छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही असं भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज देण्यावरुन सध्या वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आणि सभागृहात नेमकं काय झालं याची माहिती दिली.

उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी समज दिली असल्याचं म्हटलं. महाराजांचा अपमान झालाच नाही तर राजीनामा देण्याचा आणि आंदोलनाचा प्रश्नच नसल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन केलं.

…म्हणून राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली २० लाख पत्रं पाठवणार
“…तर तिथेच राजीनामा दिला असता”, व्यंकय्या नायडूंनी समज दिल्यानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

“व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं. अनेकांनी यावरुन वाद सुरु केला आहे. माझी त्या सर्वांना वाद थांबवा अशी हात जोडून विनंती आहे. महाराजांच्या नावे आतापर्यंत भरपूर राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता,” असं उदयनराजेंनी सांगितलं.

“मी कधीही कोणाची बाजू घेत नाही. जर व्यंकय्या नायडू चुकले असते तर तिथेच बोललो असतो. सभापती या नात्याने घटनेला धरुनच ते बोलले. चुकीचं बोलले असते तर मीच त्यांना माफी मागण्यास सांगितलं असतं,” असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

व्यंकय्या नायडू चुकीचं वागले नाहीत – संजय राऊत

“जे घडलंच नाही त्यावरुन राजकारण सुरु आहे. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना माहिती आहे. हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याऐवजी आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस खासदाराला विचारायला हवा. शरद पवार तिथेच बसले होते त्यांना विचारा,” असं उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी ते एक महान व्यक्ती असल्याचा टोला लगावला.