कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन कारवाई देखील करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाची घोषणा केली आहे. अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील सोनेगावमध्ये येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहार, तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक जप्त करण्यात आलेल्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे भुजबळ यांनी जाहीर केलं आहे.

राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. करोना काळामध्ये अन्न,धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलीसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथे कारवाई करत धान्याचा काळाबाजार उघडकीस आणाला होता.

सोनेगावमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराचे आदेश आता भुजबळांनी दिले आहेत. तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणांची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटलं आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल, त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल असं भुजबळ यांनी सांगितलं.