“मी आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राउंडवर होते. पण मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो, असे दौरे केले नाहीत,” अशा शब्दात भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यावरून टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी राजे बोलत होते.

माध्यामांशी बोलताना खासदार संभाजी राजे म्हणाले, “मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मी दौरा केला आहे. तेथील परिस्थिती भयानक झाली आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या असता, हेक्टरी ५० हजार रुपये सरकारनं दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागणीची सरकारनं दखल घेतली पाहिजे. आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे. त्याला तात्काळ मदत झाली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्य मंत्रिमंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानंतर केंद्राकडे निधी मागवा. अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर आला होता. तेथील नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे गेला नाही. त्यामुळे केंद्राने त्यावेळी मदत जाहीर करून देखील केवळ राज्य सरकारनं अहवाल पाठवला नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. अशीच चूक यावेळी होता कामा नये, त्या दृष्टीनं राज्य सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच करोनामुळे आपली तिजोरी रिकामी झाली हे मान्य आहे. पण आपला पोशिंदा जगला पाहिजे, यासाठी प्राधान्य द्यायला हवं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी मी रिकामाच बसून असून, शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत आवाज उठविण्यास तयार आहे. राज्य सरकारनं मला जबाबदारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

…तर राजेंना सुखाने राहायचा काही अधिकार नाही : संभाजी राजे

“आम्ही आजवर नवरात्रमध्ये कोल्हापूरमधून कधीच बाहेर पडलो नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे की, ‘आपला पोशिंदा संकटात असताना आणि त्याला जर त्रास होत असेल, तर राजेंना सुखानं राहायचा काही अधिकार नाही,’ अशी भूमिका खासदार संभाजी राजे यांनी मांडली. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.