राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची चिन्हे असताना विदर्भात मात्र या हंगामात चांगली स्थिती नाही. कागदोपत्री चौदा साखर कारखान्यांचे अस्तित्व असलेल्या विदर्भात केवळ तीन कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून हे तीनही कारखाने खासगी आहेत. गेल्या महिनाभरात या कारखान्यांनी १.२७ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून १.०८ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. प. महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे.

गेल्या वर्षी विदर्भात सात साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यापैकी सहा कारखाने हे खासगी होते. यंदा, मात्र हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी तीनच कारखान्यांचे धुरांडे पेटले आहे.विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८.५० ते ९ लाख मे.टन ऊसाचे गाळप होते. ऊसाची उपलब्धतता मात्र ७ ते ७.५० लाख टनापर्यंतच आहे. केवळ १८ हजार हेक्टर क्षेत्रातच ऊसाची लागवड आहे. विदर्भात वीस कारखान्यांची उभारणी दशकभरापूर्वी करण्यात आली होती. पण कालौघात कारखाने आजारी आणि बंद पडले. काही कारखान्यांना तर एकाच गाळप हंगामानंतर टाळे लागले. १७ सहकारी साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने खासगी उद्योजकांना विकण्यात आले. उर्वरित सहा कारखान्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखान्यात गाळप क्षमता शिल्लक आहे. बंद कारखान्यांचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता कमी  आहे.

सध्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील सागर डेक्कन, सुधाकरराव नाईक नॅचरल शुगर्स तसेच नागपूर जिल्ह्यातील व्यंकटेश्वरा या तीन खासगी कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. गेल्या हंगामात अमरावती विभागातील तीन कारखान्यांनी २ लाख ४३ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले, तर २ लाख ३७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखरेचा ऊतारा हा ९.७२ टक्के होता. नागपूर विभागातील चार खासगी साखर कारखान्यांनी २ लाख ३२ हजार मे.टन ऊस गाळप करून २ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ऊतारा ९.३४ टक्के होता, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

अमरावती विभागातील कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ही केवळ ५ हजार मे.टन तर नागपूर विभागातील क्षमता ही ५ हजार ६०० मे.टन इतकीच आहे. राज्यातील इतर भागात होणाऱ्या ऊसाच्या गाळपाच्या तुलनेत विदर्भातील कारखान्यांची क्षमता नगण्य बनली आहे. वीस कारखान्यांची उभारणी करणाऱ्या विदर्भात सहकारी साखर कारखान्यांना दशकभरात घरघर लागली आणि या कारखान्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले. पण, या कारखान्यांपैकी काही कारखाने खासगी उद्योजकांनी आपल्या ताब्यात घेतले, तेव्हा अचानक या कारखान्यांमध्ये लाभाचे दर्शन घडू लागले. गाळप क्षमता उरलेल्या सहकारी साखर कारखान्यापैकी विदर्भातील एकमेव वसंत सहकारी साखर कारखान्यात गेळया वर्षी गाळप झाले, पण यंदा अजूनपर्यंत हा कारखाना सुरू होऊ शकला नाही.

राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची

गेल्या चार वर्षांत विदर्भातील ऊस लागवडीच्या क्षेत्रात १२ हजार हेक्टरहून २० हजार हेक्टपर्यंत वाढ झाली आहे. हे चांगले संकेत मानले जात असले, तरी विदर्भातील इतर कारखाने सुरू करण्यासाठी अधिक ऊसासोबत राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची मानली जात आहे.