भरधाव कारने उभ्या टिपरवर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थी ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-गडचिरोली मार्गावरील चुरमुरा गावाजवळ रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. जखमींवर उपचार सुरू आहेत. मृत व जखमी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. अधिक माहितीनुसार, गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाचे ९ विद्यार्थी रविवारी रात्री सफारी (एमएच ४०, एसी ०३३२) या वाहनाने पार्टी करून परत गडचिरोलीकडे येत होते. भरधाव वेगात असलेली त्यांची गाडी चुरमुरा या गावाजवळ रस्त्यालगत नादुरूस्तीमुळे उभ्या असलेल्या टिपरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की सफारी गाडीच्या समोरचा भाग चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे पाच जण जागीच ठार झाले. प्रणय रमेश गेडाम (रा.आष्टी, जि.गडचिरोली), निहाल धनलाल प्रदीते (रा.आमगाव, जि.गोंदिया), प्रशांत सुधाकर रणदिवे (रा. बल्लारशहा जि.चंद्रपूर), अंकित वेलादी (रा.कोटी) आणि वैभव पावे (पेंढरी, गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. तर जुनेद कादरी (करपना, जि.चंद्रपूर), दीपक जयराम निमकर (वणी, जि.यवतमाळ), आकाश तडवी (जळगाव) व शुभम मंगरे (गडचिरोली) हे गंभीर जखमी आहेत. त्यापैकी दोघांना चंद्रपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.