जर पाच वर्षांत मोठी कामे केली असती, तर अन्य पक्षातून राजकारण्यांना मोठय़ा प्रमाणात आयात करण्याची गरजच पडली नसती. सध्या तर जे निवडून येऊ शकतात त्यांच्याविषयी पक्षांतरांच्या अफवा पसरविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. अर्थात जे जात आहेत, त्याने कोणतीही पोकळी निर्माण झालेली नाही. सध्याचे सत्ताधारी जातिधर्माच्या नावावर विष कालवून तरुणांना भरकटवत  आहेत, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने येथे राष्ट्रवादीने दिवसभरात आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजघटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जाहीर सभा, पत्रकार बठक, युवा संवाद अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले.  खासदार कोल्हे यांनी युवा संवाद कार्यक्रमात तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिंतूर येथील जाहीर सभा व परभणीतल्या पत्रकार बठकीत सरकारवर टीका केली.

सध्या भावनांचा खेळ सत्ताधाऱ्यांनी मांडला असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरुणांनी मतदानाच्या शस्त्राद्वारे आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन, कोल्हे यांनी केले. या वेळी माजी महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, आमदार रामराव वडकुते आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिहार यांनी केले.

या युवा संवाद कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकार बठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. जनता दुष्काळात होरपळत आहे तर पूरग्रस्त अजूनही संकटात आहेत. अशावेळी सत्ताधारी यात्रा काढण्यात मग्न आहेत, अशी टीकाही पवार यांनी केली. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, विक्रम काळे, सतीश चव्हाण, प्रताप देशमुख, विजय भांबळे, राजेश विटेकर,  किरण सोनटक्के आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी  जिंतूर येथील जाहीर सभेत शिवाजी महाराजांचे नाव घेऊन करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असून तीन-तीन वष्रे जाऊनही सरसकट कर्जमाफी होत नाही. आमचे सरकार आले तर सातबारा कोरा करू आणि बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन  पवार यांनी दिले.

धनंजय मुंडे यांनी दुष्काळ व पुरातील आपत्तीचे व्यवस्थापन करताना वारंवार सरकारचे नाकत्रेपण दिसून येत असून या सरकारमध्ये १६ मंत्री भ्रष्ट  आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यानिशी दिली, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक मुख्यमंत्र्यांमध्ये नाही असे सांगितले.