मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकून (ईडी) पाठवण्यात आलेल्या नोटिसीबाबत मीच अनभिज्ञ आहे. चूक नसल्यास राज ठाकरेंना घाबरण्याची गरज काय? आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलही जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या नोटीससंबंधी विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, "ईडी ही स्वतंत्र आहे. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप होऊ शकत नाही. राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या नोटीसबाबत मला माध्यमांकडूनच समजलं. चौकशीसाठी ईडी बोलवत असतेच. जर काही तथ्य नसेल तर घाबरायचं काय कारण?” कोहिनूर मिल प्रकरण: ईडीच्या नोटिसीला राज ठाकरे देणार ‘उलट उत्तर’ मनसेने २२ तारखेला ठाणे बंदची हाक दिली आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "जर काही चूक केली नसेल तर लोकांना का त्रास देता? जर कायदा हातात घेतला तर कारवाई केली जाईल”. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. २२ तारखेला ठाणे बंदचं आवाहन नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेकडून २२ तारखेला ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. यासंबंधी बोलताना मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, “मुळात हा विषय ईडीचा नसून ईव्हीएमचा आहे. १५ वर्ष ईडीला का नाही कळलं ? राज ठाकरे ज्याप्रकारे ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत याचा सरकारला त्रास होत आहे. हा सगळा दबावतंत्रांचा भाग आहे”. “जर राज ठाकरेंना खरंच बोलावलं गेलं तर महाराष्ट्रभर किंबहुना मुंबईत जे काही होईल त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय-शर्मिला ठाकरे सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्याचमुळे आम्हाला ईडीची नोटीस आली. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्या नोकऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे पुरुषांनाही गृहद्योग करण्याची वेळ आली आहे असाही टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला.