गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला आहे. १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कमळ हाती घेणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई महापालिका आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देण्यास हातभार लावणारे आशिष शेलार आणि बीडमधील शिवसेना आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सर्वात आधी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे विश्वासू परिणय फुके यांची वर्णी लागली आहे. - राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री) - जयदत्त शिरसागर (कॅबिनेट मंत्री) - डॉ. आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री) - डॉ. संजय कुटे (कॅबिनेट मंत्री) - सुरेश दगडू खाडे (कॅबिनेट मंत्री) - डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री) - डॉ. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री) - तानाजी जयवंत सावंत (कॅबिनेट मंत्री) - योगेश सागर (राज्यमंत्री) - अविनाश माहतेकर (राज्यमंत्री) - संजय भेगडे (राज्यमंत्री) - परिणय फुके (राज्यमंत्री) - अतुल सावे (राज्यमंत्री) उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित असतील. कारण शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार उद्या ठाकरे यांच्यासह अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.