प्रशांत देशमुख, वर्धा सेवाग्राम आश्रम परिसरातील वृक्षतोड थांबविण्यासाठी देशभरातील गांधीवाद्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आता महात्मा गांधी यांच्या तीन पिढीतील वारसदारांनी वृक्ष वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सेवाग्राम रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी काही वृक्ष तोडण्यात आले असून उर्वरित दोनशे झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे. त्याला विविध स्तरातून विरोध होत असल्याने तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. गांधीवादी व पर्यावरणप्रेमी वृक्षतोड विरोधात सातत्याने विरोध दर्शवित असतांनाच आता गांधीपर्वातील ही झाडे वाचविण्यासाठी गांधींच्या वारसदारांनीच पुढाकार घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, बांधकाममंत्री व पर्यावरणमंत्री यांना एका मेलद्वारे गांधी वारसदारांनी आपल्या भावना कळविल्या आहे. गांधीजींचे पणतू तुषार गांधी, त्यांचे वडिल अरूण गांधी, आत्या ईला गांधी, काका राजमोहन गांधी व गोपालकृष्ण गांधी तसेच तुषार गांधी यांची मुलगी कस्तूरी यांनी संयुक्त निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना दिले आहे. हे सर्व गांधी वारसदार दक्षिण आफ्रिका तसेच भारतातील विविध भागात वास्तव्यास आहे. मात्र महात्माजींच्या पुण्यभूमीत वृक्षहिंसा होत असल्याचे निदर्शनास आल्यावर हे सर्व नातलग प्रथमच एकत्र आले आहे. पत्रातून वृक्ष वाचविण्याची विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे. "आम्ही सर्व कस्तूरबा व मोहनदास गांधी यांचे वारसदार असून तीन पिढ्यांचे प्रतिनिधी पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याची कळकळीची विनंती करीत आहोत. बा आणि बापू सेवाग्रामला वास्तव्यास असताना लावण्यात आलेली ही झाडे आहेत. त्या काळी पाण्याची चणचण असताना आश्रमवासियांनी दूरवरून पाणी आणत ही झाडं वाढविली. आमच्यापैकी काहींनी सेवाग्राम आश्रमात लहानपण घालविले आहे. त्याचवेळी या वृक्षांची बाल्यवस्थाही आम्ही पाहिली आहे. आता मोठे झालेल्या या वृक्षांचा ऐतिहासिक वारसा लक्षात ठेवून या झाडांचे जतन करावे, अशी विनंती या वारसदारांनी केली आहे.