भाजपमध्ये खूप काही सोसलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी केंद्रात व राज्यात दोन मंत्रीपदे देऊ केली गेली होती. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘भगवा टिळा’ लावून मुंडे यांना रोखले, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंडे यांचे निकटचे सहकारी व भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. मुंडे यांच्या मृत्यूची वैद्यकीय कारणे वेगवेगळी सांगितली गेली व अपघातानंतर ५० मिनिटांमध्ये त्यांचे निधन झाल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही फुंडकर यांनी केली.
मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘कृतज्ञता’ प्रस्तावावर विधान परिषदेतील चर्चेत बोलताना फुंडकर यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मुंडे यांनी बरेच काही सहन केले आहे. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्यासाठी ‘ऑफर’ देण्यात आली होती. ते शिवसेनाप्रमुखांना भेटले. पण त्यांनी पक्ष सोडू नको, असा सल्ला दिला. त्यांनी आम्हालाही विचारल्यावर मीही विरोध केला होता. त्यामुळे ते बारगळले. त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर अपमानित होण्याचे प्रसंग आले, तेव्हा हेच पाहण्यासाठी मला थांबवले होते का, असे ते विचारत असत. त्यावेळी व आता निवडणुकीच्या वेळीही त्यांची कोंडी झाली होती. अनेक सुखदु:खाच्या प्रसंगात मी त्यांची साथ दिली. आता त्यांना चांगले दिवस आले होते. केंद्रात मंत्रीपद मिळाल्यावर सत्तारूढ बाकांवर बसण्याची संधी मिळाली, पण हे दिवस पाहण्यासाठी ते राहिले नाहीत, असे फुंडकर यांनी सांगितले.
अमरसिंह पंडित व भाई गिरकर यांनीही याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन मुंडे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून जनतेच्या मनातील शंका दूर करावी, यासाठी मी स्वत: केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.