करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बीड प्रशासनाने टाळेबंदी व सीमा बंद करून तब्बल पन्नास दिवस खिंड लढवली.मात्र परवानगी न घेता दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्याहून गेवराई व माजलगावात आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला बाधा झाल्याचा (पॉझिटिव्ह) तपासणी अहवाल शनिवारी आला.त्यामुळे अखेर करोनाने बीड जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

बीड जिल्ह्यात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात व आरोग्य अधिकारी आर. बी पवार यांनी टाळेबंदी व जिल्हाच्या सीमा बंद करून नियमांची कठोर अंमलबजावणी केली. त्यामुळे पन्नास दिवसात लगतच्या जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असतानाही बीड शून्यावर होते. मागील महिन्यात नगर जिल्ह्याच्या जवळ एक रूण्ण सापडला होता. पण नगरमध्येच उपचार होऊन तो बराही झाला होता.टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात ढील देण्यात आल्यानंतर बाहेर अडकलेले लोक गावाकडे परतले यात काही चोरट्या मार्गानेही आल्याने धोका वाढला होता.

काही दिवसांपूर्वीच गेवराई आणि माजलगाव तालुक्यात मुंबई पुणे येथून विना परवाना आलेल्या दोन व्यक्तीना करोनाची बाधा झाल्याचा तपासणी अहवाल शनिवार दि.१६ मे रोजी रात्री आला. दोन्ही बाधितांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर दोन्ही बाधित किती लोकांच्या संपर्कात आले आहेत याचा शोध सुरु आहे.

दोन करोना बाधित सापडले – डॉ.आशोक थोरात
गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाले होते.त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली असल्याचे त्यांनी सांगितले.