राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे हे पुन्हा पाठवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “याबाबत कोणतेही खबरदारी घेताना राज्यातील सरकार दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे,” असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

“फेब्रुवारी 2020 मध्ये महिला तसंच तरुणींना जाळून मारण्याच्या किमान सात घटना घडल्या होत्या. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगावांत या घटना घडल्या होत्या. पुढे दिशा कायद्याची चर्चा माध्यमांमध्ये घडविली गेली आणि कालांतराने तो प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला गेला. पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार (17 जुलै), सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग (20 जुलै), पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग (20 जुलै), इचलकरंजी क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग (15 मे), नंदूरबारमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, चंद्रपूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीचा विनयभंग, मालाड येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग, मिरा-भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा येथे शासकीय लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणे अशा अनेक घटना यापूर्वीच्या पत्रात नमूद केल्या होत्या,” असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे.

“सातत्याने वाढणार्‍या आणि नित्य झालेल्या या घटना पाहता तातडीने कोविड सेंटर्ससंदर्भात एसओपी तयार करण्याची आवश्यकता आहे. महिला अत्याचाराच्या घटना होणार नाहीत, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असले पाहिजे. या घटनांकडे आपण गांभीर्याने लक्ष द्याल आणि आवश्यक त्या उपाययोजना कराल,” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.