लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवारी तीन राज्यांमधील ४१ मतदारसंघात मतदान झाले आणि ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. सोमवारी झालेल्या अखेरच्या टप्प्यात गेल्या आठ टप्प्यांतील मतदानापेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली असून आता अवघ्या देशासह साऱ्या जगाचे लक्ष १६ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी सोमवारी तीन राज्यांमध्ये मतदान झाले. त्यापैकी बिहारमध्ये ५७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७९.३ टक्के आणि उत्तर प्रदेशात ५५.२९ टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले असून तेथे ५५.३४ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.
उत्तर प्रदेशातील १८ जागांसाठी, पश्चिम बंगालमधील १७ जागांसाठी आणि बिहारमधील सहा जागांसाठी सोमवारी झालेल्या मतदानात नरेंद्र मोदी, आपचे अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अजय राय, मुलायमसिंह आदी नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.