मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. विशेषकरुन शिवसेनेच्या नेत्यांनी सकाळपासून कंगनावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही कंगनावर टीका करताना ट्विटरवरुन थेट इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी कंगनाला सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे असती तर आमच्या रणरागिणी तिचे थोडाब फोडल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.

दरम्यान याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उडी घेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी रेखा शर्मा यांनी Whats App चा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे.

कंगनाने केलेलं ट्विट पाहता तिने कोणतंही देशद्रोही वक्तव्य केलेलं नाही, किंवा तिने कोणाला धमकीही दिलेली नाही. याप्रकरणातून शिवसेना नेत्यांची विचारधारा समोर येते आहे. महिला जर आपले विचार मांडत असतील तर ते शिवसेना नेत्यांना सहन होत नाही असं म्हणत रेखा शर्मा यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.