वसई पूर्वेतील राजावळी येथील खाणीत मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसई पूर्वेतील राजावळी गावाच्या लगतच्या भागात खाण आहे. पावसाळा असल्याने राजावळी गावाजवळची ही खाण पाण्याने भरून गेली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास आचोळे डोंगरी येथे राहणारी दोन मुले पोहण्यासाठी राजावळी येथील खाणीत उतरले होते. खाणीच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही त्यात बुडाले. यासंदर्भातील माहिती पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शोध कार्य सुरू केले होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा शोध लागला. अभिषेक भगत (१४) व कृष्णा गौतम (१०) अशा बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी सुद्धा राजवळी येथील खदाणीत बुडून एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.