भाजप आणि लोकजनशक्ती पार्टीचे मनोमीलन झाल्याने लोकसभेच्या निवडणुकीसाठी बिहारमध्ये आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षावरील दडपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बिहारमधील हा तिढा शक्य तितक्या लवकर सोडविला पाहिजे, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी व्यक्त केल्याने पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोगत त्यामधून ध्वनित होत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्ष विविध राज्यांत कोणा समवेत युती अथवा आघाडी करणार या बाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅण्टनी चर्चा करीत आहेत.बिहारमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) युती करावयाची की सत्तारूढ जद (यू)शी युती करावयाची, की स्वबळावरच निवडणुकीच्या रिंगणात उतरावयाचे याचा निर्णय अॅण्टनी यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. राजद आणि लोकजनशक्ती पार्टीने वेगळे मार्ग स्वीकारल्याने काँग्रेसने गेल्या वेळेची निवडणूक स्वबळावर लढविली होती.