खिडकी उघडली. बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. रात्रभरच्या प्रवासानं आंबलेलं अंग ताजंतवानं झालं. चढउताराचा वळणदार रस्ता होता. ड्रायव्हरमामांनी टेप बंद केला. मंद दिवा तेवत राहावा तशी त्यांच्याच आवडीची हिंदी गाणी रात्रभर सुरू होती. मी आपला ड्रायव्हरशेजारच्या सीटवर टक्क जागा.. तर कधी पेंगत बसलेलो होतो. गाव जवळ येताना विशिष्ट खाणाखुणा दिसायला सुरुवात होते. तसं पहाट होताना वातावरणात ओळखीचे बदल जाणवायला लागतात. थंड हवेत पहाटेचा एक वास पसरतो. फार कमी वेळा ही पहाटेची थंड हवा आपण अंगावर घेतो. बहुतांश वेळी या रामप्रहरी आपण साखरझोपेत असतो. म्हणूनही या वेळेचं अप्रुपवाटतं. पाखरं मात्र या थंड हवेच्या अलार्मला दाद देऊन किलबिलायला लागतात. हा पक्ष्यांचा आवाज सुरू असताना अंधार वितळायला सुरुवात झालेली असते.  एखाद्या खोडकर पोरानं लाल शाईची दौत सांडून द्यावी तसा लाल रंग आकाशात पसरू लागलाय.. म्हणजे तांबडं फुटलंय. रंगमंचावर हळूहळू प्रकाश उजळताना पात्रं, वस्तू स्पष्ट व्हाव्यात तसा भोवताल उजळू लागलेला होता. एका उतारातून वर चढाला लागल्यावर समोर पिवळसर प्रकाश चमकला. चढ चढून सपाट रस्त्यावर आल्यावर समोर नवथर लालबुंद गोळा चमकत होता. आईच्या उदरातून नुकतंच जन्माला आलेलं बाळ जणू बंद मुठींचे हात हलवतंय. उगवलेल्या सूर्याचं हे मोहक रूप मी मनात साठवत  होतो. ड्रायव्हरमामांनी तर चक्क कृतीच केली. म्हणजे स्टेअिरगवरचे हात क्षणभर जोडून सूर्याला नमस्कार केला. त्यांनी मलाही रामराम घातला. मीही रामराम करून प्रतिसाद दिला. चांगलं उजाडलं होतं. रांगत घरभर हुंदडणाऱ्या लेकरासारखा प्रकाश आता धीट झालेला होता. अजून आमचा ठेपा यायला तीनेक तास बाकी होते. काहीच करता येत नसेल तेव्हा किमान आपण विचार करू शकतो. अंगावर पडलेलं कोवळं ऊन खात बसल्या जागी मी सूर्याचा मोहक लालबुंद गोळा आठवत होतो.

उगवत्या सूर्याला नमस्कार करतात तसंच संध्याकाळी अंधारून येताना दिवा लावला जातो तेव्हाही मनोभावे नमस्कार करण्याची प्रथा आहे. आता तेलाचे दिवे, कंदील राहिले नाहीत. तरीही संध्याकाळी विजेचा दिवा लावला जातो तेव्हा काही ठिकाणी आजही नमस्कार केला जातो. थोडक्यात काय, तर प्रकाशाला नमन करण्याची ही प्रथा आहे. सूर्याला नमस्कार करण्याची ही प्रथा कधीपासून सुरू झाली असेल, का सुरू झाली असेल, अशा प्रश्नांशी शब्दकोडी सोडवल्यासारखा खेळत बसलो. (अगदी आदिबंध वगैरे शोधण्याचा प्रयत्न नव्हता.) चालत्या गाडीत धुंडाळायला कुठलेही संदर्भ नव्हते. मग मीच संदर्भ जुळवायला लागलो.

