मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृत्यू करोनाच्या संसर्गामुळे झाल्याचं मुंबई महापालिका प्रशासनानं म्हटलं होतं. मात्र, हे वृत्त आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावले आहे. करोनामुळे केवळ तीन जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्येनं शंभरी ओलांडली. राज्यातील करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १०१ वर पोहचला आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात १ रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वढा झाली. त्यातच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भातले पत्रक काढून ही माहिती दिली होती. सदर व्यक्ती ६५ वर्षे वयाची होती. करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं तिला दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असं या पत्रकात म्हटलं होत.

आणखी वाचा- पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयानं पाहू नका; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकवरून गुडीपाडव्या निमित्तानं संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनामुळे चौथा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला. ‘प्रसार माध्यमातून करोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. मात्र, हे सत्य नाही. ही व्यक्ती फिलिपाईन्सची होती. तिला लक्षणं दिसून आल्यानं दाखल करण्यात आलं होतं. त्या व्यक्तीच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत फक्त तीनच मृत्यू झाले आहेत’ असं आरोग्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- Coronavirus मी घरी थांबणार, करोनाला हरवणार हा संकल्प करा- राजेश टोपे

संकल्प करू; जनतेला केलं आवाहन –

यावेळी टोपे म्हणाले, ‘डॉक्टरांनी ओपीडी बंद करू नये. रूग्णांच्या उपचारासाठी त्यांनी तत्पर राहावं आणि आपल्या कर्मचारी वर्गालाही बोलवावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच मी घरी थांबणार, करोनाला हरवणार असा आपण संकल्प करावा, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.