कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई: विरार शहरात ही शारदीय नवरात्री उत्साचा जल्लोष सुरू आहे. विशेषतः या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शहरातील देवी देवतांच्या प्राचीन कालीन मंदिरात जागर करण्यात येत आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ल्यातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरातही घटस्थापना करून जागर सुरू करण्यात येत आहे. विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला हे ऐतिहासिक परिसर आहे. या भागात अनेक वर्षे जुने प्राचीन कालीन कालिका देवीचे मंदिर आहे. सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे ती पुर्वी मराठ्यांनी तयार केलेली सागरी जेट्टी होती असे काही इतिहास अभ्याकांचे मत.

जंजिरे अर्नाळा -अर्नाळा गावाविषयी संबंध पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे ती अशी..जंजिरे अर्नाळा गाव हे सीतमातेचं माहेरघर आहे आणि जोपर्यंत  सीतामाईचा या गावावर वरदहस्त आहे तोपर्यंत कुठलीही नैसर्गिक -मानव निर्मित आपत्ती या गावाला ठेच पोहचू शकली नाही याबाबत तसा  कोणताही पुरावा नसला तरी आजही असंख्य वादळे, सुनामी लाटा यांचा कधी त्रास झाला नसल्याचे येथील गावकरी सांगतात. विशेषतः या भागात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहत असून या बांधवांची ग्रामदेवता म्हणून कालिका माता प्रसिद्ध आहे.

आणखी वाचा-विरारच्या जीवधन गडावर नवरात्रीनिमित्ताने जीवदानी देवीचा जागर

मागील काही वर्षांपासून या देवीची प्रसिद्धी अधिकच वाढू लागली आहे. मंदिरात जाण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून बोटीत बसून अर्नाळा किल्ला असा प्रवास करावा लागतो. या मंदिरात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजूबाजूच्या गावकऱ्यांसह इतर भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त या मंदिराला भेट देतात. मंदिरात नऊ दिवस पूजा पाठ, आरती यासह इतर कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. याच भागात ऐतिहासिक जंजिरे अर्नाळा किल्ला सुद्धा असल्याने आपसूकच अनेक भाविक भक्त व पर्यटक यांचा ओढा अधिक असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दसऱ्याला कालिका मंदिरात सर्वाधिक गर्दी

अर्नाळा किल्ल्यातील कालिका मातेच्या मंदिरात दसऱ्याला पालघर जिल्ह्यातील विविध गावातील कोळी बांधव  कुटुंबासह बोटी घेऊन देवीच्या दर्शनासाठी येतात. नारळीपौर्णिमेप्रमाणेच दसरा हा सुद्धा येथील कोळी बांधवांचा मोठा सण आहे. त्यामुळे दसऱ्याच्या या मंदिर परिसर अगदी भक्तीमय व आनंददायी वातावरण असते. २० ते २५ वर्षांपूर्वी दातिवरे कोरे, एडवण गावातील भाविक आपल्या बोटी तारवे घेऊन देवीच्या दर्शनासाठी येत असत त्यावेळेस संबंध बंदर बोटीने फुलून जात असे. काळ बदलला आणि कोळी बांधव ही नोकरी धंद्याला लागला त्यामुळे ही लोक आजही बोटीने येत नसले तरी आपली देवीच्या दर्शनाला येण्याची परंपरा  आजही जपून आहेत.