ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगनसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे आज भेट झाली. दुपारी तासभराच्या चर्चेत या दोघांनी ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीसह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर चर्चा केली. लोकसहभागातून ग्रामविकास या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या दोघांनीही पुन्हा भेटण्याचे ठरवले आहे. या भेटीत हजारे यांनी मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली.

आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीसंदर्भात नवा आदेश काढण्यात आला. त्यासंदर्भात दोनच दिवसापूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खाजगी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. मंत्री मुश्रीफ यांनीही पत्र लिहून हजारे यांना लवकरच भेट घेऊन सविस्तर चर्चा करू असे पत्र लिहिले होते.

त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत हजारे यांनी महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधन संपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले.

अण्णांची नाराजी आणि मुश्रीफांचे स्पष्टीकरण

या भेटीत हजारे यांनी खाजगी व्यक्तीच्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान; करोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गावगाडा सुरळीत चालण्यासाठी असाधारण परिस्थितीत हे करावं लागल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन बाबींबाबतही मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले.