रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेवरून राज्यात पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरुद्ध विरोधक असा वाद उभा राहताना दिसत आहे. अन्वय नाईक प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विरोध बाकांवरील भाजपाने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल राहुल गांधी यांच्याकडेच उत्तर मागितलं आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. या प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब गोस्वामी यांना अटक केली.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

या अटकेवरून देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कटाचा भांडाफोड केल्याची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. टुकडे टुकडे गँग असो की, पालघरमधील खूनी, यांना शरण देणारे कोण आहेत? याचं उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे देश मागत आहे. त्याच काँग्रेसच्या इशाऱ्यांवर नाचणारं कुमकुवत सरकार महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेनं घेऊन जात आहे. माध्यमांच्या अभिव्यक्तीविषयी बोलणारे आता कुठे लपून बसले आहेत? आज सगळे दुतोंडी चेहरे उघडे पडले आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

आणखी वाचा- भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली- चंद्रकांत पाटील

आणखी वाचा- “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण…,” अर्णब गोस्वामी अटकेवरुन फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे”,असं फडणवीस म्हणाले होते.