-पायी डांबरी रस्ते से जायेंगे. सग्या-सोयऱ्यासकट सगळ्यांना आरक्षण लेंगे. देने का हय तो तैसा बोलो. देने का नै तो तैसा बोलो. कायको डोकेको ताप देते मंग उगंच्याउगं? तुम क्या बोला, आंदोलन स्ट्रॅटेजी कैशी रहेगी? चांगली रहेंगी अन् कैशी रहेंगी. अब को हम लै ताकत से जा रहे हैं. मरेंगेच, पण आरक्षण घेकेच आयेंगे, नहीं तो माघारीच नहीं आयंगे.

राज ठाकरे

म्हणे, मोगॅम्बो खूश हुआ! पण मी म्हणतो, तो आतापर्यंत दु:खी का होता? आताच का खूश झाला? त्याच्या एकट्यानेच अच्छे दिन आलेत की काय? स्विस बँकेतून आलेले पंधरा लाख आज त्याच्या खात्यात जमा झाले काय? की त्याने सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने ईडी, सीबीआय या सगळ्यांनी त्याला क्लीन चीट दिलीय? माझा त्या मोगॅम्बोला सल्ला आहे, बाबारे, आपली खुशी न बघवणारे लोक सत्तेवर आहेत. तू खरोखर खूश झाला असशील तरी असं जाहीरपणे सांगू नकोस. मी तुम्हाला हेही सांगतो, एकदा फक्त एकदा आपल्या राजाला साथ द्या, महाराष्ट्रातली जनता, हे बारा-तेरा कोटी मोगॅम्बो खूश करतो की नाही बघा!

शरद पवार

तुमच्या सिनेमातला राजकुमार म्हणतो की, ‘‘जानी… हम तुम्हें मारेंगे, और ज़रूर मारेंगे… लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक़्त भी हमारा होगा.’’ पण आम्ही या पुरोगामी महाराष्ट्रातले विकासासाठी राजकारण करणारे गांधीवादी राजकारणी आहोत. आम्हाला मुळात ही बदल्याची आणि हिंसेची भाषाच मान्य नाहीये. आम्ही कुणाची राजकीय शिकार करीत नाही. कधी एखाद्याची राजकीय शिकार झालीच तर त्यासाठी वापरलेली बंदूक दुसऱ्याची असते, त्यातील गोळी तिसऱ्याची असते आणि ज्याची शिकार होते त्याची वेळ खराब असते. त्यात माझा काहीही हात नसतो.

sabypereira@gmail.com