राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपा व शिवसेनेत अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेने चर्चेला बसायला हवं, चर्चेसाठी आमची दारं अजूनही उघडी असल्याचे म्हटले आहे. तसेच, अजूनही काही बिघडलं नाही, अद्याप दोन दिवस बाकी आहेत. आपण बसून यावर मार्ग काढू शकतो, असेही त्यांनी शिवसेनेला उद्देशून म्हटलं आहे.

यावेळी महाजन यांनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिलेला आहे. निकाल लागून १३ दिवस झाले, तरी अद्याप सरकार स्थापन झालं नसल्याने लोकांचा रोष दिसत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. हे पाहता सरकार लवकर स्थापन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आमचे देखील प्रयत्न सुरू आहेत. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला की, आपण एकत्र निवडणूक लढलेलो आहोत, या अगोदर पाच वर्षे आपण सोबत काम केलं आहे. हे पाहता सरकार स्थापनेचा निर्णय आता लवकरच झाला पाहिजे. आमच्याकडून कुठेही टीका टिप्पणी केली जात नाही. शिवसेना म्हणते ठरल्याप्रमाणे करा, मात्र यासाठी त्यांनी चर्चेला बसायला हवं, असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

यावेळी त्यांनी काही मतमतांतर असू शकतात, मात्र बसून हा विषय मार्गी लागेल, असं मला वाटतं. कारण चर्चेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. शेवटी राज्याचा गाडा चालवायचा आहे. त्यामुळे आमची चर्चेची दारं अजूनही खुली आहेत. तुम्हाला यायचं नसेल तर आम्हाला बोलवा, पण कुठतरी हा विषय थांबला पाहिजे. अशी सगळी अस्थिरता निर्माण करून या ठिकाणी चालणार नाही. अजूनही काही बिघडलं नाही, अद्याप दोन दिवस बाकी आहेत, आपण बसून यावर मार्ग काढू शकतो, असं देखील सांगितलं.