देशभरात रक्षाबंधनाचा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला. महिला, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या. वृंदावन व वाराणसी येथील विधवा तसेच भाजप महिला मोर्चा, दिल्ली शीख प्रतिनिधी सभा, शाळकरी मुले, विशेष मुले व गुजरातच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांना राख्या बांधल्या. अल्पसंख्याक कामकाजमंत्री नजमा हेपतुल्ला व साध्वी ऋतंभरा यांनीही पंतप्रधानांना राख्या बांधल्या.
वाराणसी व वृंदावन येथील आश्रमात राहणाऱ्या विधवांनी रेस कोर्स रोड येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राख्या बांधल्या.
सारनाथ आश्रम येथील  राजकुरी अन्नपूर्णा, तर नेपाळी आश्रमाच्या शकुंतला यांनी वाराणसी व वृंदावन येथील विधवांनी तयार केलेल्या २००० राख्या पंतप्रधानांना दिल्या. सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने वृंदावन, वाराणसी व केदारनाथ येथील पंधराशे विधवांचे पुनर्वसन केले आहे.
 पश्चिम बंगालच्या मनू घोष व वृंदावनच्या आरती मिस्त्री यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन राख्या बांधल्या. होळी व दीपावलीनंतर या विधवा प्रथमच रक्षाबंधनात सहभागी झाल्या.
मोदींना भाज्यांची राखी
बडोदा: भाज्यांचे भाव भडकल्याने त्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना टोमॅटो आणि भाज्यांची राखी पाठवण्यात आली. भाववाढीविरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मोदी सरकारने निवडणूक प्रचारात मोठी आश्वासने दिली, मात्र वाढवाढ रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप बडोदा महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या पुष्पाबेन वाघेला यांनी केला.