शनिवारची संध्याकाळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांना घातलेल्या अटींचाही उल्लेख केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात शनिवारी (२६ सप्टेंबर) मुंबईतील हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीवरून वेगवेगळे तर्कविर्तक राज्यात लावले जात असून, खासदार संजय राऊत यांनी भेटीमागील कारणांचा उलगडा केला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनीही भेटीचं कारण सांगितलं. एएनआय वृत्तसंस्थेला बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "शिवेसेनेच्या सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी अट मी त्यांना घातली होती," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. Sanjay Raut ji wanted to take my interview for Shiv Sena's newspaper Saamana. The meeting was held to discuss the same as I had put certain conditions, I wanted it to be published unedited. No political talks held in meeting: Devendra Fadnavis, Former Maharashtra CM & BJP leader pic.twitter.com/2BabKfCXAU — ANI (@ANI) September 27, 2020 "ज्यावेळी हे सरकार पडेल, तेव्हा बघू" "शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा बैठकीत केली नाही. त्यासाठी असं कोणतंही कारण नाही. जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल. ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू, पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपाला नाही," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.