एका दृश्याची कल्पना डोक्यात आली. म्हणजे असं काहीसं घडलं असावं. गुहेच्या तोंडाशी थोडा प्रकाश शिल्लक असताना संध्याकाळी दोन आदिमानव गुहेत बसलेले. पुरेशी भाषाच नाही; मग बाकी काय असणार? शिकारीच्या मागे पळायचं.. अणकुचीदार दगडांनी प्राणी मारायचा.. ही शिकार मग गुहेत आणून सर्वानी मिळून खायची. अग्नी अजून उपयोगात आलेला नव्हता. म्हणून कच्चं मांस खाऊनच पोट भरायचं. ऊन-पावसापासून संरक्षण म्हणून गुहेत बसून राहायचं. काही ध्वनी, खाणाखुणांच्या आधारे जुजबी संवादही होत असेल त्यांच्यात. बाकी बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या दिवशीही संध्याकाळच्या वेळी दोघे एकमेकांसमोर दगडावर बसलेले होते. पाहता पाहता ते दोघे एकमेकांसाठी गायब झाले. पहिल्याला दुसरा दिसेना. दुसऱ्याला पहिला दिसेना. नेमकं काय झालं, त्यांना कळेना. झालं काहीच नव्हतं. रात्र झाल्यामुळं अंधार पडला होता. त्यामुळं दोघे समोरासमोर असूनही एकमेकांना दिसत नव्हते. रात्रभर ते बसून राहिले. तिथेच झोपलेही असतील. पाखरं किलबिलायला लागली. गुहेच्या तोंडाशी कोवळा प्रकाश आला. सोबतीला सूर्याचा लालबुंद गोळाही दिसू लागला. या गोळ्याच्या साक्षीनं अचानक गायब झालेले ते दोघे एकमेकांना सापडले. अशा अचानक गायब झालेल्या अनेक गोष्टी या जादूई लाल गोळ्यामुळं सापडू लागल्या. दोन आदिमानवांनी आपल्या सापडण्याचा संबंध प्रकाशमान गोळ्याशी लावला. शिकार करणारे त्यांचे कर्तृत्ववान हात नकळत जोडले गेले. अशाच एखाद्या घटनेपासून सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा सुरू झाली असावी.

गुहेत शिरलोच आहोत तर गुहेतली एक गोष्ट सांगण्याचा मोह होतोय. अश्मयुग. अजून अग्नी वापरात आलेला नाही असा काळ. वातावरण वेगळं काय असणार? प्राण्यांची अणकुचीदार दगडांनी शिकार करायची. कच्चं मांस खाऊन दिवस ढकलायचा. नदीचं वाहतं पाणी होतं. राहण्यासाठी गुहा होतीच. आदिमानवांचा एक समूह गुण्यागोविंदानं राहत होता. शिकार करताना सगळे मिळून प्राण्याला सापळ्यात पकडायचे. सगळे मिळून कच्चं मांस खायचे. हे सगळं सुरू असताना एक लांब नाकाचा आदिमानव पुढाकार घ्यायचा. सगळ्यांना मदत करायचा. हा लांब नाकवाला सतत काहीतरी नवीन करीत असे. एकदा झाडाची सालं पांघरून झोपला. एकदा तर झाडाची साल अंगाला गुंडाळून फिरला. भाषेत सांगणं शक्य नव्हतं; पण बाकीच्यांना हे खटकलं होतं. या लांब नाकवाल्याचे नवनवीन प्रयोग सुरूच असायचे. शिकार करताना खवळलेल्या प्राण्याने एकाला शिंग मारलं. मोठी जखम झाली. भळाभळा रक्त वाहायला लागलं. शेवटी या जखमीला लांब नाकवाल्याकडे नेण्यात आलं. लांब नाकवाल्यानं एका झाडाचा पाला दगडानं ठेचून चोथा केला. तो पानांचा चोथा जखमेत भरला. काही दिवसांत जखम बरी झाली. अशा नव्या गोष्टी करून पाहणं हाच लांब नाकवाल्याचा छंद झाला. तो एकटाच भटकत असायचा.

एकदा जंगलात वणवा लागला. प्रचंड ज्वाळांनी जंगल वेढलं गेलं. एका टेकडीवर बसून लांब नाकवाला हा विध्वंस पाहत होता. आता जंगल जळून खाक होणार, अशा वेळेला प्रचंड मोठा पाऊस सुरू झाला. वणवा विझू लागला. दुसऱ्या दिवशी जळलेल्या जंगलातून लांब नाकवाला फिरत होता. फिरताना त्याला एक हरणासारखा जळलेला प्राणी सापडला. भाजून काळपट झालेला प्राणी लांब नाकवाल्यानं चाखून पाहिला. खरपूस भाजलेलं मांस प्रथमच तो चाखत होता. ते भाजलं गेलेलं मांस त्याला खूप आवडलं. त्याने तो जळलेला प्राणी पाठीवर टाकून गुहेत आणला. ही विचित्र शिकार बघून बाकी आदिमानव जमा झाले. कुतूहलाने शिकारीकडे पाहू लागले. कारण शिकार म्हणजे रक्तबंबाळ झालेला प्राणी असंच त्यांना माहीत होतं. हा तर जळून काळाठिक्कर झालेला प्राणी होता. रक्ताने माखलेली शिकार नाही म्हणजे काहीतरी अघटित घडलेलं होतं. कुजबुजणं शक्य नव्हतं. पण जमलेल्या आदिमानवांनी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं. त्या नजरेत नापसंतीही होतीच. धर्म-पंथ नव्हते. त्यामुळे धर्माच्या विरुद्ध काही घडलेलं नव्हतं. कुणाच्या भावना दुखावल्या नव्हत्या. तरीही शिकारीची तयार झालेली वहिवाट लांब नाकवाल्यानं मोडलेली होती. मिळालेली शिकार सगळ्यांनी मिळून फस्त करायची असा रिवाज होता. त्यामुळं लांब नाकवाल्यानं वणव्यात भाजला गेलेला प्राणी सगळ्यांसमोर ठेवला. पण कुणी त्याला स्पर्शही केला नाही. उलट, सगळेजण पाय आपटत गुहेबाहेर निघून गेले. जाताना विचित्र आवाज काढत होते. लांब नाकवाल्यानं खरपूस भाजलेलं मांस एकटय़ानं फस्त केलं.

