औरंगाबाद : औरंगाबाद येथे दंगलीत पोलीस प्रशासनाच्या चुकांवर आता बोट ठेवले जात आहे. त्यात तथ्य असेलही. पण एक आदर्श असाही आहे. शुक्रवारी रात्री दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर जखमी झाले. त्यांच्या स्वरयंत्राला मार लागला. त्यांना बोलता येणे शक्य नाही, असे डॉक्टर सांगू लागले. गंभीर जखमी झालेल्या कोळेकरांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी सकाळी ते शुद्धीत आले. शुद्धीत आलेल्या कोळेकरांना त्यांना काही त्रास होतो आहे का, हे जाणून घेण्यासाठी एक वही-पेन देण्यात आले आणि त्यावर त्यांनी लिहावे, असे डॉक्टरांनी सुचविले. कोळेकरांनी कागदावर लिहिलेले पहिले दोन शब्द होते, ‘दंगल नियंत्रणात?’ स्वत:ला होणारा त्रास सांगण्यापूर्वी कर्तव्यनिष्ठेचे त्यांचे दोन शब्द प्रेरणादायी होते, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सिग्मा रुग्णालयाचे डॉ. अजय रोटे यांनी सांगितले. शुक्रवारी रात्रीच्या दंगलीत जखमी झालेले कोळेकर यापूर्वीही दोन वेळा अशाच प्रकारच्या हाणामाऱ्यांमध्ये जखमी झाले होते. पण मोठा जमाव दिसल्यानंतर ते डगमगले नाहीत. पुन्हा सामोरे गेले. खरेतर ते सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते. नोकरीचा एवढा कमी कालावधी राहिल्यानंतर सर्वसाधारणपणे ‘धोका नको’ अशी भूमिका घेताना अनेक जण दिसतात. पण कोळेकरांनी धाडस दाखवले. जखमी झाल्यानंतर शुद्धीत आलेल्या कोळेकरांनी वहीत त्यांना होणारा त्रासही नंतर लिहिला. पण त्याच वेळी आपल्याबरोबर असलेल्या जखमी सहकाऱ्यांची चौकशी करायलाही ते विसरले नाहीत. त्यांचा मुलगा नितीन कोळेकर यांच्यासमवेत त्यांनी लिहिलेल्या वहीतील एक मजकूर असा आहे- ‘माझ्या बरोबर जखमी झालेले परोपकारी कसे आहेत?’ परोपकारी हे औरंगाबाद येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात. तेदेखील दगडफेकीत जखमी झाले होते. पण बोलता येत नसताना आपल्या सहकाऱ्याला अधिक लागले तर नाही ना, याच्या काळजीपोटी त्यांनी लिहिलेला हा मजकूरही पोलीस दलाला अधिक प्रेरणा देणारा आहे. नितीन कोळेकर यांनी या मजकुराची माहिती दिली. पोलिसांनी दंगल हाताळण्यात चुका केल्याही, पण काही अधिकारी जिगरबाज असतात. कोळेकरांचा त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘मुंबई येथे उपचार घेत असणाऱ्या गोवर्धन कोळेकर यांनी आपली प्रकृती सुधारत असल्याचे कळविले असून एक महत्त्वपूर्ण संदेश औरंगाबादकरांना दिला आहे. ते म्हणतात, शहरात शांतता ठेवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. जातीपेक्षा माणूस महत्त्वाचा असतो. माझी प्रकृती बरी आहे.’