गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्रातील गोरगरीब, वंचितांचा कैवारी हरपला आहे. त्यांनी केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आपल्या कारकिर्दीत मुंडेंनी केलेले कार्य पहाता दुसरे मुंडे होणे नाही, अशा शब्दांत विधानसभेने गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंडे यांच्या आठवणींनी अवघे सभागृह गहिवरले. त्यांनी महाराष्ट्रात दिलेल्या योगदानाबद्दलचा कृतज्ञता प्रस्ताव शुक्रवारी संमत करण्यात आला. या झंझावाती नेत्याच्या निधनाने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव मांडताना नमूद केले. राजकारणात मर्यादा सोडू नये, हा वस्तुपाठ मला मुंडे यांच्याकडून मिळाला, अशा भावना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे  पाटील यांनी व्यक्त केल्या.
या प्रस्तावाला पाठींबा देताना मुंडे यांच्या आठवणींनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा गळा दाटून आला.  महाराष्ट्रातील दिग्गज नेते ऐन उमेदीच्या काळात निघून गेल्याने महाराष्ट्राला दृष्ट लागल्याची भावना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखविली.  लोकनायकच गेल्याने भाजपला गड आला पण सिंह गेला अशी स्थिती भाजप व मित्र पक्षाची झाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. मुंडे यांनीच कणखरपणे मुंबईतील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले. मोक्का सारखा कायदा केल्याच्या आठवणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या.  सुभाष देसाई यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने भाजपचेच नव्हे तर शिवसेनेचेही नुकसान झाल्याचे सांगितले.