चार हजार गावे आणि १२ लाख वीजग्राहक अजूनही अंधारात

तौक्ते’ चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुण्यासह व राज्यातील एकूण १० हजार ७५२ गावांतील वीजयंत्रणा खंडित झाली आणि त्याचा फटका ४६ लाख ग्राहकांना बसला. अद्याप ४ हजार गावे अंधारात असून १२ लाख ग्राहकांचे विजेविना हाल सुरू आहेत. या वादळाचा सर्वाधिक फटका ठाणे शहर आणि जिल्ह्य़ाला बसला असून सव्वा दोन लाखांहून अधिक वीजग्राहकांचा पुरवठा मंगळवारी सायंकाळीही सुरू झाला नव्हता.

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील  वीज पुरवठा यंत्रणा कोलमडून पडली. राज्यात एकूण १५४६ उच्चदाब खांब वादळामुळे पडले. त्यापैकी ४२५ पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे. तर पडलेल्या ३९४० लघुदाब खांबांपैकी ९७४ पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे. वादळ व पावसामुळे ९३ हजार ९३५ रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता त्यापैकी ६८ हजार ४२६ दुरुस्त करण्यात आले आहे.

नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने १३ हजार तंत्रज्ञांचे मनुष्यबळ मैदानात उतरवले आहे. तसेच विभाग स्तरावर ४६ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

नुकसानीची व्याप्ती बघता सुमारे ६२२ रोहित्रे, सुमारे ३५० किमी लांबीच्या वाहिन्या, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीच्या विद्युत तारा व २० हजार ५०० खांब उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्यातील १० हजार ७५२ गावांतील एकू ण ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सायंकाळपर्यंत ६ हजार गावांतील ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. अद्याप ४ हजार गावे अंधारात आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ठाणे शहर व जिल्ह्य़ाला बसला व ७ लाख ८५ हजार ५१९  ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश मिळाले असले तरी सव्वा दोन लाखांहून अधिक वीजग्राहक अद्याप अंधारात आहेत.

ठाण्यापाठोपाठ या चक्रीवादळाचा  मोठा फटका रायगड जिल्ह्य़ाला बसला. ७ लाख ७३ हजार ७६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

* पालघर जिल्ह्य़ात ५ लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी साडेतीन लाख ग्राहक अंधारात आहेत.

* रत्नागिरी जिल्ह्य़ात वीजपुरवठा खंडित झालेल्या ५ लाख ४५ हजार १२१ ग्राहकांपैकी ४ लाख १८ हजार ३६० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

* सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ३ लाख ६६ हजार ११ ग्राहकांपैकी ६७ हजार १६६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.

* नाशिक जिल्ह्य़ात ३ लाख २९ हजार ३०४ ग्राहकांपैकी २ लाख ७२ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

* कोल्हापूर जिल्ह्य़ात २ लाख ९६ हजार ९६५ हजार ग्राहकांपैकी २ लाख ४९ हजार ६०१ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

* सातारा जिल्ह्य़ात ४ लाख ३६ हजार ७६८ ग्राहकांपैकी ४ लाख ८ हजार ८९ ग्राहकांचा पुरवठा पूर्ववत झाला आहे.

* पुणे जिल्ह्य़ात १ लाख ६६ हजार पैकी १ लाख ४८ हजार ११२ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

* सांगली जिल्ह्य़ात १ लाख ५५ हजार ५४३ पैकी १ लाख ५३ हजार ७१५ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

* विदर्भात एकूण ५३ हजार ३९२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

* मराठवाडय़ात १ लाख ५ हजार १४२ पैकी १ लाख ३ हजार ९२४ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.