नाशिकमधील सातपूर भागात एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या चारही महिला भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. सातपूरजवळच्या बेळगाव ढगा परिसरात शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. आज सकाळी त्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालं. त्यानंतर दुपारी मनिषा शिंदे या त्यांच्या दोन मुलींसह सुनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळच्या बंधाऱ्यावर गेल्या होत्या.

भांडी घासण्याचे काम आटोपल्यावर पाय धुत असताना एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघीही बुडाल्या. एका लहान मुलीने शिंदे यांच्या घरी जाऊन हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा स्थानिकांसह इतर काही नागरिकांनी येऊन या चौघींना पाण्याबाहेर काढलं आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मनिषा अरूण शिंदे, वृषाली अरूण शिंदे, ऋतुजा अरूण शिंदे आणि आरती निलेश शिंदे अशी या चार जणींची नावं आहेत. सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.