राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीहून कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात आज २ हजार ९९२ नवे करोनाबाधित आढळले तर ७ हजार ३० जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. यामुळे आतापर्यंत राज्यातील करोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या १९ लाख ४३ हजार ३३५ झाली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५८ टक्के आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे ५१ हजार १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३७ हजार ५१६ आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,६४,७४४ नमुन्यांपैकी २० लाख ३३ हजार २६६ नमूने (१३.७७ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार १८१ जण गृह विलगीकरणात तर २ हजार ९३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दरम्यान, रोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरूच असताना मुंबई महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्याची सज्जता आजमावण्यासाठी पुढील दोन दिवस सराव फेरी राबवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दोन लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.