या गोष्टीतील शेवट अचानक अनपेक्षित वळण घेतो. तिथं आपण थबकतो.

‘अश्मयुगात

आदिमानवाला एक

अणकुचीदार दगड सापडला-

आणि

दुसऱ्या दिवशी एका गुहेत

जखमांनी सजलेल्या

रक्तबंबाळ माणसाचं एक प्रेत..

या दोन घटनांचा

एकमेकांशी संबंध नाकारण्याची प्रथा

बुरशीसारखी वाढत गेली,

परिणामी गुहेतला आदिम अंधार

फणा आपटत गावात शिरलाय,

लोक शोधतायत

अडगळीत ठेवलेल्या काठय़ा-कुऱ्हाडी

आणि इकडे

कंदिलावरची काजळी वाढत चाललीय.’

त्या दिवशी भाजलेलं मांस खायला नकार देऊन सगळे आदिमानव पाय आपटत निघून गेले. लांब नाकवाला भाजलेलं मांस खाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गुहेच्या दारातून कोवळा प्रकाश आत आला. त्या प्रकाशात लांब नाकवाला मरून पडलेला स्पष्ट दिसत होता. अणकुचीदार दगडाने लांब नाकवाल्याचं डोकं ठेचलेलं होतं. रक्तानं माखलेल्या चेहऱ्यावरचं टोकदार लांब नाक उघडय़ा डोळ्यांसोबत भेसूर दिसत होतं. बाकी गुहेत कुणीच नव्हतं. गुहेच्या तोंडाशी रक्ताने माखलेला एक अणकुचीदार दगड पडलेला होता. लांब नाकवाल्याला नेमकं कुणी मारलं, याचं उत्तर मिळालंच नाही. पण गुहेच्या तोंडाशी सापडलेला, रक्ताने माखलेला दगड आदिमानवांनी जमिनीत रोवला. पुढं चालून शिकार करून आणलेल्या प्राण्याचं थोडंसं रक्त त्या रोवलेल्या दगडाला वाहण्याचा रिवाज सुरू झाला.

वर्तमानकाळातल्या ड्रायव्हरने उगवत्या सूर्याला केलेल्या नमस्काराचं मूळ शोधण्यासाठी आपण भूतकालीन गुहेत गेलो. रात्रीच्या अंधारात एकमेकांसाठी अदृश्य झालेल्या आदिमानवांची घटना रचली. आता लांब नाकवाल्याच्या भूतकालीन घटनेतून वर्तमानकालीन घटनेकडे उलट यायचं ठरवलं तर..? खरं तर असा उलटा विचार करणं बरोबर नाही. अश्मयुगातल्या गुहेत घडलेल्या घटनेची तुलना वर्तमानकाळातील घटनेशी करणं योग्य नाही. लांब नाकवाल्याचा विचार पटला नाही म्हणून त्याला आदिमानवांनी मारून टाकलं असं समजूया. कारण तेव्हा चर्चा करायला भाषा नव्हती. लांब नाकवाल्याचा खुनी सापडला नाही, कारण तेव्हा प्रशासन नव्हतं. तपास यंत्रणाही नव्हती. आता आपल्याजवळ सर्व काही आहे. सक्रिय सरकार आहे. गतिशील प्रशासन आहे. समर्थ तपास यंत्रणाही आहे. त्यामुळं सगळं काही छान चाललंय. आता समाज म्हटल्यावर चार-दोन घटना घडणारच..

 

ता. क. : वरील मजकूर वाचून कुणाच्या खोडकर डोक्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी अशी नावं येत असतील तर तो त्या लोकांचा दोष आहे. सदरील लेखकाचा प्रामाणिक हेतू अश्मयुगातील गोष्ट सांगणे, एवढा आणि एवढाच आहे.

 

दासू वैद्य -dasoovaidya@gmail.com