“तौते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे.” असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाड येथे माध्यमांशी बोलताना महाविकासआघाडी सरकारवर केला आहे.

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा!

फडणवीस म्हणाले, “या चक्रीवादळाचा लॅण्डफॉल हा गुजरातमध्ये झाला. ४५ जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि खूप मोठ्याप्रमाणात गावं उध्वस्त झाली. म्हणून काल पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले, त्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी मदत घोषित केली. त्या मदतीची जी प्रेस नोट आहे त्यातच उल्लेख केलेला आहे, की अन्य राज्यांना देखील यामध्ये मदत होणार आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेश इतक्या राज्यांमध्ये नुकसान झालेलं आहे. कालची घोषणा झाल्यानंतर इतर कुठल्याही राज्याने त्या बद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्या सगळ्यांनी ते वाचलेलं आहे. की केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. आता यामध्ये केरळ किंवा तामिळनाडू ही तर भाजपाची राज्य नाही किंवा आपण दुसरा विचार केला, तर गोवा व कर्नाटक ही भाजपाची राज्य आहेत. तरी देखील काल घोषणा गुजरातची झाली आहे. या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे. एवढच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसडीआरएफ हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार एनडीआरएफमधील एसडीआरएफमध्ये पैसे अगाऊ देतं. ते आपल्याला मिळालेले आहेत आणि एसडीआरएफमधून अशाप्रकारच्या कुठल्याही वादळात किंवा घटनेत राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले. ते केंद्र सरकार परत करत असतं किंवा नव्याने देत असतं, केंद्र सरकारचेच ते पैसे असतात. हे सगळं राज्याला माहिती आहे, असं असतानाही यावर जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. राज्याला निश्चितपणे मदत केंद्र सरकार करेल. आठही राज्यांना करेल व महाराष्ट्राला होईल.”

दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

याचबरोबर, “कालच राज्याने दोन कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याचं जाहीर केलं. या लसी कुठून आल्या?जमिनीतून उगवल्या का? असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. एबीपी माझाच्या एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे.”

“निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता…”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी!

कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने भरघोस मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. “निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. सरकारने तातडीने त्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, तौते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. याशिवाय देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.